You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र बंद मागे, मुंबईत 90 बसची तोडफोड
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, आणि नाशिक शहरात आंदेलन करण्यात आलं. काही ठिकाणी तुरळक तोडफोडीच्या घटना घडल्या.
ठळक घाडामोडी
- डॉ. प्रकाश आंबेडकर यांची बंद मागे घेण्याची संध्याकाळी घोषणा.
- राज्यात विविध शहरांमध्ये तोडफोड.
- भीमा कोरेगाव आणि राज्यात हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईची सकल मराठा क्रांती मोर्चाची मागणी.
- पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा.
- मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हिंसाचारावर संसदेत निवेदन करण्याची काँग्रेसची मागणी.
- बसप नेत्या मायावतींची दोषींवर कडक कारवाईची मागणी.
रात्री 20.01 - मुंबईत 90 बसची तोडफोड
मुंबईत आज दिवसभरात बेस्टच्या एकूण 3370 बस पैकी 3208 बस रस्त्यावर उतरवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 90 बसची तोडफोड करण्यात आली. तसंच 4 बसचालक काचा लागून जखमी झाले. अशी माहिती बेस्टच्या पीआरओंनी दिली आहे. तर पुण्यात पीएमपीच्या 55 बसची तोडफोड झाली आहे.
सं. 18.28 - मुंबईतील लोकलसेवा सुरळीत
मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे.
सं. 17.27 - सखोल चौकशीची सकल मराठा क्रांती मोर्चाची मागणी
भीमा कोरेगाव आणि संबंध राज्यात दंगल घडवणाऱ्या सूत्रधारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर यांनी केली.
मृत युवकाच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. वढूमध्ये 29 डिसेंबर रोजी झालेल्या घटनेत 51 जणांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो मागे घ्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे.
दु. 16.15 - बंद मागे
संप मागे घेत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची घोषणा.
"बंदचा कॉल मागे घेतोय. हा प्रश्न देशाच्या ऐरणीवर आलेला आहे. लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. शांततेचं राज्य अपेक्षित आहे का अराजकतेचं हा निर्णय लोकांनी घ्यावा," असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
"जो न्याय याकूबला तोच न्याय भिडेंना, एकबोटेंना लावण्यात यावा," अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
दु. 15.49 - कांजुरमार्गमध्ये रेलरोको
मुंबई : कांजुरमार्ग रेल्वे स्थानकात पुन्हा गोंधळ, रेलरोकेमुळे लोकांचा रुळांवरून चालत प्रवास.
दु. 16.05 - मराठा समाजाची पत्रकार परिषद
सकल मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्हा यांची शिवाजीनगरमध्ये बैठक झाली. त्याची माहिती देण्यासाठी पुण्यात 4:30 वाजता होणार पत्रकार परिषद.
दु. 15.49 - बसची तोडफोड मुंबई
मुंबईतील एलबीएस मार्गावरील बेस्ट बसच्या तोडफोडीचा हा फोटो बीबीसीचे प्रतिनिधी शरद बढे यांनी पाठवला आहे.
दु. 15.20 - पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्या घरावर मोर्चा
या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या पुण्यातील घरावर मोर्चा काढण्यात आला होता.
दु. 15.22 - डोंबिवलीमधील आंदोलन
दु. 15.16 - मुंबईतील वरळीमध्ये रास्तारोको
वरळीजवळच्या अॅट्रीया मॉलजवळ सीफेसकडे जाणाऱ्या रस्त्यावर रास्तारोको.
दु. 15.09 - मुंबई विमानतळ
मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीत आहे. पण कर्मचारी मात्र कामावर उशीरानं पोहोचत आहेत.
दु. 14.59 - महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
महाराष्ट्र सदनाबाहेर विद्यार्थी संघटना आणि काही कार्यकर्त्यांचे आंदोलन.
दु. 14.53 - वरळी, मुंबई
दुपारी 1 वाजेपर्यंत बेस्टच्या 48 बसेसची तोडफोड करण्यात आली. तसंच 4 बसचालक काचा लागून जखमी झालेत.
दु. 14.00 - वरळी, मुंबई
वरळीतील अत्रे चौकात सुरू असलेलं आंदोलन.
दु. 13.50 - डोंबिवली
दु. 13.45 - पुणे
पुणे स्टेशन आरटीओ ते जहांगीर रस्ता बंद
दु. 13.30 - औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पेपर पुढे ढकलले.
आंबेडकर नगर परिसरात दगडफेक, जळगाव रोडवरील वाहतूक वळवली.
दु. 13.15 -वाहतूक स्थिती
दु. 13.15 वाजता - बेस्ट बसचं नुकसान
कांजूरमार्ग येथील गांधी नगर चौकात एका पाठोपाठ उभ्या असलेल्या बसेसच्या काचा फोडण्यात आल्या.
दु. 13 वाजता - कांजूरमार्गला रेल्वे रोखली
कांजूर परिसरातही आंदोलनकर्त्यांनी गर्दी केली होती. कांजूर मार्ग रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दु. 12.55, डोंबिवलीत रेल रोको
दु. 12.45- घाटकोपरला वाहतूक अडवली
लोकल्स उशीराने
दु. 12.30 वाजता - संसदेत पडसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी निवेदन करावं. काँग्रेसची मागणी.
पंतप्रधान मौनीबाबा असल्याचा खरगे यांचा आरोप.
काँग्रेसला महाराष्ट्रातल्या घटनांचं राजकारण करायचं आहे, भाजपचा आरोप
दुपारी 12 वाजता - घाटकोपर
दुपारी 12.15 वाजता - लोकल्स उशीरा
दुपारी 12 वाजता -अंधेरी
सकाळी 11.35 -घाटकोपरमध्ये रास्ता रोको
पुणे - दांडेकर पुलाजवळ 3 एसटी बसवर दगडफेक
सकाळी 11.30 - मुंबईची एसी लोकल रद्द
मुंबईत एसी लोकलची सेवा दिवसभरासाठी रद्द करण्यात आली आहे.
नालासोपारा येथे अप आणि डाऊन रेल्वे सेवा पूर्ववत
अमरावतीत बससेवा बंद
वाहतुकीवर परिणाम
नालासोपारा येथे आंदोलकांनी रेल्वे सेवा रोखली आहे.
नाशिक एस टी बसेस सुरळीत सुरू, औरंगाबाद, धुळे आणि नगरला जाणाऱ्या बसेस मात्र अजूनही बंद.
लासलगाव येथे एक बस फोडली, जाळण्याचा प्रयत्न मात्र चालकानं वेळीच बस पोलीस स्टेशनकडे नेली.
संसदेत चर्चा?
भीमा-कोरेगाव प्रकरणी काँग्रेसनं संसदेच्या दोन्ही सभागृहात स्थगन प्रस्ताव दिला आहे. लोकसभेत मल्लिकार्जून खरगे यांनी तर राज्यसभेत रजनी पटेल यांनी प्रस्ताव दिला आहे.
सकाळी 10.30 - बेस्टला फटका
बंदचा फटका बेस्टला - कांदिवली-आकृली, दिंडोशी-हनुमान नगर, चांदिवली-संघर्ष नगर, खैराणी रोड-साकिनाका, सहार कार्गो, मुलुंड चेकनाका, जिजामाता नगर या मार्गावर बसेस बंद आहेत. बसवर दगडफेकीची घटना नाही, अशी माहिती बेस्टनं दिली. बेस्टच्या 2645 फेऱ्या सुरू आहेत.
सकाळी 10.00 - चेंबूर परिसरात रास्ता रोकोचा प्रयत्न
चेंबूर, गोवंडी परिसरात काल झालेल्या दगडफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नालंदा परिसरात बीबीसी प्रतिनिधींनी टिपलेली काही दृश्य. रास्ता रोकोच्या प्रयत्नात असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलीस बाजूला करत आहेत.
काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी खबरदारी म्हणून ताब्यातही घेतलं आहे.
बीबीसी प्रतिनिधी शरद बढे यांनी टिपलेला चेंबूर- घाटकोपरमधले ताजे अपटेड्स दाखवणारा व्हीडिओ -
सकाळी 9.50 पुणे- बारामती एसटी बंद
बारामती बंद असल्यानं त्या मार्गावरील सर्व बसेस बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पुणे-बारामती मार्गावरील बसेस बंद राहतील, अशी सूचना स्वारगेट आगाराच्या व्यवस्थापकांनी चौकशी खिडकीवर लावली आहे.
सकाळी - 9.45 -पश्चिम रेल्वे सुरळीत सुरू
पश्चिम रेल्वेवर विरार आणि गोरेगावमध्ये झालेल्या आंदोलनांनंतर स्थगित झालेली रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेनं ट्वीट केलं आहे.
सकाळी 9.15 औरंगाबादेत इंटरनेट बंद
औरंगाबाद शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी दिली.
शहर व परिसरात सोशल मीडियाच्याद्वारे अफवा पसरू नये यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले. औरंगाबादेत दोन हजार पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मंगळवारी 22 ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
सकाळी 9.00 - विरार आणि ठाण्यात रेल रोको
सकाळी साडेसात वाजल्यापासून ठाणे स्टेशनवर आंदोलक जमू लागल्याची माहिती मुक्त छायाचित्रकार अनिल शिंदे यांनी दिली. तीन हात नाका परिसरात काही वेळासाठी आंदोलकांनी इस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखून धरला.
सकाळी 8.45 - पश्चिम रेल्वेवर परिणाम
विरार स्टेशनवर साडेआठच्या सुमारास आंदोलकांनी काही काळ रेल्वे रोखून धरल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली. 15 -20 मिनिटांसाठी विरार स्टेशनमध्ये रेल रोको करण्यात आलं.
विरार लोकलनं प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यानंतर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.
सकाळी 8.30 -डबेवाल्यांची सेवा बंद
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो, म्हणून डबेवाल्यांची सेवा बुधवारी बंद असेल, असं मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे सांगण्यात आलं आहे.
"बंदमुळे डबेवाल्यांच्या सेवेवरही परिणाम होऊन डबे वेळेवर कार्यालयात पोचले नाहीत तर त्याचा उपयोग नाही. म्हणूनच, बुधवारी मुंबईत जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे", असं असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितलं.
भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोखा कायम राखावा, असं आवाहनही मुंबईचे डबेवाले करत असल्याचं सुभाष तळेकर यांनी सांगितलं.
सकाळी 8.15 - यामागे षडयंत्र, दोषींवर कडक कारवाई हवी- मायावती
भीमा कोरेगावची घटना थांबवता आली असती. यामागे षडयंत्र असावं, असा आरोप बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषदेत केला. दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
"दलितांनी कायम गुलाम आणि लाचार बनून राहावं असं काही लोकांना वाटतं, जातीव्यवस्थेविरोधातल्या लढ्याचा इतिहास त्यांना पुसून टाकायचा आहे," असं त्या म्हणाल्या.
"भाजप काय किंवा काँग्रेस काय या पक्षांचा इतिहास बघा... दलितांना त्यांनी पुढे येऊ द्यायची संधी दिली नाही", असंही मायावती म्हणाल्या.
सकाळी 8 - काही ठिकाणी बस अडवल्या, उर्वरित लोकल-बससेवा सुरू
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवर नेहमीसारखी गर्दी दिसत नसली, तरीही बससेवा सुरळीत सुरू आहे. पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये लोकल आणि बससेवा सुरू आहे.
बुधवार 3 जानेवारी
सकाळी 7.30 चेंबूरनाक्याची परिस्थिती सुरळीत
चेंबूर परिसरात काल दुपारी बसगाड्या फोडण्यात आल्या होत्या. या भागात तणाव होता. पण आता परिस्थिती सर्वसामान्य झाली आहे. या संदर्भात बीबीसी मराठीच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा..
रात्री 9.30 : चौकशीसाठी दलित न्यायाधीश नकोत - प्रकाश आंबेडकर
भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी न्यायाधीशांमार्फत करण्याच्या निर्णयाचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्वागत केले आहे. पण हे न्यायाधीश दलित असू नयेत अशी मागणी त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केली आहे.
या प्रकरणात पोलिसांमार्फत निःपक्ष चौकशी होण्याची शक्यता वाटत नाही, असंही ते म्हणाले. या न्यायाधीशांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे अधिकार द्यावेत, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.
8.30 : मिलिंद एकबोटे यांची प्रतिक्रिया
भीमा कोरेगावमध्ये घडलेली घटना दुर्देवी आहे आणि हा प्रकार गैरसमजातून घडला आहे. आम्ही या प्रकाराचा निषेध करतो. या प्रकरणी एका निरपराध व्यक्तीचा बळी गेला, हे अत्यंत दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद एकबोटे यांनी दिली आहे.
काही फुटीरवादी संघटना या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन माझी आणि समस्त हिंदू आघाडीची बदनामी करत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय.
राहुल गांधी यांचं संघावर शरसंधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची फॅसिस्ट विचारसरणी दलितशोषणावर आधारित असल्याची टीका राहुल गांधी ट्विटरवरून केली आहे.
"दलित समाजाच्या तळाशीच राहायला पाहिजे अशी ही विचारधारा सांगते. उना, रोहित वेमुला आणि आता भीमा कोरेगाव ही त्याचीच उदाहरणं आहेत," असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
7.5 : मुंबईत वाहतूक पूर्ववत
7.01 : राज्यात 176 ST ची तोडफोड
हिंसाचारात राज्यभरात 167 ST बसची तोडफोड झाल्याची MSRTC च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची माहिती.
7 : भीमा कोरेगावमधील परिस्थितीचा आढावा
6.45 : परिवहन मंत्र्यांचे भावनिक आवाहन
"एसटी बसेस तुमच्याच आहेत, कृपया त्यांची मोडतोड करुन सर्वसामान्य माणसांचे दळणवळणाचे हक्काचे साधन हिरावून घेऊ नका," असं भावनिक आवाहन परिवहन मंत्री आणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे.
6.35 : मुंबईत 20 बसचे नुकसान
बेस्ट प्रशासनानं प्रसिद्धी पत्रक जारी करून मुंबईमध्ये एकूण 20 बसचं नुसकान झाल्याचं म्हटलं आहे.
6.30 : CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू - सुवेज हक
भीमा कोरेगावमधल्या हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली आहे. काही समाजकंटकांनी हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. हिंसेला जबाबदार असणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करतील, असं ते म्हणालेत.
"दरवर्षी हा कार्यक्रम होतो. काल दोन गट समोरासमोर आल्यानंतर दगडफेक झाली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत जमावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराचाही वापर केला," असं त्यांनी सांगितलं.
सीसीटीव्हीवर उपलब्ध फुटेजच्या साहाय्यानं संशयितांना शोधण्याचं काम सुरू आहे, तसंच काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे, असं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी 2 गटांत वाद झाला होता. पण पोलिसांनी हस्तक्षेप करून तो मिटवला होता. पण काही समाजकंटकांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला आहे. पोलीस त्यांच्यावर कडक कारवाई करतील, असं ते म्हणालेत.
तसंच परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
6 : मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द
दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुण्यातला कार्यक्रम रद्द केला आहे. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणार होते.
5.30 : गुन्हा दाखल
पिंपरी पोलीस ठाण्यात मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांना दिली आहे.
संध्याकाळी 5 : चेंबूर परिसातील आढावा
तसंच घाटकोपर आणि चेंबूर परिसरात दुकानं बंद करण्यात आली आहेत. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक खोळंबली आहे.
दरम्यान भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसंच त्यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
औरंगाबाद शहरात याचे पडसाद उमटले आहेत. औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
दुपारी 4 : एसटीच्या 134 बसचे नुकसान
राज्यभरात एसटीच्या बसचं मोठं नुकसान झालं आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात 134 गाड्यांची तोडफोड झाल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सर्वात जास्त 21 एसटी बस औरंगाबाद जिल्ह्यात फोडण्यात आल्या आहेत. तर परभणीमध्ये 17 आणि अहमदनगर जिल्ह्यात 11 एसटी बस फोडण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नाशिक शहरात ५ बसचं किरकोळ नुकसान झालेलं आहे. औरंगाबाद, धुळे आणि अहमदनगरकडे जाणाऱ्या महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने बंद केल्याची माहिती MSRTC च्या विभागीय व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी दिली आहे.
नाशिक शहरात १४०० पोलीस तैनात केले आहेत. तसंच नाकाबंदी सुद्धा केली जात आहे. नाशिक पोलिसांनी 660 शांतता बैठका घेतल्या.
तसंच शहरात दंगल विरोधी पथकाच्या 2 तुकड्यांना पाचारण करण्यात आलं आहे. शीघ्रकृती दलाच्या जवानांना सुद्धा तैनात करण्यात आलं आहे.
दुपारी 3 : मुंबईतील वाहतुकीवर परिणाम
मुंबई तसंच उपनगरांमध्ये आंदोलकांनी रस्तारोको आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मुंबईच्या पूर्व उपनगरांतल्या वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला आहे. चेंबूर आणि गोवंडी परिसरातील दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.
गोवंडीजवळ दगडफेक झाल्यानॆ हार्बर रेल्वेची वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.
लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. सोशल मीडियावर प्रक्षोभक तसंच भावना भडकवणाऱ्या गोष्टी अपलोड करू नयेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
दुपारी 3.30 : मुंबईत मोठा बंदोबस्त
कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या हिंसाचाराचे पडसाद मुंबईतही उमटू लागल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बेस्टच्या बसेसना लक्ष्य करण्यात आलं होतं. जमावाला पांगवण्याचं काम पोलीस करत होते.
दुपारी 2 : चौकशीचे आदेश
पुणे परिसरातल्या सणसवाडीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
भीमा कोरेगावच्या लढ्याला 200 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कोरेगाव भीमामधल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोक सोमवारी उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्ह्यातल्या सणसवाडी परिसरात झालेल्या दगडफेकीच्या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशी केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
तसंच मृताच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
दुपारी 1 : अफवांना बळी पडू नका
सोशल मीडियावरच्या अफवांना बळी पडू नका. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सकाळी 11 : शांततेचे आवाहन
दरम्यान, या प्रकरणाची सरकारनं पुरेशी दखल घ्यायला हवी होती, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी या घटनेचं राजकारण करू नये, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
लोकांनी शांतता ठेवावी असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. तसंच हिंसा भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
ही बातमी सतत अपडेट केली जात आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)