You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमितभाई, स्वप्नातही शिवाजी महाराजांचा अपमान करू शकत नाही - कोश्यारी
औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या कार्यक्रमात भाषणादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
शिवाजी महाराज जुन्या काळातले आदर्श असल्याचं म्हटल्यानं राज्यपाल कोश्यारींवर सर्व स्तरातून टीका सुरू झाली होती.
यानंतर राज्यपाल कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून स्पष्टीकरण दिलंय.
अमित शाहांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय की, "माझ्या भाषणातील एक छोटा भाग काढून माझ्या भाषणाचं भांडवल केलं गेलं. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणे म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे. शिकत असताना, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श होते. वर्तमानातील काही राजकीय व्यक्तीही आदर्श ठरु शकतात, असं मला म्हणायचं होते."
"मुगल काळात साहस, त्याग आणि बलिदानाचे मूर्तिमंत असलेल्या महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या वंदनीय महापुरुषांबाबत अपमानाची तर मी स्वप्नातही कल्पना करु शकत नाही," असंही राज्यपाल कोश्यारींनी पत्रात म्हटलंय.
आता खूप झालं, भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी - अमोल कोल्हे
आता खूप झालं, भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे.
आपल्या अमोल ते अनमोल या युट्यूब चॅनेलवर कोल्हे यांनी आज (20 नोव्हेंबर) एक व्हीडिओ प्रसिद्ध केला.
भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी यामध्ये संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, "डॉ. सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंगजेबाला या महाराष्ट्रात गाडलं. हाच खरा इतिहास आहे."
"तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये," असा इशारा अमोल कोल्हे यांनी दिला.
कोश्यारी, त्रिवेदी यांची वादग्रस्त वक्तव्ये
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे कोश्यारींवर टीका होताना दिसत आहे.
कोश्यारी हे काल (19 नोव्हेंबर) औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात सहभागी झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं.
या दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुणाचा आदर्श ठेवावा यासंदर्भात वक्तव्य केलं.
ते म्हणाले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे, ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे."
"मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील.
"शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. भीमराव आंबेडकरा यांच्यापासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील," असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
सुधांशू त्रिवेदी यांचंही वादग्रस्त वक्तव्य
एकीकडे काल भगतसिंह कोश्यारी यांनी वरील वक्तव्य केलं. त्याचवेळी भाजप प्रवक्ते यांनी टीव्ही वादविवाद कार्यक्रमादरम्यान केलेलं एक वक्तव्यही वादग्रस्त ठरलं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा पत्र लिहून माफी मागितली होती. त्यावेळी अनेकजण राजकीय समस्यांतून बाहेर येण्यासाठी माफीनामा लिहित होते, असं त्रिवेदी म्हणाले आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा गेल्या एका आठवड्यापासून महाराष्ट्रात आहे. यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच आयोजित एका सभेत राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्यावर टीका केली होती. सावरकर यांनी इंग्रजांना घाबरून माफी मागितली होती, असं त्यांनी म्हटलं होतं.
यावर राज्यातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटासह मनसेने याचा विरोध दर्शवला. हा वाद ताजा असताना याच संदर्भात आज तकच्या एका टीव्ही डिबेट कार्यक्रमात भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी सहभागी झाले होते.
"त्यावेळी प्रस्तावित फॉरमॅटमध्ये सावरकर यांनी माफी मागितली तर काय झालं, त्यांनी ब्रिटिश संविधानाची शपथ तरी नाही घेतली," असं ते म्हणाले.
याच दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाला 5 वेळा पत्र लिहिल्याचं वक्तव्य केलं.
संतप्त राजकीय प्रतिक्रिया
कोश्यारी यांच्यासोबतच त्रिवेदी यांच्या या वक्तव्यांवर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनीही कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर पाठवा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोश्यारी यांच्या वरील वक्तव्याचा निषेध करत शिवसेना खासदार संजय राऊत आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा बदला घेण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.
तसंच त्यांनी सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्यावरही टीका केली.
शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो, असं आव्हाड म्हणाले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
इतकी वर्ष महाराष्ट्रात काढूनही महाराष्ट्राचा विचार, संस्कृती, आस्था व परंपरा न कळणं यापेक्षा दुर्दैव नाही, असं सावंत म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी केली.
अन्यथा त्यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याआधीही शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते.
'समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय?' अशा आशयाचं विधान कोश्यारींनी फेब्रुवारीत केलं होतं.
तसंच जुलै महिन्यात मुंबईविषयीची त्यांनी केलेल्या विधानाचीही बरीच चर्चा झाली.
“मुंबई-ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत." असं वादग्रस्त विधान कोश्यारींनी कलं होतं.
तसंच, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे अनुक्रमे 13 आणि 10 वर्षांचे आहेत. त्या वयात मुलगा मुलगी काय विचार करतात, असं त्यांनी म्हटल्यानंतर त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)