You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना बेळगावसाठी काय केलं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रश्न #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. शरद पवारांनी चारवेळा मुख्यमंत्री असताना बेळगावसाठी काय केलं? बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रश्न
माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी बेळगाव प्रश्नाबाबत आमचाही संयम सुटेल, असं सांगत 48 तासांचा अवधी सरकारला देऊन, त्यानंतर बेळगावात जाणार असे स्पष्ट केले होते.
त्यावर आता सरकारकडूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय केलं? आता तेथे काय दिवे लावणार? असा प्रश्न त्यांना शिंदे गटातर्फे केला जात आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षात सामिल झालेले माजी आमदार विजय शिवतारे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “48 तासांत शरद पवार तिकडे जाऊन काय दिवे लावणार आहेत? उगीच काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलत आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी काय केलं? असा माझा सवाल आहे. हा वाद आता सुप्रीम कोर्टात आहे, तिथे चांगल्या पद्धतीने बाजू मांडून निर्णय घेता येतील.”
2. चांगली माणसं कितीदिवस बाहेर ठेवणार? फडणवीसांचा थोरांताना टोला
सत्यजित तांबे यांनी अनुवाद केलेल्या सिटिझनविल या पुस्तकाचे प्रकाशन काल 7 डिसेंबर रोजी झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
सत्यजित तांबे यांच्या पुस्तकाचे आणि त्यांच्या कामाचे, त्यांच्या व्यासंगाचे देवेंद्र फडणवीस यांनी तोंडभरुन कौतुक केले. त्याचप्रमाणे यावेळेस विविध पक्षातील नेतेही उपस्थित होते. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले, 'बाळासाहेब, माझी एक तक्रार आहे. सत्यजीतसारखे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार आहात? जास्त दिवस बाहेर ठेवू नका, नाहीतर आमचाही डोळा त्यांच्यावर जातो. कारण चांगली माणसं जमाच करायची असतात.'
या विधानानंतर बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे आणि उपस्थितांना हसू आवरले नाही.
3. जगदीप धनखड यांनी पहिल्याच दिवशी दिले शिस्तीचे धडे
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे संचलन करण्यास कालपासून सुरुवात झाली. उपराष्ट्रपती झाल्यावर राज्यसभेचे ते प्रथमच संचलन करत आहेत.
काल 7 डिसेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या अभिनंदनपर भाषणाने सुरुवात झाली.
पंतप्रधान, राज्यसभेचे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन करुन आपापल्या अपेक्षा व्यक्त केल्या.
विरोधी पक्षनेत्यांसह अनेक लहान पक्षातील नेत्यांनी आपल्याला सभागृहात अधिक वेळ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
दिवसभरात नेत्यांच्या उत्तराच्यावेळेस अधूनमधून होणाऱ्या गदारोळावेळी धनखड यांनी कडक शिस्तीची भूमिका घेतल्याचे दिसले.
नेत्यांच्या बोलण्यात अडथळे आणणाऱ्या खासदारांची त्यांनी योग्य शब्दांत शिकवणीही घेतली. आपण राज्यसभेत आहोत, आपल्याकडे सर्वांचं लक्ष आहे, याची जाणिव खासदारांना करुन दिली.
ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
4. राज ठाकरे यांचं सीमावादावर पत्रक
बेळगाव प्रश्नावर सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रात नव्याने चर्चा-वाद सुरू असताना विविध पातळ्यांवर त्याचे पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करुन आपली भूमिका प्रसिद्ध केली आहे.
टाईम्स नाऊ मराठीने या पत्रकाची बातमी प्रसिद्ध केली आहे.
या पत्रकात राज ठाकरे म्हणतात, "मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं.
"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा."
"हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका.
"येणाऱ्या 2023 च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं."
ते पुढे लिहितात, "अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधं सोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं."
"कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. "
5. संपत्तीच्या वादातून आईलाच संपवलं, बेसबॉल बॅटने मारलं
संपत्तीच्या वादातून एका मुलाने आपल्या 74 वर्षांच्या वृद्ध आईला ठार मारल्याची घटना मुंबईत घडली आहे.
मुंबईतील कल्पतरू सॉलिटेर या सोसायटीत राहाणाऱ्या वीणा गोवर्धनदास कपूर यांना त्यांचाच मुलगा सचिन याने ठार मारले. त्यांचा मोठा मुलगा अमेरिकेत राहातो. त्या जुहू येथे आपल्या मुलाबरोबर राहात होत्या. दोघांमध्ये संपत्तीवरुन सतत वाद होत असत आणि तो वाद कोर्टातही गेला होता असे लोकमतने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
सचिनने बेसबॉल बॅटने आईची हत्या केली आणि नोकर छोटूच्या मदतीने तो बॉक्समध्ये भरुन माथेरानच्या दरीत फेकल्याचे या बातमीत म्हटले आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)