शेतकऱ्यांनी काढला ट्रॅक्टर्सचा ‘लाँग मार्च’, लागला 1100 किमीचा ट्रॅफिक जॅम

महाराष्ट्रातले हजारो शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी 2018च्या मार्च महिन्यात 'लाँग मार्च' करत मुंबईत दाखल झाले होते, तुम्हाला आठवत असेलच.

असंच एक शेतकरी आंदोलन आता झालंय नेंदरलँड्समध्ये. पण हे आंदोलन अनोखं होतं. कारण हे शेतकरी रस्त्यावर उतरले खरे, पण आपले ट्रॅक्टर्स घेऊन.

या ट्रॅक्टरस्वार शेतकऱ्यांमुळे मंगळवारी सकाळी 1,136 किलोमीटर्सचा अभूतपूर्व ट्रॅफिक जॅम झाल्याचं ANWB या मॉनिटरिंग संस्थेने म्हटलंय.

देशातल्या नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनाच्या समस्येला शेतकरी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आल्याने नेदरलँड्समधले शेतकरी संतापले.

देशातलं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक ठिकाणची वाहनांसाठीची वेग मर्यादा कमी करण्यात आली असून योग्यरीतीने काम न करणारी 'कॅटल फार्म्स' बंद करण्यासाठी अहवला मागवण्यात आलेला आहे.

पण या सगळ्या तपासातून हवाई उद्योगाला वगळण्यात येत असून आपल्याला लक्ष्य केलं जात असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

किती मोठा होता हा मोर्चा?

मंगळवारी पहाटे हे ट्रॅक्टर्स हायवेवर उतरले. यातले अनेक ट्रॅक्टर्स हायवेचं कुंपण पाडून तिथे आले. NOS या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार याबद्दल 3 जणांना अटक करण्यात आलीय.

द हेग (The Hague)च्या मध्यावर असणाऱ्या एका शेतात झालेल्या आंदोलनात ट्रॅक्टरवर स्वार झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2,200 शेतकरी या आंदोलनात होते.

हेगमध्ये असं आंदोलन झालं तर संपूर्ण नेदरलँड्समधले अनेक मुख्य रस्ते आणि हायवे ट्रॅक्टर्समुळे मंदावले.

संध्याकाळी जेव्हा आंदोलन संपल्यानंतर हे ट्रॅक्टर्स परतू लागले त्यावेळी पुन्हा एकदा दोन तास संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाला.

नेमकी समस्या काय आहे?

बांधकामासाठी वा शेतीउद्योगासाठीचे परवाने देण्याचे जे डच कायदे आहेत, त्यामुळे युरोपियन युनियनने घालून दिलेल्या निसर्ग संरक्षण कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं नेदरलँड्सच्या सर्वोच्च कोर्टाने - काऊन्सिल ऑफ स्टेटने जाहीर केलं. अमोनिया आणि नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन रोखण्यासाठीच्या या नियमांमुळे रस्ते आणि गृह बांधणी, विमानतळाच्या अनेक नवीन प्रकल्पांना ब्रेक लागला.

वायू प्रदूषण आणि जैवविविधतेवर नायट्रोजन ऑक्साईडचा मोठा परिणाम होतो आणि कार्बन डायऑक्साईडपेक्षाही या वायूमुळे मोठ्या प्रमाणता ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण होतो.

पशुधन संगोपनामुळेच नेदरलँड्समध्ये नायट्रोजन उत्सर्जनाची समस्या निर्माण झाली असल्याचा आरोप करण्यात आला. आणि हे उत्सर्जन कमी करण्यासाठी पशुधन संगोपन अर्ध्यावर आणण्यात यावं अशी सूचना मांडण्यात आली, आणि यामुळे शेतकरी संतापले.

तर पुढच्या वर्षी झँडवूर्ट (Zandvoort)मध्ये होणाऱ्या फॉर्म्युला वन रेसना परवानगी दिल्याने अनेक पर्यावरणावादी संस्थांनी सरकारवर टीका केलीय.

ग्रीन हाऊस उत्सर्जनाच्या 1990च्या पातळीच्या तुलनेत पुढच्यावर्षीपर्यंत 25%नी उत्सर्जन कमी करण्याचं डच सरकारचं उद्दिष्ट आहे. मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर वायूंचं उत्सर्जन घटवल्याने आतापर्यंत एकूण उत्सर्जन 15%नी कमी झाल्याचं आरोग्यविषयक संघटनांनी म्हटलंय.

घटनास्थळावरून...

अॅना होलिगन, बीबीसी न्यूज, द हेग

आपापल्या ट्रॅक्टर्सचे पिवळे दिवे फ्लॅश करत आणि हॉर्न्स वाजवत 'ग्रीन आर्मी' दाखल झाली. त्यांचा संदेश स्पष्ट होता - "शेतकरी नाहीत तर अन्न नाही", "तुम्हाला ब्रेड, मांस आणि फ्राईज आवडतात ना? मग शेतकऱ्यांशिवाय हे सगळं मिळू शकणार नाही".

सरकारला वातावरणातले बदल रोखण्यासाठीची त्यांची उद्दिष्टं गाठायची असल्याने शेती उद्योगाला लक्ष केलं जात असल्याची भावना या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये होती.

"अचानक सगळ्यांना या मुद्द्याची काळजी वाटतेय. मीडियामधून आमची चुकीची प्रतिमा मांडली जातेय, आम्हाला सगळा दोष दिला जातोय. हवामान बदलासाठीचा दोष आम्हाला दिला जातोय. पण वातावरणाचं जास्त नुकसान हे शेतकऱ्यांपेक्षा जास्त विमानांमुळे होतं. पण त्याबद्दल कोणीही बोलत नाही," विन्सेन्ट या 17 वर्षांच्या दुग्ध व्यवसाय असणाऱ्या शेतकऱ्याने मला सांगितलं.

शेतकऱ्यांचा रोष कमी करायचा असले तर त्यासाठी सरकारने मोटर रेसिंग, विमानतळ आणि इतर कंपन्यांचीही अशाच प्रकारे तपासणी करायला हवी.

हे नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)