You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाहा फोटो : शेतकरी लाँग मार्च - भेगाळलेल्या अन् जखमी पायांची हक्कांसाठी चाल
भारतीय किसान सभेनं आयोजित केलेल्या शेतकऱ्यांच्या नाशिक ते मुंबई लाँग मार्चनं आता मुंबईत प्रवेश केला आहे. नाशिक ते मुंबई हा जवळपास 180 किलोमीटरचा प्रवास ऐन ऊन्हात पुरुष, स्त्रिया, युवक हे स्लिपर, तुटक्या चपला आणि अनवाणी पायानं करत आहेत. चालूनचालून जखमा झाल्यानं त्यांच्या पायांच्या भेगा अधिकच गडद झाल्या आहेत. पण न थांबता न थकता हे शेतकरी हजारोंच्या संख्येनं मुंबईतील विधान भवनाकडे कूच करत आहेत.
नाशिकहून निघालेल्या या शेतकऱ्यांच्या पायात असलेल्या चपला या नावापुरत्याच असल्याने मुंबईपर्यंतचं अंतर चालल्यावर त्याचे परिणाम त्यांच्या पायावर दिसून येत आहेत.
शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चनं मुंबईत प्रवेश केला असून 12 मार्चला हे शेतकरी मुंबईतील नरीमन पॉईंट इथल्या विधान भवनाला घेराव घालणार आहेत.
रस्त्यावर पायी चालल्यानं अनेकांच्या पायाला जखमा झाल्या असून पायातल्या चपलाही तुटल्या आहेत. मात्र, विधान भवनाला घेराव घालेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं मत शेतकऱ्यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेवेळी नोंदवलं.
"सरकारनं वेगळा मार्ग अवलंबला तर शहीद म्हणून घरी येऊ. मागण्या मान्य झाल्या शिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही," असं ठाम मत भारतीय किसान परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियाही या लाँग मार्चमध्ये आगेकूच करत असून त्यांनी देखील पायावरील जखमांची आणि तुटलेल्या चपलांची वाटचाल पुढे चालू ठेवली असल्याचं दिसून येत आहे.
नाशिक ते मुंबईपर्यंतचा प्रवास पायी चालून झाल्यावर आपल्या भेगाळेल्या पायांना काही क्षणांची विश्रांती देणारा हा शेतकरी.
नाशिक ते मुंबई अशा लाँग मार्चद्वारे हजारो शेतकरी मुंबईत पोहोचले आहेत. त्यांचे करुण चेहरे आणि थकलेले पाय त्यांच्या या मेहनतीची साक्ष देत आहेत. १२ मार्चला विधान भवनाला घेराव घालण्याचं लक्ष्य पुरं करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असल्याचं दिसत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)