सरगम कौशल : जम्मूच्या शाळेतली शिक्षिका ते मिसेस वर्ल्ड 2022

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये झालेल्या मिसेस वर्ल्ड 2021-2022 स्पर्धेत यंदा भारताची सरगम कौशल विजयी ठरली आहे.

याबाबात इन्स्टाग्रामवर पोस्ट करत सरगमनं लिहिलं आहे, “मोठी प्रतीक्षा आता संपली आहे. 21 वर्षांनंतर क्राऊन भारताकडे परत आला आहे.”

मूळची जम्मूची असलेली सरगम सध्या मुंबईत राहाते.

सरगमचं 12 पर्यंतचं शिक्षण जम्मूच्या प्रेझेंटेशन कॉन्वेंट हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर तिने बीएससी केलं.

नंतर जम्मू विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पुढे बीएड केल्यानंतर तिने शाळेमध्ये मुलांना शिकवणं सुरू केलं.

जम्मूमध्ये राहाणारे तिचे वडील जी.ए. कौशल यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "जेव्हा माझी मुलगी अडीच वर्षांची होती, तेव्हापासूनच मला ती अनन्य साधारण वाटायची. तिचा चेहरासुद्धा मला सर्वांत वेगळा वाटायचा. तिने 'मिस फेमिना'साठी जावं अशीसुद्धा माझी इच्छा होती.

पण कुठल्याही सौंदर्य स्पर्धांना जाण्यस ती फार तयार नासायची. 2017 मध्ये तिचं लग्न झालं आणि ती जम्मूतून बाहेर गेली.”

ते पुढे सांगतात, “लग्नानंतर ती आधी विशाखपट्टणम आणि नंतर मुंबईत गेली. मुंबईत गेल्यावर मी तिला म्हटलं आता तर तू मायानगरीमध्ये गेली आहेस. आतातरी सौंदर्य स्पर्धांमध्ये जा. तेव्हा तिने विचार सुरू केला आण महत्त्वाचं म्हणजे तिच्या पतीने तिला साथ दिली.”

सरगम यांचे पती भारतीय नौदलात ऑफिसर आहेत.

मी सांगितल्यानंतर माग तिने तयारी सुरू केली आणि मग 'मिसेस इंडिया' स्पर्धेत भाग घेऊन ती 2022ची स्पर्धा जिंकली. त्यात 51 स्पर्धक होते, असं जी. ए. कौशल पुढे सांगतात.

मिसेस वर्ल्ड स्पर्धेत जगातल्या 63 देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता.

सरगमचे वडील पुढे सांगतात, “आंतरराष्ट्रीय स्तरावरील एवढ्या सगळ्या सौंदर्यवती पाहिल्यानंतर सरगम यशस्वी होणार नाही, असं वाटलं होतं. पण तिचा आत्मविश्वास मला बळ देत होता. पहिल्या राउंडमध्ये 44 स्पर्धक बाहेर पडल्यानंतर मग आत्मविश्वास आणखी वाढला.

नॅशनल कॉस्ट्युम ऍन्ड एक्झॉटीक कॅटेगरीत तिला अवॉर्ड मिळाला. त्यानंतर ती पहिल्या सहामध्ये आली. त्यानंतर मात्र माझ्या हृदयात धाकधूक सुरू झाली आणि ती काही थांबण्याचं नावच घेत नव्हती.”

“आम्ही हे सर्व टीव्हीवर पाहात होतो आणि जेव्हा ती टॉप 3 मध्ये आली तेव्हा तर आमची स्थिती काय होती ते विचारूच नका तुम्ही.”

सोशल मीडियावर तुम्हाला बदल करण्याची संधी मिळाली तर बदलायला आवडेल, असा सवाल तिला विचारण्यात आला होता, तेव्हा तिने 'सायबर बुलिंग असं उत्तर दिलं.

त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये तिची निवड झाली. तेव्हा मात्र तिच्या पालकांना आता ती जिंकेल असा विश्वास आला.

"तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण मी जेव्हा टीव्ही पाहात होते तेव्हाच मला विश्वास होता की माझी मुलगी 100 टक्के जिंकणार आहे," असं सरगमची आई मीना कौशल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

तिथल्या सर्वच स्पर्धक प्रतिभावान आणि सुंदर होत्या. पण मला माझ्या मुलीवर मात्र पूर्ण विश्वास होता. तिच्या पतीचंसुद्धा हे स्वप्न होतं आणि ते आता खूष आहेत.

2001 मध्ये अदिती गोवित्रिकर यांनी हा किताब जिंकला होता. त्यांनी सरगम विषयी बोलताना ती अतिशय नम्र आणि लाघवी असल्याचं म्हटलंय.

त्या सांगतात, “जेव्हा मी पहिल्यांदा तिला भेटली तेव्हा तिच्यात फार आत्मविश्वास जाणवला. अशा स्पर्धांमध्ये येणाऱ्या सर्वच महिलांना ट्रेनिंग दिलं जातं. तिची उंची, शरीराची ठेवण सर्वच छान आहे.”

मी जेव्हा या स्पर्धेला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा या स्पर्धेबाबत कुणालाच फारशी माहिती नव्हती. तेव्हा लोकांना 'मिस वर्ल्ड' आणि 'मिस युनिव्हर्स'बद्दल माहिती होतं कारण तेव्हा ऐश्वर्या आणि सुष्मिता नुकत्याच जिंकल्या होत्या, असं आपल्या अनुभवाबाबत अदिती सांगतात.

“तेव्हा एका विवाहित स्त्रिला ग्लॅमरस दुनियेचे रस्ते बंद असायचे. एखादी महिला कुणाबरोबर नात्यात जरी असेल तरी तिला ते लपवावं लागे. अशात मग विवाहित महिलेला अभिनय आणि मॉडलिंगच्या क्षेत्रात स्वीकारलं जायचं नाही,” अदिती सांगतात.

त्यांच्यानुसार, जेव्हा त्या स्पर्धा जिंकून आल्या तेव्हा देशात विवाहित महिलांसाठी सैंदर्य स्पर्धा सुरू झाल्या. तेव्हा अनेक महिलांनी विवाहाआधी त्यांना 'मिस इंडिया'मध्ये भाग घ्यायचा होता असं बोलून दाखवल्याचं त्या सांगतात. पण आता तुमच्यामुळे हे शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या.

मिसेस वर्ल्डची स्पर्धा 1984 मध्ये खास लग्न झालेल्या महिलांसाठी सुरू झाली.

लग्न झालेल्या महिलांनासुद्धा ग्लॅमरच्या दुनियेत स्थान मिळावं याकरिता ही स्पर्धा सुरू झाल्याचं अदिती यांना वाटतं.

डेविड मारमेल यांनी या स्पर्धेची सुरूवात केली होती. या स्पर्धेत आतापर्यंत 8 वेळा अमेरिका, 2 वेळा श्रीलंका, पेरू आणि रशियाच्या सौंदर्यवतींनी बाजी मारली आहे.

अदिती गोवित्रीकर यांच्यानंतर आता सरगम कौशल यांच्या रुपानं भारताला दुसरी मिसेस वर्ल्ड लाभली आहे.

याशिवाय आर्यलंड, व्हिएतनाम, हाँगकाँगच्या महिलांनीसुद्धा ही स्पर्धा जिंकली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)