You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धवसाहेब' कोणाकोणापुढे वाकले 2.5 वर्षात हे सर्वांनी पाहिले आहे- शंभुराज देसाई
उद्धव ठाकरे यांनी काल सोमवार 5 डिसेंबर रोजी सरकारवर केलेल्या तक्रारीवर राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी आज उत्तर दिले आहे. जमत नसेल तर मी सरकार चालवतो असं सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर शंभुराज देसाई जोरदार टीका केली आहे.
“उद्धव ठाकरे कोणत्या आंदोलनात सामील झाले? 1997 पासून एकही मोर्चा आंदोलनात एकही पोलीस केस आदित्य ठाकेर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर दाखल झाली नाही. अडीच वर्षातली सव्वादोन वर्षं तुम्ही ऑनलाईन चालवला. चार लोकांना घेऊन तुम्ही सरकार चालवलं.
त्याच्याविरोधात उद्रेक झाल्यामुळे तुम्हाला सत्तेतून जावं लागलं. त्यातून आलेल्या नैराश्यातून ही वक्तव्यं होत आहेत. 2.5 वर्षात तुम्ही चालवत होता की अजित पवार हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे सरकार चालवण्याची भाषा उद्धव ठाकरेंच्या तोंडात शोभत नाही.” अशा शब्दांमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले आहे.
“उद्धवसाहेब दिल्लीला जाऊन कोणाकोणापुढे वाकले 2.5 वर्षात हे सर्वांनी पाहिले आहे. महापरिनिर्वाणदिनाला गालबोट लागू नये म्हणून आम्ही बेळगावला गेलो नाही. आमचं सरकार ताठ कण्याचं आहे.”
आम्ही शांततेच्या मार्गाने कर्नाटकात जात होतो मात्र तिथल्या सरकारने याला चुकीचं वळण दिलं. कर्नाटक सरकारने चुकीची भूमिका घेतली, असं मत मंत्री शंभुराज देसाई यांनी मांडलं आहे. ते पुढे म्हणाले, “आम्ही दौरा रद्द केलेला नाही. महापरिनिर्वाण दिनाच्या वेळी तिकडं गेल्याने या दिवसाला गालबोट लागलं असतं त्यामुळे आम्ही दौरा पुढे ढकलला आहे.”
महाराष्ट्र- कर्नाटक वाद, शिवाजी महाराजांबद्दल होणारी वक्तव्यं, राज्याबाहेर जाणारे उद्योग अशा विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर आज (5 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात फुटीची बीजं रोवली जात आहेत. काही गावं म्हणताहेत की, आम्हाला कर्नाटकात जायचंय, काही गावं म्हणतात आम्हाला तेलंगणात जायचंय, गुजरातमध्ये जायचंय. यापूर्वी असं काही झालं नव्हता.
"राज्यपाल शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांसारख्या अपमान करताहेत. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे," असं उद्धव यांनी म्हटलं.
"गुजरातच्या निवडणुकीपूर्वी इथले उद्योग गुजरातमध्ये गेले, आता काही महिन्यांनी कर्नाटकात निवडणुका आहेत. मग तिथली मतं मिळवण्यासाठी आपली गावं कर्नाटकला जोडणार का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
विधीमंडळाचं अधिवेशन 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी १७ तारखेला सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने एक भव्य मोर्चा काढला जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
या मोर्चामध्ये कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील हेही सहभागी होतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
सीमाभागांमधील गावांतून बाहेर पडण्याची मागणी होणं हे दुर्दैवी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार विधानं करत आहेत. पण त्यांना उत्तर देण्याची धमक तुमच्यात नाहीये का? असा प्रश्न अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.
राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत आणि नको ते उद्योग सुरू आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. कपिल पाटील, अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)