सोशल - '...तर TV लवकरच अडगळीत जाईल'

आज जागतिक टेलिव्हिजन दिवस. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगानं बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवत आहोत.

आधी ठराविक वेळेवर, ठराविक मालिका किंवा कार्यक्रम पाहण्यासाठी लोक आधीच आपल्या वेळेचं नियोजन करून ठेवायचे.

पण आता स्वस्त स्मार्टफोन आणि फुकट इंटरनेटमुळे मनात येईल तेव्हा, आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचा किंवा मालिकांचा आनंद घेऊ शकतो. स्मार्टफोनच काय आता तर टीव्हीसुद्धा स्मार्ट होऊ लागला आहे.

याच पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं आपल्या वाचकांना विचारलं होतं की, 'आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात तुमचं टीव्ही वरचं प्रेम कमी झालं आहे का?' त्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

इंटरनेट आणि स्मर्टफोनमुळे आपण कितीही जरी टीव्हीपासून दुरावलो असलो तरी, घरात टीव्ही नसणं म्हणजे शरीरात आत्मा नसल्यासारखं आहे, असं मत एका वाचकानं व्यक्त केलं आहे.

तर "फालतू बातम्या आणि थुकरट मालिका अशाच सुरू राहिल्या तर लवकरच टीव्ही अडगळीत जाणार हे नक्की!", असं मत स्वप्नील खेरडेकर यांनी व्यक्त केला आहे.

"टीव्हीचा कंटेन्ट खूप जूना वाटतो. वेबसिरिज त्यापेक्षा चांगली असते.", असं मत विनायक बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

पारस प्रभात यांनी अगदी सविस्तररित्या आपलं टीव्हीवरचं प्रेम व्यक्त करत 90च्या दशकातील आठवणींना उजाळा दिला आहे.

तर सचिन परब यांनीही 'मोबाईल फोनपेक्षा टीव्हीच बरा' असं म्हटलं आहे.

"माहिती आणि मनोरंजनासाठी आजही टीव्हीचं महत्त्व कायम आहे. टीव्हीनं समाजात खूप मोठे बदल केले आहेत. तसंच अनेक कलाकारही तयार केले आहेत." असं मत लक्ष्मीकांत मुळे यांनी व्यक्त केलं आहे.

विजया पाटील म्हणतात, "मी स्वतः २ वर्षांपूर्वी टीव्ही खूप पहात असे विशेषतः बातम्या. पण आता खूपच एकांगी बातम्या देतात, तटस्थपणा नाहीच आहे. त्यामुळे बातम्या पहाणे वा चर्चा पाहणे कमी झालं आहे. मालिका तर दिव्यच असतात, मी पामर त्या कधीच पाहू शकले नाही."

"टीव्हीपेक्षा स्मार्टफोनवर जास्त वेळ जातो", हे मान्य करत राजू तुललवार यांनी, "अॅमेझॉन स्टिकमुळे केबलपेक्षा कमी खर्चात हवे ते दर्जेदार कार्यक्रम हवे तेव्हा बघता येतात.", असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)