जम्मू-काश्मीर : कलम 370 हटवणं वैध, सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची सुप्रीम कोर्टाची सूचना

चंद्रचूड

फोटो स्रोत, Supreme court

    • Author, उमंग पोद्दार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

राज्यघटनेतील कलम 370 हटवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (11 डिसेंबर) वैध ठरवला.

कलम 370 हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, "राज्यघटनेतील कलम 370 हटवण्यासाठी घटनात्मक आदेश जारी करण्यासाठी राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करणे आम्ही वैध ठरवतो."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी लडाख वेगळा करण्याच्या निर्णयाची वैधताही कायम ठेवली आहे.

सरन्यायाधीश म्हणाले की, “सॉलिसिटर जनरल यांनी जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल असं विधान केलं होतं. लडाख वेगळे करण्याचा निर्णय आम्ही कायम ठेवतो. आम्ही निवडणूक आयोगाला पुनर्रचना कायदा आणि कलम 14 अंतर्गत लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे निर्देश देतो.”

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

सप्टेंबरपर्यंत निवडणुका घेण्याची सूचना

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.

कलम ३७० हटवण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या निर्णयाची वैधता कायम ठेवली.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, "भारतीय निवडणूक आयोगाने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलावीत, असे आम्ही निर्देश देतो."

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.

निकाल देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, "राष्ट्रपती राजवटीत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही. कलम 370 ही युद्धाच्या बाबतीत करण्यात येणारी एक तरतूद होती. आपण या कलमाचा मजकूर पाहिला तरी हे स्पष्ट होतं की ही तात्पुरती तरतूद होती."

सर्वोच्च न्यायालय म्हणाल की, "भारतात विलीन झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्वाचा अधिकार नाही."

2019 मध्ये, केंद्रातील भाजप सरकारने कलम 370 रद्द केले आणि जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले.

या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात ज्यांनी या प्रकरणी निकाल दिला आहे त्यात न्यायमूर्ती संजय किशन कौल, बीआर गवई आणि सूर्यकांत यांचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टाने असंही म्हटलं की, कलम 370(3) अंतर्गत, कलम 370 अस्तित्वात नसल्याबद्दल अधिसूचना जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार जम्मू आणि काश्मीर संविधान सभा विसर्जित झाल्यानंतरही कायम आहे.

कलम 370 ही राज्यातील युद्धसदृश परिस्थितीमध्ये करण्यात येणारी तात्पुरती व्यवस्था होती आणि जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं घटनेच्या कलम 1 आणि 370 वरून स्पष्ट होतं असंही सुप्रीम कोर्टाने सांगितलंय.

या घटनापीठाने 16 दिवसांच्या उलटतपासणीनंतर यावर्षी 5 सप्टेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता.

या प्रकरणी एकूण 23 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्त्यांमध्ये नागरी संस्था, वकील, राजकारणी, पत्रकार आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

याचिकाकर्त्यांनी कलम 370 रद्द करण्याची आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती.

मुळात हे कलम काय आहे? ते का हटवलं? त्याबद्दल सरकार आणि याचिकाकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? हे जाणून घेऊया.

1. कलम 370 काय आहे?

भारतीय घटनेतल्या कलम 370 नुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना तिथे लागू होणार नव्हती.

राज्यघटनेचं कलम 1 वगळता कोणतंही कलम जम्मू काश्मीरला लागू नव्हतं. भारत देश हा राज्यांचा समूह आहे असं या कलमात म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरची वेगळी राज्यघटना होती. या राज्यघटनेत बदल करण्याचे आणि ती लागू करण्याचे अधिकार फक्त राष्ट्रपतींना होते. मात्र त्याला राज्य सरकारची मान्यताही गरजेची होती.

नरेंद्र मोदी-अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

तसंच संसदेला फक्त परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि दळणवळण या क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार होता. तसंच या कलमात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यावरही बंधनं घालण्यात आली होती.

जम्मू काश्मीर विधानसभेच्या संमतीने राष्ट्रपती या दुरुस्त्या करतील अशी तरतूद करण्यात आली होती.

जम्मू काश्मीर विधानसभेची स्थापना 1951 मध्ये करण्यात आली होती. त्यात 75 सदस्य होते. या सभेत जम्मू आणि काश्मीरची घटना तयार करण्यात आली होती. 1956 मध्ये राज्याची वेगळी घटना तयार झाल्यावर ही विधानसभा बरखास्त करण्यात आली होती.

काश्मीरचं भारताबरोबर विलिनीकरण करण्यात 370 हा मोठा अडथळा आहे असं सुरुवातीपासूनच भाजपला वाटत होतं. निवडणूक जाहीरनाम्यातही त्यांनी अनेकदा कलम 370 आणि 35A काढून टाकण्याचं आश्वासन दिलं होतं.

कलम 35A 1954 साली राज्यघटनेत घालण्यात आलं होतं. या कलमामुळे जम्मू काश्मीरच्या राहिवाशांना विशेष अधिकार मिळाले होते. राज्यात मालमत्ता विकत घेणं आणि तिथला अधिवास या बाबतीत विशेष अधिकार मिळाले होते.

2. हे कलम कसं काढून टाकण्यात आलं?

ही कायदेशीर प्रक्रिया अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची होती.

5 ऑगस्ट 2019ला राष्ट्रपतींनी एक आदेश काढला. त्यानुसार एक घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार राज्याची घटना समिती हीच आता राज्याची विधानसभा असेल असा प्रस्ताव मांडण्यात आला.

तसंच राज्य सरकार हे राज्यपालांच्या समकक्ष असतील.

हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जेव्हा घटनादुरुस्ती झाली तेव्हा राज्यात डिसेंबर 2018 पासून राष्ट्रपती राजवट लागू होती. जून 2018 मध्ये भाजपनं पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर सहा महिने तिथे राज्यपालांचं शासन होतं आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट होती.

इतर वेळी राष्ट्रपतींना राज्य विधानसभेची परवानगीची आवश्यकता होती. मात्र राष्ट्रपती राजवट असल्यामुळे विधानसभेच्या परवानगीची गरज भासली नाही.

शस्त्रं

फोटो स्रोत, Reuters

या आदेशामुळे केंद्र सरकारला कलम 370 मध्ये त्यांच्या मनाप्रमाणे दुरुस्ती करायला वाव मिळाला.

दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींनी आणखी एक आदेश दिला. त्यानुसार भारतीय राज्यघटनेतल्या सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू करण्यात आल्या. त्यामुळे राज्याला देण्यात आलेल्या विशेष राज्याचा दर्जा गेला.

9 ऑगस्ट 2019ला संसदेनी आणखी एक कायदा संमत केला. त्यानुसार राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा स्थापन करण्याचा निर्णय झाला. लडाखला तो मान मिळाला नाही.

3. त्यानंतर काय झालं?

जम्मू-काश्मीर

फोटो स्रोत, Reuters

जम्मू काश्मीरमध्ये 5 ऑगस्टपासून लॉकडाऊन लावण्यात आला. तिथे संचारबंदी लागू करण्यात आली. फोन आणि इंटरनेट बंद करण्यात आलं. हजारो लोकांना आणि काही राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं, अटक करण्यात आली आणि काहींना नजरकैदेत ठेवण्यात आलं.

हजारो सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले.

काही महिन्यानंतर म्हणजे जानेवारी 2020 मध्ये 2G इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली. 4G सेवा फेब्रुवारी 2021 मध्ये बहाल करण्यात आली.

370 कलम रद्द केल्यावर या निर्णयाविरुद्ध अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. ऑगस्ट 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं. यावर्षी ऑगस्ट मध्ये कोर्टाने या प्रकरणी अंतिम सुनावणी घेण्यास सुरुवात केली.

4. या केसमधील याचिकाकर्ते कोण?

या केसमध्ये 23 याचिकाकर्ते होते. त्यात अनेक नागरी संघटना, वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यापैकी काही याचिकाकर्ते म्हणजे जम्मू काश्मीर पीपल कॉन्फरन्स, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि खासदार अकबर लोण, जम्मू काश्मीरचे संवादक राधा कुमार यांचा समावेश आहे.

सत्यपाल मलिक

फोटो स्रोत, Getty Images

5. याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं?

याचिकाकर्त्यांच्या मते कोर्टाने कलम 370 बद्दलचा आणि जम्मू काश्मीरचं विभाजन राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात करण्याचा निर्णय रद्द करावा.

त्यांच्या मते कलम 370 ही कायमची तरतूद होती आणि त्यात बदल करावयाचा असल्यास घटनासमितीची परवानगी आवश्यक होती.

मात्र ती 1956 मध्येच विसर्जित करण्यात आलं होतं. कलम 370 रद्द करण्याचा निर्णय हा त्या सामीलनाम्याच्या विरोधात जाणारा होता, ज्यामुळे जम्मू काश्मीर भारताचा भाग झाला होता.

तसंच हा निर्णय लोकांच्या मर्जीविरुद्ध घेतल्याचा युक्तिवाद सुद्धा याचिकाकर्त्यांनी केला.

याचिकाकर्त्यांचं म्हणणं असंही आहे की, जेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती, तेव्हा ही घटनादुरुस्ती होऊ शकत नव्हती. राज्यपाल, जे केंद्र सरकारद्वारा नियुक्त असतात, त्यांनी घटनादुरुस्ती करताना आणि नंतर कलम 370 हटवताना विधानसभेप्रमाणे काम केलं.

त्याचप्रमाणे एखाद्या राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करण्याची परवानगी नाही. कारण त्यामुळे राज्याचे अधिकार कमी होतात. कारण केंद्रशासित प्रदेशांवर केंद्राचा अधिकार चालतो.

6. सरकारने आपल्या निर्णयाचं समर्थन कसं केलं?

सरकारचा युक्तिवाद आहे की कलम 370 ही एक तात्पुरती तरतूद होती. घटना समिती बरखास्त झाल्यामुळे विधानसभेला ते पद स्वीकारावं लागलं. तसं झालं नसतं तर तरतुदीत कधीच सुधारणा होऊ शकली नसती.

सरकारचं म्हणणं आहे की, या बदलामुळे जम्मू-काश्मीर भारतात पूर्णपणे विलीन झालं आहे. भारतीय राज्यघटना तिथे पूर्णपणे लागू नसल्याने राज्यातील नागरिकांसोबत भेदभाव केला जायचा, असा सरकारचा दावा होता.

याशिवाय, सरकारने असंही म्हटलंय की राष्ट्रपती राजवटीत त्यांनी किंवा राज्यपालांनी पारित केलेले आदेश हे राज्य विधानसभेने पारित केलेल्या आदेशांच्या बरोबरीचे आहेत. त्यामुळे राष्ट्रपती राजवटीत परिस्थिती बदलल्याने हे काम बेकायदेशीर ठरत नाही.

अमित शाह

फोटो स्रोत, RSTV

सरकारचं असंही म्हणणं आहे की, त्यांच्याकडे राज्यांची पुनर्रचना करण्याचे सर्वाधिकार आहेत. सरकार राज्याचं नाव, क्षेत्रफळ, सीमा बदलू शकतं आणि राज्याचं केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनही करू शकतं.

याशिवाय सरकारने असंही म्हटलंय की जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा होईल, तेव्हा सरकार जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करेल.

विशेष दर्जा काढून घेतल्याने राज्यातील विकास, पर्यटन आणि कायदा व सुव्यवस्थेला चालना मिळाली, असंही सरकारतर्फे सांगण्यात आलंय. त्यामुळे ते एक सुयोग्य पाऊल होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)