मसूद अझहर हा संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय 'दहशतवादी' घोषित

पाकिस्तानमधील कट्टरवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. यापुढे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही.

संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत सैय्यद अकबरूद्दीन यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

संयुक्त राष्ट्राने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं म्हणून भारताचे प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. गेल्या काही वर्षांपासून अझहरला दहशतवादी घोषित करावं यासाठी भारताचे विविध पातळीवर प्रयत्न सुरू होते. पुलवामा येथे हल्ला झाल्यानंतर भारताच्या प्रयत्नांना गती मिळाली होती.

चीनने पाठिंबा न दिल्यामुळे अझहरला दहशतवादी घोषित करण्यात अडथळा निर्माण झाला होता.

भारताला काय फायदा?

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याच्या घोषणेमुळे भारताला फारसा फायदा होणार नाही कारण मसूद आंतरराष्ट्रीय प्रवास करत नाही. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर निधीही गोळा करत नाही. या संपूर्ण प्रकरणात भारताचा फक्त मुत्सद्दी पातळीवर विजय होऊ शकतो आणि त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो असं आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक मुक्तदर खान यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ला

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्याच्या अवंतिपुराच्या लेकपुरा भागातून जाणाऱ्या CRPFच्या तुकडीवर 14 फेब्रुवारीला आत्मघातकी हल्ला होता. त्यात 34 जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदनं घेतली होती.

जैश ए मोहम्मदचा प्रवक्ता मोहम्मद हसननं एक पत्रक जारी केलं. आदिल अहमद उर्फ वकास कमांडोने हा हल्ला केल्याचा उल्लेख त्या पत्रात करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी झाली होती.

जैश ए मोहम्मदनं भारतात अतिरेकी कारवाया करण्याची ही पहिली वेळ नव्हती.

त्याआधी 1994ला भारतीय सुरक्षा दलांनी मौलाना मसूद अझहरला श्रीनगरमधून अटक केली होती. नंतर त्याच्या सुटकेसाठी 24 डिसेंबर 1999ला अतिरेक्यांनी 180 भारतीय प्रवास करत असलेल्या विमानाचं अपहरण केलं होतं.

जैशचा पाया कसा रचला गेला?

विमानाचं अपहरण केल्यानंतर अतिरेक्यांनी ते कंदाहारला नेलं. त्यानंतर मौलाना मसूद अझहर, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईदसारख्या कट्टरवाद्यांच्या सुटकेची मागणी केली.

सहा दिवसानंतर 31 डिसेंबरला अपहरणकर्त्यांच्या अटी-शर्थी मान्य करत भारत सरकारनं कट्टरवादी नेत्यांची सुटका केली. या बदल्यात कंदाहार एअरपोर्टवरुन भारतीय प्रवाशांची सुटका करण्यात आली.

यानंतर मौलाना मसूद अझहरनं फेब्रुवारी 2000मध्ये जैश ए मोहम्मद संस्थेची स्थापना केली. आणि भारतात हल्ले घडवून आणले.

त्यावेळी हरकत उल मुजाहिद्दीन आणि हरकत उल अंसारमध्ये काम करणारे अनेक कट्टरवादी जैश ए मोहम्मदमध्ये दाखल झाले. स्वत: मौलाना मसूद अझहरनं हरकत-उल-अंसार या कट्टरवादी संघटनेचा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे.

पठाणकोट, उरी ते पुलवामापर्यंतचे हल्ले

स्थापनेच्या दोन महिन्याच्या आतच जैश ए मोहम्मदनं श्रीनगरच्या बदामी बाग परिसरात असलेल्या भारतीय लष्कराच्या मुख्यालयावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.

यानंतर 28 जून 2000ला जम्मू काश्मीर सचिवालयावर झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी घेतली.

यानंतर 24 सप्टेंबर 2001ला एका युवकानं स्फोटकांनी भरलेली कार श्रीनगर विधानसभा भवनावर धडकवली.

त्याचवेळी काही कट्टरवाद्यांनी विधानसभेच्या जुन्या इमारतीच्या पाठीमागील भागाला आग लावली. या घटनेत 83 लोक मारले गेले.

हमल्यानंतर लगेचच जैश ए मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा इन्कारही केला.

13 डिसेंबर 2001 ला भारतीय संसदेवर आणि जानेवारी 2016ला पंजाबमधील पठाणकोटच्या वायु सेनेच्या तळावर झालेल्या हल्ल्यालाही जैश ए मोहम्मद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं.

पठाणकोटच्या आधीही भारतात झालेल्या हल्ल्यांना जैश ए मोहम्मदला जबाबदार ठरवण्यात आलं आहे. यातला सर्वात मोठा हल्ला 2008मध्ये मुंबईत झाला होता.

2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचे दोषी अफजल गुरुसुद्धा जैश ए मोहम्मदशी संबंधित होते. त्यांना 10 फेब्रुवारी 2013मध्ये मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.

डिसेंबर 2016मध्ये काश्मीरच्या उरीमध्ये असलेल्या लष्कराच्या तळावर जो हल्ला झाला त्यालाही जैश ए मोहम्मद जबाबदार असल्याचं सांगितलं जातं. उरीच्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता.

यानंतर काहीच दिवसात भारतानं सीमारेषेवर 'सर्जिकल स्ट्राईक' केल्याचा दावा केला

कट्टरवादी' संघटनांच्या यादीत समावेश

जैश-ए-मोहम्मदला भारत, ब्रिटन, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रानं 'कट्टरवादी' संघटनेच्या यादीत टाकलंय.

अमेरिकेच्या दबावानंतर पाकिस्ताननं 2002 मध्ये जैश ए मोहम्मदवर बंदी घातली होती.

मात्र काही रिपोर्ट्सच्या अनुसार अजूनही जैश ए मोहम्मद प्रमुख मसूद अझहर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर परिसरात राहतात.

पठाणकोटवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर आणि मुलतानमधील कार्यालयांवर छापेमारी केली होती. मीडिया रिपोर्टसनुसार अझहर आणि त्यांच्या भावालाही अटक केली होती.

दुसरीकडे भारतानं याआधी अनेकदा अझहर मसूदच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मात्र पुरावे नसल्याचं कारण देत पाकिस्ताननं ही मागणी धुडकावून लावली आहे.

पठाणकोट हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदनं अल-कलाम वर एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. ज्यात 'जिहादींना' काबूत ठेवण्यात भारतीय यंत्रणांना आलेल्या अपयशाची खिल्ली उडवली होती.

आत्मघाती हल्ला हीच पद्धत

मीडिया रिपोर्ट्सनुसार जैश ए मोहम्मद भारतात कथिक गोरक्षेवरुन मुस्लीम युवकांवर झालेले हल्ले आणि काश्मीर मुद्द्यावरून मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहे.

जैश-ए-मोहम्मदसाठी आत्मघातकी हल्ला ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. पुलवामात याच पद्धतीनं आत्मघातकी हल्ल्याचा वापर करण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)