अंजू पाकिस्तानातून भारतात परतल्या, नाराज नवरा म्हणतो...

फेसबुकवर एका पाकिस्तानी व्यक्तीशी मैत्री केल्यावर त्याला भेटायला खैबर पख्तूनख्वाहला गेलेल्या अंजू भारतात परतल्या आहेत.

राजस्थानमधील भिवाडी येथे राहणाऱ्या अंजू पाच महिन्यांनी पाकिस्तानहून परतल्या आहेत.

भारतात आल्यावर एका प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी आनंदी आहे.”

जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही परत का आल्या तेव्हा त्या म्हणाल्या की मला आता काहीही भाष्य करायचं नाही.

अंजू यांचा पाकिस्तानील व्हिसा 21 ऑगस्टपर्यंत वैध होता. ऑगस्ट महिन्यात बातम्या आल्या होत्या की व्हिसा आणखी एक वर्षं वाढवण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या.

तेव्हा त्या बीबीसीशी बोलताना म्हणाल्या होत्या की त्या एकदा भारतात येऊन त्यांच्या मुलांना भेटू इच्छितात.

बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, “मी काही गोष्टी ठरवून इथे आली होती. मात्र घाईघाईत माझ्याकडून इथे बऱ्याच चुका झाल्या. इथे जे झालं त्यामुळे माझ्या कुटुंबाचा प्रचंड अपमान केला गेला.”

त्या दरम्यान त्या म्हणाल्या होत्या, “मी भारतात जाऊ इच्छिते. तिथे मी प्रसारमाध्यमांना तोंड देईन. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत. मी त्यांना सांगेन की माझ्याबरोबर कोणतीच बळजबरी केलेली नाही.

मी माझ्या मर्जीने इथे आले आहे मी माझ्या मुलाला मिस करते. आता सगळे माझ्यावर नाराज आहेत. मला फक्त माझ्या मुलांना भेटायचं आहे. त्यासाठी मी वाट्टेल ते करेन."

अंजू पाच महिन्यापूर्वी 29 वर्षांच्या नसरुल्लाह यांना भेटायला गेल्या होत्या. पाकिस्तान सोडण्याआधीचा एक व्हीडिओसुद्धा समोर आला आहे.

पहिल्या दिवसापासून मला इथे सगळं मिळालं. मी अतिशय आनंदी आहे असं त्या म्हणाल्या. तिथले लोक अतिशय चांगले आहेत. सगळ्यांनी माझा चांगला पाहुणचार केला. इथली लोक माझ्याशी चांगली वागली.

पाकिस्तानने अंजूला संरक्षण दिलं होतं.

नवरा काय म्हणाला?

अंजू भारतात परत आली यावर त्यांचा नवरा अरविंद यांना विश्वास नाही. ते अंजूशी एक शब्दही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. ते अतिशय नाराज देखील आहेत.

अंजूचा नवरा अरविंद यांनी बीबीसीशी संवाद साधला.

ते म्हणाले, “मी भारतात येतेय असा कोणताही मेसेज माझ्याकडे आलेला नाही. ती नेहमी खोटं बोलते. ती आली आहे हेही खोटंच आहे असं मला वाटतं.”

पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणाची प्रसारमाध्यमांत चर्चा होत असल्याने ते माध्यमांवर नाराज आहेत. ते म्हणतात, “मी दोन महिने माझ्या मुलांना कसं सांभाळलं हे विचारायला कोणी आलं नाही. आता ती भारतात आल्यावर सगळे मला छळताहेत.”

मला आणि माझ्या मुलांना सुखाने जगू द्या, अशी विनंती त्यांनी केली.

अंजू पाकिस्तानात गेल्याची माहिती माध्यमांकडून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

अरविंद यांनी भिवाडी येथील फुलबाग पोलीस ठाण्यात नसरुल्ला आणि अंजू यांच्या विरोधात FIR दाखल केला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)