You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-पाकिस्तान संबंध : 'उशीर झालाय पण, आशा अजूनही आहे'
- Author, वुसअतुल्लाह खान
- Role, वरिष्ठ पत्रकार, पाकिस्तानहून बीबीसी हिंदीसाठी
सगळीकडे दहशतीचं वातावरण असताना भीतीने थरथरणारा हात धरून अचानक कोणी म्हणावं, "मी आहे ना..."
लाखांमध्ये एखाद-दोन जण असे असतात जे देश आणि जनतेसाठी स्वप्न पाहतात, ब्युरोक्रॅट म्हणजे प्रशासकीय अधिकारी होतात, त्यांना मोठी पदं मिळतात.
पण आपण जे करतोय ते पटत नाही म्हणून किंवा देश ज्या दिशेने जातोय त्या प्रवाहासोबत वाहून जायचं नाही म्हणून एक दिवस आपलं सारं भविष्य पणाला लावत राजीनामा देत म्हणतात - 'ही घ्या तुमची नोकरी.'
किती असाधारण आहे हे.
आमचं नाव वापरून तुम्ही जे करत आहात, ते करू नका असं म्हणत जंतर मंतरवर एक लहानसा गट घोषणा देतो,
किंवा सीमेपारच्या वर्तमानपत्रांमध्ये सगळ्या चिथावणीखोर बातम्या असताना 'दोन आण्विक शक्तींमधला संघर्ष आपल्याला नरकाकडे नेईल' असं म्हणणारा लेख प्रसिद्ध होतो,
तेव्हा ही बातमी सध्याच्या वातावरणात कुठेतरी दिलासा देणारी वाटते.
सध्याच्या या वातावरणात काश्मीरचा प्रश्न सुटलेला नसला तरी करतारपूर कॉरिडोरची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे, ही गोष्ट आशादायक आहे.
सध्या भारतासोबतचे पाकिस्तानचे सगळे व्यवहार बंद असले तरी जीव वाचवणाऱ्या औषधांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल पाकिस्तानात आणण्यावर कोणतीही बंदी नाही.
सध्याच्या काळात दोन्ही बाजू एकमेकांवर आग ओकतायत. मीडिया 'तांडव नाचाची' तयारी दाखवतायत. एकमेकांना सगळ्या शिव्या देऊन झाल्या आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांवर सगळे आरोप लावून झाले आहेत.
एकमेकांवर टोमणे मारण्याची एकही संधी सोडली जात नाही. चांद्रयानाला चंद्रावर उतरण्यात अपयश आल्यानंतर ट्विटरवरही टोमणे मारण्यात आले. पाकिस्तानचे विज्ञान - तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरींनी ट्वीट केलं, "जे काम करता येत नाही, त्याची जोखीम घेऊ नये, डिअर इंडिया."
ही शिवीगाळ सुरू असताना जर मोजक्याच पाकिस्तानींनी ट्विटर किंवा फेसबुकवर लिहिलं की भारत विज्ञान - तंत्रज्ञानात आमच्यापेक्षा भरपूर पुढे आहे, किंवा मग 'वाईट वाटून घेऊ नका, पुढच्या प्रयत्नांत यश मिळेल' किंवा 'पाकिस्तानने चंद्रावर नाही पण किमान अंतराळाततरी एखादं रॉकेट सोडून दाखवावं आणि नंतर फवाद चौधरींनी असं ट्वीट करावं.'
काश्मीर प्रश्नावरून तणाव असतानाही या ट्विटवरून असं वाटतं की उशीर झाला असला तरी अजून आशा मावळलेली नाही. प्रकाशमय जग वेगळंच असतं. आता इथं पोहोचण्यासाठी वेळ न घालवता निघावं की विनाशाचा लांबलचक मार्ग अवलंबून निघावं हे ठरवायला हवं. पण इथे यावं तर लागेलच.
मग शहाणपण कशात आहे? याचं उत्तरही रॉकेट सायन्सच देणार का?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)