You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चीन म्हणतो, अमेरिकेनं भारत-चीन सीमावादापासून दूर राहावं
चीनमधलं कम्युनिस्ट सरकार हिंस्त्र श्वापदासारखं असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे.
भारत दौरा आटोपून आता श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.
माईक पॉम्पिओ यांच्या या विधानाची कोलंबो येथील चिनी उच्चायुक्तालयाने गंभीर दखल घेतली. त्यांनी याचा निषेध नोंदवत आपली प्रतिक्रिया लेखी स्वरुपात कळवली आहे.
श्रीलंका आणि चीनचे एकमेकांसोबतचे संबंध कायम राखण्यासाठी आपण स्वतः सक्षम आहोत. तिसऱ्या कोणत्याही देशाने याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, असं चिनी दूतावासाने म्हटलं आहे.
दौरा आदरयुक्त आणि लाभदायक असला पाहिजे. समस्या वाढवण्यासाठी दौरा केला जाऊ नये, असंही चीनने म्हटलं.
पॉम्पिओ यांनी भारत दौऱ्यावरसुद्धा चीनबाबत काही वक्तव्यं केली होती. चीनसोबतच्या सीमावादादरम्यान भारताने स्वतःला एकटं समजू नये, अमेरिका त्यांच्यासोबत उभा आहे, असं पॉम्पिओ म्हणाले होते. यावेळीसुद्धा चीनचा रोख होता.
दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनीही ट्वीट करून याबाबत स्पष्टीकरण दिलं. "श्रीलंका नेहमीच परराष्ट्र धोरणात तटस्थ भूमिका घेतो. आम्ही शक्तिशाली देशांच्या भांडणात पडणार नाही," असं त्यांनी म्हटलं. यावेळी, राजपक्षे यांनी ट्विटरवर पॉम्पिओ यांना टॅगही केलं.
माईक पॉम्पिओ आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांच्या 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत दौऱ्याबाबतसुद्धा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री सतत खोटी वक्तव्यं करत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतच्या नियमांचं ते उल्लंघन करत आहेत, असंही चीनने बुधवारी (28 ऑक्टोबर) म्हटलं होतं.
भारताविरुद्धचा सीमावाद द्विपक्षीय मुद्दा आहे. तिसऱ्या कोणत्याही पक्षाच्या हस्तक्षेपाला याठिकाणी जागा नाही, असं चीनने म्हटलं.
पॉम्पिओ यांचा दौरा आणि त्यांच्या टीकेवरून चीनकडून दोन वेळा आक्षेप नोंदवण्यात आला आहे. भारतातील चिनी दूतावास आणि चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडूनसुद्धा याबाबत प्रतिक्रिया आली.
मंगळवारी (27 ऑक्टोबर) पॉम्पिओ आणि मार्क एस्पर यांच्यात मंत्रीस्तरीय चर्चा झाली.
भारताकडून या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाख सिंह सहभागी झाले होते.
सार्वभौमता आणि स्वातंत्र्य यांच्यावर हल्ला झाल्यास अमेरिका भारतीय जनतेसोबत उभा राहील, असं पॉम्पिओ यांनी बैठकीत म्हटलं होतं.
पॉम्पिओ यांनी यावेळी चीनच्या कम्युनिस्ट सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं,"चीनला लोकशाही, कायदा, पारदर्शकता, स्वातंत्र्य आणि भू-राजकीय स्थैर्य यांच्याशी काहीच देणं-घेणं नाही."
चीन विरुद्ध अमेरिका
अमेरिका पुन्हा शीत युद्धाची मानसिकता निर्माण करत असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला.
अमेरिकेने भारत-चीन सीमावादात स्वतःला अडकवून घेऊ नये, असं चीनने म्हटलं.
"सीमावाद हा भारत आणि चीनमधला मुद्दा आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये तिसऱ्या कोणत्याही पक्षासाठी जागा नाही. सध्या सीमेवरील परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही पक्ष चर्चेतून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिग यांनी म्हटलं.
तर अमेरिका दोन वेगवेगळ्या समुहांना एकमेकांशी भिडवण्याच्या प्रयत्नात आहे, अशी प्रतिक्रिया भारतातील चिनी दूतावासानेही दिली होती.
चीनने म्हटलं, "चीन द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थैर्य, शांतता आणि विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाण्याचं समर्थन करतो. भारताविरुद्धचा सीमावाद द्विपक्षीय आहे. दोन्ही देश राजकीय आणि लष्करी पातळीवर बातचीत करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांकडे ही समस्या सोडवण्यासाठीचा विवेक आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी कोण्या तिसऱ्याची गरज नाही."
भारत आणि चीन लडाखमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून कोअर कमांडर पातळीवर आठ टप्प्यांची बातचीत करणार आहेत.
अजूनसुद्धा सीमेवर 'जैसे थे' स्थिती कायम होऊ शकली नाही. वास्तविक पाहता नियंत्रण रेषेवर अजूनही तणावपूर्ण परिस्थिती आहे. मे महिन्यापूर्वीची परिस्थिती अजूनपर्यंत निर्माण करता आली नाही.
अमेरिका कोव्हिड-19 विरुद्ध निपटण्यात अपयशी ठरला. त्यामुळे त्यांना आपल्या समस्यांचं खापर दुसऱ्यांवर फोडायचं आहे, असंही चीनने म्हटलं.
चिनचे परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटलं, "यावर्षी आमचं सरकार कोव्हिड-19 विरुद्धची लढाई जिंकण्यात यशस्वी ठरलं. दुसरीकडे अमेरिका कोव्हिड-19 बाबत अपयशावरून चीनवर आरोप करून स्वतःला वाचवण्याचे प्रयत्न करत आहे. अमेरिकेने पहिल्यांदा आपल्या समोरच्या समस्यांना तोंड द्यावं. नंतर त्यांनी इतरांवर आरोप करावेत."
चीनच्या कम्युनिस्ट सरकारचं मुखपत्र म्हणून ओळखलं जाणारं इंग्रजी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने पॉम्पिओ यांचा दौरा आणि बेसिक एक्सचेंज अँड को-ऑपरेशन अॅग्रीमेंट (बेका) यांचा उल्लेख आपल्या संपादकीय लेखात केला आहे.
ग्लोबल टाईम्सने आपल्या संपादकीय लेखात लिहिलं, "काही लोकांना वाटतं की अमेरिका आणि भारताच्या लष्करी कराराने नवीन सुरुवात केली. पण हे फक्त मानसिक आणि क्षणिक आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान झालेला हा करार प्रभावी ठरणार नाही. चीनने याला घाबरण्याची गरज नाही."
"भारत बऱ्याच काळापासून चीनबाबत संशय राहिला आहे. सध्याच्या सीमावादामुळे हा संशय आणखी बळावला आहे. पण भारत अमेरिकेशी जवळीक साधून चीनला सीमेवर मात देऊ शकत नाही.
भारत अमेरिकेजवळ जाऊन चीनवर मानसिक दडपण वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पण गलवान खोऱ्यात पँगाँग सरोवरापर्यंत ही गोष्टी खरी ठरणार नाही."
दोन्ही देश कोरोना व्हायरसच्या साथीत प्रचंड अडकले आहेत. त्यामुळेच ते अशा प्रकारच्या चर्चा करत आहेत. दोन्ही देशांनी हे काम काही दशके आधी केलं असतं तर आधी विस्तारवाद करणाऱ्या देशाविरुद्ध त्यांनी भूमिका घेतली असती तर त्यांना यश मिळालं असतं. पण दोन्ही देशांनी चुकीच्या वेळी चुकीचं लक्ष्य निवडलं आहे, असं ग्लोबल टाईम्सने लिहिलं.
ते पुढे लिहितात, "चीनला आपला भू-राजकीय विस्तार करायचा नाही. पण चीनचे बाकीच्या जगाशी असलेलं सहकार्य थांबवू शकणार नाही. पण अमेरिकेला चीनसोबत लढायचं आहे, तर आमच्या देशातून होणारं कृषी उत्पादनांचं निर्यात बंद करावं. आपल्या देशातील बर्गर, कोक आणि आयफोन आमच्या बाजारपेठेत विकणं त्यांनी बंद करावं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.