सिकंदर शेख : 'महाराष्ट्र केसरी'मध्ये पराभव, पण सोशल मीडियावर मात्र चर्चा

सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी, कुस्ती
फोटो कॅप्शन, सिकंदर शेख
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुणे

पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. यामध्ये पैलवान शिवराज राक्षेने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मानाची समजली जाणारी चांदीची गदा पटकावली.

पण महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना झाल्यावरही सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगतेय ती या स्पर्धेच्या सेमी फायनलची.

सेमी फायनलमध्ये या पैलवान सिकंदर शेख याचा महेंद्र गायकवाड याच्याकडून पराभव झाला. पण या सामन्यावर वादाचं वावटळं तयार झालं आहे.

सेमीफायनलमध्ये सिकंदरवर पंचांनी अन्याय केला, अशा आशयाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. सिकंदर शेख कोण आहे आणि या सेमीफायनलची चर्चा का होतेय हे पण जाणून घेऊया.

सिकंदर शेखचा कुस्ती च्या तालमीत प्रवेश

सिकंदर शेख, महाराष्ट्र केसरी, कुस्ती
फोटो कॅप्शन, सिकंदर शेख

22 वर्षांचा सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना चित केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला.

सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरच्या कुस्तीचा तालीम मोहोळमधूनच सुरु झाल्या. घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती असुनही त्याच्या आई-वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं. सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले.

सिकंदर नऊ-दहा वर्षांचा असताना मोहोळमधल्या फाटे तालमीत त्याचा कुस्तीचा सराव सुरु झाला. बीबीसी मराठीशी बोलताना सिकंदरने त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती दिली.

“मोहोळमध्ये चंद्रकांत काळे माझे वस्ताद होते. पहिल्यांदा मी फाटे तालमीत होतो. त्यानंतर सिद्ध नागेश तालमीत गेलो. मला तालमीत पाठवायचं हा माझ्या आई-वडिलांचा निर्णय होता. माझे वडील हे चांगले कसलेले पैलवान होते. त्यांनी हा निर्णय घेतला. पहिलेपासून आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.

ते तिशीत आल्यावर त्यांनी पैलवानी सोडली. पण जेव्हा ते पैलवानी करत होते तेव्हा पण हमाली करत होते. खुराक-पाण्यासाठी पैसे नसायचे त्यामुळे पैलवानी करता करता ते हमाली करायचे,” असं सिकंदरने सांगितलं.

2018 पासून कोल्हापुरातून पैलवानीला सुरुवात

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोहोळमध्ये सिकंदरचा सराव सुरु होता. पण त्याच्या बरोबरीचे पैलवान तालमीत नव्हते. बाकी मुलं ही लहान होती. त्यामुळे सिकंदरच्या वडिलांनी आणि त्याच्या वस्तादांनी त्याला कोल्हापुरातील गंगावेश तालमीत पाठवायचा निर्णय घेतला. तेव्हा तो अठरा वर्षांचा होता.

सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याच्या खऱ्या पैलवानीला गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरुवात झाली.

“माझा योग्य डाएट गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरु झाला. विश्वास हरगुळे हे माझे कोच आहेत. इथे आल्यानंतर 2018 साली मी पहिली स्पर्धा जिंकली,” सिकंदरने सांगितलं.

2018 साली सिकंदरने कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक कुस्तीची स्पर्धा जिंकली. यामध्ये त्याने काही नामांकित पैलवानांचा पराभव केला. या स्पर्धेचं बक्षिस म्हणून त्याला एक बुलेट गाडी आणि एक लाख रुपये रक्कम मिळाली.

यानंतर आठ दिवसांनी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात कुस्तीच्या स्पर्धा झाल्या. यातही सिकंदर विजयी झाला. यानंतर त्याची राज्यात आणि पंजाब, हरियाणामधल्या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये घोडदौड सुरु झाली.

त्याने 2020 साली महान भारत केसरी ही स्पर्धाही जिंकली . सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याने आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

“2019 च्या सुरुवातीला मी गोल्ड मेडल जिंकलो. राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला मेडल मिळाली. आतापर्यंत मी 200-250 स्पर्धांमध्ये तरी खेळलो असेन. मी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जॉर्जियामध्ये अंडर 23 मध्ये भाग घेतला होता,” सिकंदरने सांगितलं.

कुस्तीतल्या विजयांसोबत घरात आर्थिक सुबत्ता

कुस्तीच्या स्पर्धांमधला विजयाच्या मालिकेमुळे सिकंदरच्या घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा बदलली आहे. आता घरात सुबत्ता आली आहे असं सिकंदर सांगतो.

“मी तालमीत असताना कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होतीच. ते स्वत:चं पोट मारुन मला खुराक द्यायचे. वडिलांना हमालीतून रोजचे जे शंभर दोनशे रुपये सुटायचे त्यातले पैसे ते मला खुराक साठी द्यायचे. 2017-2018 साली त्यांना खूप चणचण सहन करावी लागली.

मला पैलवान करण्याची त्यांचं इतकं भक्कम स्वप्न होतं की ते स्वत:च्या खाण्याकडेही लक्ष देत नव्हते. जमलेले सगळे पैसे खूराकसाठी मला द्यायचे. आता घराची परिस्थिती चांगली झाली आहे. आई वडिलांना आनंद वाटतो. परिस्थिती आता मी चांगली करुन ठेवली आहे."

पहिले माझ्या वडिलांकडे सायकल होती. ते सायकल फिरायचे. आता वडिलांकडे इतक्या गाड्या झाल्या आहेत की त्यांना कोणती गाडी वापरु असं होतं. त्यांनी एक गाडी वापरली तर त्या गाडीचा महिनाभर नंबर येत नाही. घर बांधलं. जागा घेतली. शेत घेतलं. पुण्यात फ्लॅटही घेतले. आता वडिलांना हमाली करायची गरज उरली नाही,” सिकंदरने सांगितलं.

महाराष्ट्र केसरी जिंकण्याचं स्वप्न

महाराष्ट्र केसरी विजेता, कुस्ती
फोटो कॅप्शन, महाराष्ट्र केसरीच्या किताबाच्या लढतीला झालेली गर्दी

जानेवारी 2023 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात झाली. या स्पर्धेत सिकंदर सेमी फायनल पर्यंत पोहोचला होता. माती विभाग सेमी फायनल मध्ये त्याची लढत पैलवान महेंद्र गायकवाडसोबत झाली. या लढतीत सिकंदरचा पराभव झाला. पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदरचा पराभव झाला अशी चर्चा सोशल मिडीयावर त्याच्या समर्थकांकडून सुरु झाली.

या लढतीनंतर सिकंदरनेही माध्यमांसमोर प्रतिक्रीया दिली. “महाराष्ट्र केसरीमध्ये झालं त्याकडे मी लक्ष देत नाही. जे झालं ते चुकीचं झालं एवढंच मी म्हणू शकतो,” असं सिकंदरने बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं.

यावर्षी जरी महाराष्ट्र केसपी स्पर्धेमधून सेमी फायनलमधूनच सिकंदरला बाहेर पडावं लागलं असलं तरिही पुढच्या वर्षी पुर्ण तयारीनिशी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरणार असल्याचं सिकंदरने सांगितलं.

“आता आमचा सगळ्यांचा फोकस हा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा जिंकणं आहे. आता मी पुढे दोन महिने आराम करेल. मग गावाकडचे सिजन सुरु होईल. मग दोन महिने मी सिजन करेल. त्यानंतरचे आठ-नऊ महिने फक्त महाराष्ट्र केसरीच्या सरावाकडे लक्ष देईन. महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा महाराष्ट्राचं ऑलिम्पिक आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकणं हे माझं लहानपणापासूनच स्वप्न आहे,” असं सिकंदरने सांगितलं.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकून हिंद केसरी स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असल्याचंही त्याने सांगितलं.

पंजाब, हरियाणातले कुस्तीचे सामने

सिकंदरने पंजाब आणि हरियाणाच्या पैलवानांसोबतही सामने खेळले आहेत. त्याभागात कुस्तीचे दोन सिजन त्याने खेळले. हिंदकेसरी पैलवान गौरव मच्छिवाला, पैलवान सतनाम सिंग यांसारख्या नामांकित खेळाडूंसोबत त्याने सामने रंगवले.

महाराष्ट्रापेक्षा पंजाब आणि हरियाणात कुस्तीगीरांना जास्त सोयी सुविधा मिळत असल्याचं सिकंदरने सांगतिलं. त्यामुळे तिथले पैलवान महाराष्ट्रातल्या पैलवानांपेक्षा पुढे असल्याचं तो म्हणाला.

“मी हरियाणा, पंजाबमध्ये महान भारत केसरी ही स्पर्धा जिंकली. मी दोन सिजन तिकडे खेळलो. तिकडचे पैलवान हे अतिशय कसलेले असतात. तिकडचे २-३ नंबरवरचा पैलवान हा आपल्याकडच्या एक नंबर पैलवानाच्या तोडीचा असतो.

हरियाणा पंजाब हे कुस्तीमध्ये महाराष्ट्रापेक्षा खूप पुढे आहेत. आपल्याकडे पैलवानांना सुविधा मिळत नाहीत. प्रॅक्टीस साठी स्टेडीयम, चांगल्या प्रतीच्या मॅट्स उपलब्ध होत नाहीत,” सिकंदरने सांगितलं.

सोशल मीडियाचा वापर

यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे सिकंदरची लोकप्रियता समोर आली. सिकंदरच्या सांगण्यानुसार त्याला त्याच्या प्रसिद्धीची कल्पना आहे.

“मला कल्पना आहे की मी प्रसिद्ध आहे. मी सोशल मिडीयाचा वापर करतो. लहान गावांतलेही लोक जे कुस्तीवर आणि माझ्यावर प्रेम करतात ते मला फॉलो करतात,” सिकंदर सांगतो.

यावर्षीच्या महाराष्ट्र केसरीतल्या पराभवाची सल मनात न ठेवता पुढच्या वर्षी जिंकण्याचा सिकंदरचा प्रयत्न आहे.

हे वाचलंत का?