मुंगी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मुंगीचे पाय का तोडते? वाचा मुंग्यांच्या अद्भूत विश्वातल्या रंजक गोष्टी

मुंग्या एकमेकांशी कसा संवाद साधतात?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सुबगुणम कन्नन
    • Role, बीबीसी तामिळ

संशोधकांनी मानवी समुदाय आणि मुंग्यांचा समाज यांच्यात बरंच साम्य असल्याचा शोध लावला आहे.

विशेषतः त्यांची सामाजिक संरचना आणि एकमेकांमधील नातेसंबंध यांच्यात खूप सारखेपणा दिसून येतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे त्यांच्या वागणुकीतील गुंतागुंतसुद्धा समोर येते.

वैज्ञानिकांना फ्लोरिडा येथील कार्पेंटर मुंग्यांमध्ये एक अजब गोष्ट सापडली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी या मुंग्या दुसऱ्या मुंग्यांचा पाय तोडतात, असं या संशोधनातून समोर आलं आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ वर्झबर्गमध्ये एरिक फ्रँक हे बिहेव्हियरल इकॉलॉजिस्ट असून ते या शोधनिबंधाचे प्रमुख लेखक आहेत. ते नोंदवतात, “आपल्या आजूबाजूच्या प्राण्यांच्या शरीराचे भाग तोडून आपला जीव वाचवण्याचा प्राण्यांमधला हा पहिलाच प्रसंग आहे.”

या संशोधनातून प्राण्यांच्या सर्जरीबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरंतर प्राणी एकमेकांना खूप मदत करतात. मुंग्या त्यांच्या जखमी मित्र-मैत्रिणींना मदत करण्यासाठी अगदी जीवाचं रान करतात. पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याचा अवयव तोडणे या घटनेची पहिल्यांदाच नोंद झाली आहे.

या निरीक्षणामुळे मुंग्यांची, गुंतागुंतीच्या काळात त्यांच्या नि:स्वार्थी कृतीची आणि वागुणकीबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे.

मुंग्यांची भांडणं

एकदा माझ्या दारासमोर एक नाट्यमय युद्ध होताना मी बघितलं. एका मुंगीने दुसऱ्या मुंगीचं डोकं तिच्या अँटिनावर ठेवलं आणि पायाने तो निर्जीव देह ओढून नेत होती. हे दृश्य म्हणजे एखादं युद्ध जिंकल्यावरचं दृश्य वाटत होतं.

हे दृश्य मला अतिशय रंजक वाटलं. मी ते नीट बघितलं आणि मला लक्षात आलं की ही साधीसुधी बाब नाही. हा मुंग्यांच्या दोन वसाहतींमधील खराखुरा संघर्ष आहे.

मुंग्यांची भांडणं

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. प्रियदर्शन धर्मराजन बंगळुरू येथील ATREE (Ashoka Trust for Research in Ecology and the Environment) मध्ये कीटकतज्ज्ञ आहेत. त्यांच्यामते ही लढाई दोन कारणांमुळे होते.

धर्मराजन म्हणतात की, "जर मुंग्या वेगळ्या वारुळातून आल्या असतील तर एकाच प्रजातीच्या दोन मुंग्यांमध्ये सुद्धा संघर्ष होऊ शकतो. हा संघर्ष अन्नपदार्थ आणि निवारा यांच्यामुळे उद्भवतो. मी जो संघर्ष बघितला तो सुद्धा यामुळेच झाला असावा.

"दुसऱ्या एका प्रसंगात मानेला बाक पडलेल्या दोन मुंग्यांमध्ये तो संघर्ष झाला होता. अन्नपदार्थावरुन हा संघर्ष झाला असावा. मुंग्यांमध्ये अनेक कारणांमुळे लढाई किंवा संघर्ष होतो. त्यातूनच त्यांच्या गुंतागुंतीच्या सामाजिक वागणुकीबद्दल अधिक माहिती मिळते."

गुलाम तयार करणाऱ्या मुंग्या

मुंग्यांच्या समाजाची वागणूक ही माणसासारखीच असते.

उदाहरणार्थ, काही मुंग्या या शेतीचं अतिशय नाजूक काम करतात. त्या पानं आणि काड्या एकत्र करतात, त्यांच्यावर बुरशी लावतात, वाढवतात आणि ही बुरशी त्यांच्या बिळात अन्नपदार्थ म्हणून आणतात.

तर काही मुंग्या कीटकपालन करतात. त्यांच्या बिळात त्या मावा म्हणजे एक प्रकारची कीड आणतात आणि त्यातून अनेक पोषक तत्त्व असलेले मिल्कड्यू नावाचं रसायन तयार करतात. डॉ. प्रियदर्शन म्हणतात की, मुंग्यांची ही वागणूक माणसाच्या शेती आणि पशूपालनासारखीच आहे.

मुंग्यांच्या बाबतीत सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे काही मुंग्या गुलाम तयार करण्याचं कामही करतात.

या मुंग्या इतर मुंग्यांच्या बिळावर हल्ला करतात, त्यातल्या अगदी अळ्यांच्या स्वरूपात (Larvae) असलेल्या मुंग्यांचं अपहरण करतात आणि आपल्या वसाहतीत त्यांना गुलाम म्हणून वागवतात आणि मोठंही करतात.

मुंगी

फोटो स्रोत, Getty Images

गोव्यातील 'अरण्य इनव्हायरमेंटल रिसर्च सेंटर'मधील डॉ. प्रणॉय सांगतात, “गुलाम तयार करणाऱ्या मुंग्यांचं त्या गुलामांशी काहीही नातं नसतं. फक्त ज्या मुंग्यांना बंदी करून आणलं आहे त्यांना त्यांची वसाहत नीट ठेवण्यासाठी रोजची कामं करण्यासाठी आणलेलं असतं.”

आक्रमण असेल किंवा गुलाम तयार करण्याची प्रक्रिया असेल या दोन्ही प्रक्रियेत आपल्या शत्रू वसाहतीतून जगण्याचा एखादा स्रोत तयार करणं किंवा तिथून उचलून आणणं हाच मुंग्यांचा उद्देश असतो.

मात्र बंगलोर येथील ATREE मधील रिसर्च फेलो सहानश्री म्हणतात, “अशावेळी ज्या वस्तीवर आक्रमण झालं आहे त्या वस्तीतील मुंग्या जोरदार प्रतिकार करतात. मात्र हल्ला करणाऱ्या मुंग्यांनी तिथल्या राणीचा ताबा घेतला, तर मात्र बचावाचे सगळे प्रयत्न गळून पडतात आणि ती वसाहत हल्लेखोर मुंग्यांना शरण जाते.”

मुंग्यांची सामाजिक रचना

जर मुंग्यांच्या राणीचं अपहरण केलं तर त्यांची वसाहत संपल्यात जमा असते. त्यामुळे मुंग्यांची सामाजिक रचना आणि त्यातील राणीचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात.

डॉ. प्रणॉय बैद्य सांगतात, “एखादी वसाहत तयार करण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी राणीची भूमिका महत्त्वाची असते. जर तिचा पराभव झाला तर वसाहतीचं अस्तित्त्व धोक्यात येतं. त्यामुळे हल्ला झाला तर राणीचा जीव वाचवण्यासाठी अनेक मुंग्या आपल्या जीवाची बाजी लावतात.”

मुंग्यांच्या वसाहतीत, सर्व मुंग्या मादी असतात. पण त्यांच्यामधील काही निवडक मुंग्यांमध्येच प्रजननाची क्षमता असते. या मुंग्यांना 'राणी मुंगी' असे म्हणतात. वसाहतीत काही पुरुष मुंग्या सुद्धा असतात. त्यांची संख्या कमी असते आणि राणीबरोबर प्रजननाची प्रक्रिया पार पाडणं हे त्यांचं एकमेव काम असतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

प्रजननासाठी राणी मुंगी ही नर मुंगीची निवड करते. या प्रक्रियेत राणी मुंगी ही एका वेगळ्या वसाहतीत किंवा वारुळात राहणाऱ्या नर पुरुष मुंगीला शोधते.

प्रजननाची प्रक्रिया झाल्यानंतर राणी मुंगी येते, तिचे पंख पसरवते आणि जमिनीच्या खाली एक नवीन वारूळ तयार करते. तिथे ती अंडी घालायला सुरुवात करते. अंड्यांचं रूपांतर कामगार मुंग्यांमध्ये होतं आणि त्या नवीन वसाहत तयार करण्यात मदत करतात.

या प्रक्रियेमुळे वसाहत पुढे नेण्यासाठी राणीचा सहभाग किती महत्त्वाचा आहे ते कळतं आणि इथं राणीचं अपहरण केलं तर पूर्ण वसाहतच नष्ट का होते याचंही स्पष्टीकरण मिळतं.

मुंग्यांच्या वसाहतीत जबाबदाऱ्यांची विभागणी

मुंग्यांच्या वसाहतीत जबाबदारीची विभागणी योग्य पद्धतीने होते. विविध प्रकारच्या मुंग्यांना वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी दिली जाते. हे विभाजन कसं होतं ते पाहूया.

राणी मुंगी : राणी मुंगीचं मुख्य काम प्रजननाचं आणि अंडी घालण्याचं आहे. हे मोठ्या प्रमाणात त्या करतात. एका दिवसात राणी मुंगी 100 ते 1000 अंडी घालते. एकदा प्रजनन झालं की राणी मुंगी तिचे पंख गुंडाळून घेते आणि प्रजनन करत नाही. ती अंडी घालण्यावर आणि वसाहतीच्या पुढच्या पिढ्यांवर लक्ष देण्याचं काम करते.

पुरुष मुंगी : प्रजननाला मदत करणं हे पुरुष मुंगीचं एकमेव काम आहे. तो राणी मुंगी बरोबर एका पवित्र बंधनात अडकतो, पण वसाहतीचं कुठलंच काम करत नाही.

मुंगी

फोटो स्रोत, Getty Images

कामगार मुंगी : या मुंग्या विविध प्रकारची कामं करतात. वारूळ तयार करणं, वसाहतीची देखभाल करणं, अन्नपदार्थ मिळवणं, अंड्यांची निगा राखणं अशी महत्त्वाची कामं त्या करतात. वसाहतीच्या रोजच्या कामांसाठी आणि वसाहत टिकून राहण्यासाठी कामगार मुंग्या महत्त्वाच्या असतात.

सैनिक मुंगी: सैनिक मुंगीला वसाहतीचं संरक्षण करण्याचं काम असतं. तसंच हल्ल्यापासून वसाहतींचं रक्षण करणं, इतर वसाहतींबरोबर होणाऱ्या युद्धात सहभागी होणं ही त्यांची कामं असतात. वसाहतीचा विस्तार करणं आणि ती सुरक्षित ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते.

कीटकतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शन यांच्यामते वसाहतीची सुरुवात एका राणी मुंगीने होते. मात्र तिचा विस्तार हजारो मुंग्यांमध्ये होतो. राणी मुंगीशिवाय इतर मुंग्या प्रजनन करत नाहीत आणि वसाहतीच्या विस्तारासाठी त्या राणी मुंगीवर अवलंबून असतात. जर राणी मुंगी हरवली तर संपूर्ण वसाहत कोसळते.

मुंग्यांचा त्याग

मी नुकताच हरियाणामध्ये काळ्या मुंग्यांचा एकमेकांशी झालेला संघर्ष बघितला. ती एका मोठ्या युद्धाची सुरुवात होती. सैनिक मुंग्या त्यांच्या बिळाचं रक्षण करत होत्या. अनेक मुंग्या त्यात मरत होत्या. तर अन्न आणणाऱ्या मुंग्या स्वतःचं रक्षण करून इतर मुंग्याशी सुयोग्य समन्वय ठेवून बिळात परत जात होत्या.

त्यातून एक प्रश्न उपस्थित होतो. अन्न शोधणाऱ्या मुंग्यांना हल्ल्याचा सुगावा कसा लागतो? डॉ. प्रणॉय बैद्य यांच्या मते, त्याचं रहस्य मुंग्यांच्या संवाद साधण्याच्या कलेत दडलं आहे.

ते म्हणतात, “मुंग्यांची संवादाची रचना अतिशय व्यवस्थित असते. ही रचना आणि त्यांचा सामाजिक स्वभाव यामुळेच वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी जीव पणाला लावण्याची त्यांची तयारी असते.”

मुंगी

फोटो स्रोत, Getty Images

मुंग्या एकत्रितपणे परिस्थितीला तोंड देतात. वसाहतींना होणारा फायदा वैयक्तिक फायद्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे याची त्यांना जाणीव असते.

बैद्य पुढे म्हणतात, “आपली आरोग्यदायी पिढी जन्माला यावी आणि आपले गुण त्यांच्यात यावे हा कोणताही सजीव प्राण्यांचा उद्देश असतो. मुंग्यांच्या वसाहतीमधील सर्व मुंग्या या एकमेकांच्या बहिणी असतात. त्यांच्यातील 75 टक्के जनुकं सारखी असतात. राणी मुंगी ही एकमेव प्रजननक्षम मुंगी असते आणि तिची अंडी वसाहतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची असतात.”

“त्यामुळे कामगार आणि सैनिक मुंग्या अन्नपदार्थ गोळा करणं आणि वसाहतीचं रक्षण करणं, अळ्यांना अन्नपदार्थ खाऊ घालणं तसंच नवीन मुंग्यांच्या विकासाकडे लक्ष देणं यावर भर देतात.”

वसाहतीसाठी अत्यंत समर्पित असतात म्हणूनच जेव्हा वसाहतीवर हल्ला होतो तेव्हा त्या अगदी जीवाची बाजी लावण्यासाठी सुद्धा तयार असतात. आता त्यांच्या संवादाच्या व्यवस्थेकडे पुन्हा वळूया.

मुंग्या एकमेकांशी कसा संवाद साधतात?

मुंग्या संवाद आणि जगण्यासाठी त्यांच्या सेन्सरी अँटिनावर अवलंबून असतात. त्यांच्या डोक्यातून निघणारे दोन मिशांसारखे केस त्यांची रोजची काम करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात.

डॉक्टर प्रणॉय सांगतात “मुंग्यांचा अँटिना नसेल तर त्यांना जगणं कठीण होतं. त्यांचा एकमेकांशी संवाद रासायनिक पद्धतीने होतो. मुंग्या त्यांच्या शरीरातून फेरोमोन नावाचं एक रसायन स्रवतात. इतर मुंग्या त्याची नोंद घेतात आणि एकमेकांना ओळखतात.”

मुंगी

फोटो स्रोत, Getty Images

उदाहरणार्थ, जेव्हा एखादी मुंगी अन्नपदार्थ शोधते आणि तिला लक्षात येतं की हा पदार्थ एकटीसाठी खूप मोठा आहे तेव्हा ती फेरोमोन्सच्या सहाय्याने त्या जागेवर खूण करून ठेवते. हे केमिकल जीपीएससारखं काम करतं आणि वसाहतीच्या इतर मुंग्यांना तिथे जाण्यासाठी मार्गदर्शन करतं.

हरियाणामध्ये मी जे युद्ध बघितलं त्याबद्दल डॉक्टर प्रियदर्शन सांगतात, “कामगार मुंग्यांनी संवादाची साधनं वापरून या संघर्षाची माहिती दिली असेल आणि ते वसाहतींकडे परत आले असतील.”

डॉक्टर बैद्य पुढे सांगतात, “जर मुंग्यांनी त्यांचा अँटिना गमावला, तर त्यांना फिरणं, संवाद साधणं, धोक्याची सूचना मिळणं कठीण होतं. त्यामुळे अँटिना त्यांच्या जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)