'सलमान, अडचण मुलींच्या कपड्यात नाही, मुलांच्या नजरेत आहे'

सलमान खान
    • Author, नसिरुद्दीन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

जेव्हा स्त्रिया किंवा मुलींबाबत काही चर्चा होते तेव्हा काही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाही. बरेचदा आपल्या मनात आणि डोक्यात असलेल्या खऱ्या गोष्टी बाहेर पडतात. त्या झाकण्याचा प्रयत्न केला तरी झाकल्या जात नाहीत. आपल्याला अनेकदा असा भ्रम होतो की आपण फारच छान बोलून गेलो आहोत.

गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानबरोबरही असंच झालं. त्याला असं वाटलं की तो स्त्रियांचा हितचिंतक आहे. सलमान भाई जान आहे. त्याने मुलींविषयी विचार व्यक्त केले तर टाळ्या मिळाल्या.

मात्र तो खरंच स्त्रियांचा हितचिंतक आहे? हितचिंतक होण्यासाठी स्त्रियांबद्दल तो जे बोलला त्यामुळे मुलींचं आयुष्य खरंच सुधारेल का? काही दिवसांआधी हा किस्सा झाला.

सलमान विषयी पलक काय म्हणाली?

पलक तिवारी बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री आहे. अभिनेत्री म्हणून तिचा पहिला चित्रपट हा सलमान खान बरोबरचा किसी का भाई किसी का जान आहे.

एका बातमीनुसार तिने सेटवर सलमान खानसाठी एका नियमाबद्दल तिने सांगितला नियम मुलींसाठी होता. सलमानच्या सेटवर सगळ्या मुलींनी कपडे गळ्यापर्यंत घालून यायला हवेत. कारण कपडा गळ्याखाली आला तर पुरुषांची नजर तिथे जाईल. हे सलमानला अजिबात आवडत नाही. चांगल्या मुलींसारखं त्यांनी स्वत:ला पूर्णपणे झाकून यावं.

इतकंच नाही तर सलमान खानचे असे विचार आहेत की मुलींचं कायम रक्षण करत राहिलं पाहिजे. मुलींनी नेहमी काळजी घेतली पाहिजे. पलकसुद्धा सलमानच्या इच्छेशी सहमत आहे. पलक तिवारी या मुद्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा होती.

'आप की अदालत' कार्यक्रमात त्याने काय स्पष्टीकरण दिलं?

सलमान खान

फोटो स्रोत, India TV

इंडिया टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या रजत शर्मा यांच्या आप की अदालत या कार्यक्रमात सलमान खान पाहुणा म्हणून आला होता. त्याला पहिलाच प्रश्न पलक तिवारीशी निगडीत विचारण्यात आला होता.

रजत शर्मा यांच्यामते तो हा त्यांचा दुटप्पीपणा होता. तो स्वत: पटकन शर्ट काढतो आणि मुलींसाठी कपडे घालण्याचा नियम सांगतो.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सलमान ने पलकबदद्ल त्याच्या भूमिकेविषयी बरंच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणतो, “मला असं वाटतं की स्त्रियांचं शरीर मौल्यवान आहे. ते जितकं जास्त झाकलेलं असेल तितकं छान दिसेल.”

सलमानने हे वक्तव्य केल्यावर हॉलमध्ये बसलेले लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्यात महिलांचाही समावेश होता.

जेव्हा चर्चा पुढे जाते तेव्हा सलमान म्हणतो, “हा मुलींचा प्रश्न आहे. हा मुलांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने पुरुष स्त्रियांकडे पाहतात ते मला अजिबात आवडत नाही. त्यांच्यावर अशी वेळ येवो असं मला वाटत नाही.”

मुलांना तुम्ही काय शिकवण देता हा प्रश्न जेव्हा त्याला विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर असतं, “सगळ्यांना माहिती आहे. मात्र कधीकधी त्यांची वृत्ती डगमगते, त्यामुळे आम्ही जेव्हा चित्रपट तयार करतो तेव्हा आपण त्यांना आपल्या हिरोईन, आपल्या बायकांना असं बघण्याची संधीच देऊ नये.” पुन्हा टाळ्यांचा कडकडाट होतो.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सलमान म्हणतो की समस्या ही नाही की काय विचारणार? समस्या ही आहे की मी उत्तर काय देणार?

खरंच समस्या सलमानच्या दृष्टिकोनात आणि उत्तरात आहे.

चांगली मुलगी म्हणजे कशी मुलगी?

पलक तिवारी

फोटो स्रोत, Twitter/PalakTiwari

पलकने सलमानच्या हवाल्याने चांगल्या मुलीचा उल्लेख केला आहे. प्रश्न असा आहे की चांगली मुलगी कशी असते जिची गोष्ट हे दोघं करत आहे.

सलमानसारख्या पुरुषांची चांगल्या मुलीची व्याख्या फक्त कपड्यांपर्यंत मर्यादित नसते. ती कपड्यापासून सुरू होते आणि पुढे पर्यंत जाते.

त्यांच्या मते चांगली मुलगी म्हणजे जी सगळ्यांचं ऐकेल. वडील, भाऊ, नवरा यांचं ऐकेल. उलट उत्तरं देणार नाही. आपल्या मनाचं ती काही करत नाही, जास्त जोरात बोलणार नाही. रात्री उशिरापर्यंत फिरणार नाही. परपुरुषाशी फार बोलणार नाही आणि जी सगळ्यांची काळजी घेते, परंपरांचं पालन करते. वगैरे वगैरे.

अशी मुलगी सलमानला अपेक्षित आहे का? आजची मुलगी असंच चांगली होऊ इच्छिते?

आपल्या आजूबाजूला पलक सारख्या मुली आहे ज्या सामाजिक खाचांमध्ये स्वत:ला टाकू इच्छितात. दुसऱ्या बाजूने विचार करणाऱ्या लोकांची सुद्धा काही कमी नाही.

आजकालच्या मुली जशा बनू इच्छितात त्या सलमानच्या नजरेत वाईटच मुली असतील. त्यामुळे आजकाल मुलींचा एक मोठा गट असा आहे ज्या आम्ही वाईट मुली आहोत हे सांगायला अजिबात कचरणार नाही.

मौल्यवान शरीर आणि चलाख युक्तिवाद

पितृसत्ता अतिशय चलाखीने काम करते. सलमानच्या गोष्टी काही वेळ कोणालाही चांगल्या वाटू शकतात कारण त्यात स्त्रियांविषयी काळजी दाखवली आहे. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा त्यात आहे.

त्यासाठी सलमानच्या वक्तव्यांवर टाळ्या येतात. म्हणजे त्याच्या युक्तिवादाला समाजात मान्यता आहे. समाजात स्त्रियांबाबत असा विचार करणारा तो एकटा नाही. तो एक मजबूत विचार आहे. ते विचार आपल्या आत रुजले आहेत.

सलमान खान

प्रश्न असा आहे की सलमानला स्त्रियांची खरंच चिंता आहे का? फक्त स्त्रियांचं शरीरच मौल्यवान आहे? स्त्रियांचं शरीर मौल्यवान आहे की त्यांचं आयुष्य?

एखादी गोष्ट मौल्यवान असेल तिची सुरक्षा करणं योग्य आहे का? म्हणून स्त्रियांच्या शरीराची तुलना मौल्यवान गोष्टींशी केली जाते. काहीजण त्याची तुलना मिठाईशी करतात. स्त्रियांचं शरीर मौल्यवान आहेच. त्यामुळे त्याचा संबंध थेट कुटुंब आणि प्रतिष्ठेशी जोडला जातो. त्यामुळे मौल्यवान शरीरात काही झालं तर बट्टा लागतो.

स्त्रियांचं शरीर मौल्यवान असल्यामुळे त्याचा थेट संबंध तिच्या प्रतिष्ठेशी येतो. मग तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्या हालचालींवर नजर ठेवली जाते.

म्हणून सलमानसारखे पुरुष स्त्रियांच्या रक्षणाची जबाबदारी स्वत:वर घेतात. हा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचाच एक प्रकार आहे.

एकदा नियंत्रण मिळवलं की मुली त्यांच्या भल्या बुऱ्याचा विचार करू शकत नाही असा त्याचा अर्थ घेतला जातो. विचार करण्यासाठी त्यांना सलमानसारख्या पुरुषाची गरज लागते. त्या स्वत:ची सुरक्षा करू शकत नाही. त्यांचं संरक्षण एखादा भाई किंवा टायगरच करू शकतो.

कपड्यांनी हिंसाचार होतो का?

हिंसेचा संबंध कपड्यांशी आहे का? सलमानच्या बोलण्यावरून तरी असंच वाटतं. म्हणूनच गळ्याखाली येणाऱ्या कपड्यांना त्याचा विरोध आहे. कारण त्यामुळे पुरुषांची पातळीसुद्धा लक्षात येते.

सलमानचा मुद्दा लक्षात घ्यायचा झाला तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी कपडे जबाबदार आहेत. स्त्रियांवर झालेल्या अत्याचारानंतर समाजाला वाटतं की मुलींनीच त्याला उत्तेजन दिलं. म्हणून असं झालं. सलमानचा विचारही याच पठडीतला आहे.

मात्र स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला कपडे नाही, पुरुष जबाबदार आहेत. मुलींनी कसेही कपडे घातले तरी अत्याचार करणारे फक्त कपडेच पाहत नाही.

घरात होणारे हिंसाचार फक्त कपड्यामुळे होतात असं नाही.

अत्याचारी पुरुष कपड्याच्या आरपार स्त्रियांना पाहतो. त्यामुळे कपड्यांमुळे अत्याचार होतो हा समज अत्यंत चुकीचा आहे.

प्रश्न पुरुषाचा आहे तर पुरुषांवरही बोललं पाहिजे

सलमान खान

फोटो स्रोत, Getty Images

सलमान खूबीने मान्य करतो की हे सगळं जे आहे तो प्रश्न मुलींचा नाही तर मुलांचा आहे. मुलांची नियत खराब होते. त्यामुळे ती वृत्ती तशी होऊ नये यासाठी मुलींवर ताबा मिळवणं गरजेचं आहे. असंच सलमानच्या बोलण्यावरून वाटतं.

प्रश्न मुलींचा नाही तर मुलांचा आहे. त्यांच्या कृतीचा आहे. त्यांच्या जडणघडणीचा आहे.

अशी घटकेत बिघडणारी वृत्ती मुलांची का आहे असा प्रश्न सलमानला कोणी का विचारत नाही? मुलींना पाहताच डगमगते अशी मुलांची नजर का आहे? मग प्रश्न असा आहे की नक्की अडचण कुठे आहे?

सलमान गंभीर आजारांवर चुकीचं औषध सांगत आहे. जर वेदनेच्या मुळाशी दबंग पुरुष आहेत तर औषधाची गरज मुलांना आहे. मुलींना नाही. जर प्रश्नाचं मूळ मुलांच्या नजरेत आहे तर ती बदलण्याची गरज आहे. कपडे नाही.

त्यामुळे मुलांबद्दल बोलायला हवं. मुलांना सुधारण्यासाठी सलमानने त्याची सुपरहिरोची प्रतिमा वापरली असती तर किती बरं झालं असतं.

मात्र घटकेत कपडे काढणाऱ्या सलमान चित्रपटात ज्या पद्धतीने पुरुषांची छवी तयार करतो, तसे पुरुष स्त्रियांचा मित्र कधीच होऊ शकत नाही म्हणून नवीन पुरुषाची छवी त्यांनी तयार करायला हवी.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)