You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खा पत्ताकोबी खा, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो
- Author, जेम्स गॅल्लाघर
- Role, आरोग्य आणि तंत्रज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
कोबीमुळे कॅन्सरचा धोका कशाप्रकारे कमी होऊ शकतो, हे आपण शोधून काढल्याचं काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
कोबीवर्गीय शाकाहारी खाद्य हे आतड्यांसाठी चांगलं असतं यात काही शंका नाही. पण यासंबंधीचं सविस्तर विश्लेषण आता समोर आलं आहे.
कोबीवर्गीय भाज्या पचल्यानंतर शरीरात कर्करोगविरोधी रसायनं तयार होतात, असं Francis Crick Instituteच्या टीमला संशोधनात आढळून आलं आहे.
शाकाहारी पद्धतीच्या जेवणाचं प्रमाण वाढवण्याकरता अधिक कारणं उपलब्ध होत आहेत, असं Cancer Research UKनं म्हटलं आहे.
आतड्यांसाठी पालेभाज्या कशाप्रकारे महत्त्वाच्या असतात, यावर या अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.
प्रयोगशाळेत उंदीर आणि त्यांच्या सूक्ष्म आतड्यांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. चार-पाच दिवसांच्या या प्रक्रियेत त्वचेसारखंच आतड्यांच्या पृष्ठभागाचं पुनरुत्थान होत असल्याचं दिसून आलं.
पण या पुनरुत्थानाला सतत नियंत्रणाची गरज होती. अन्यथा त्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होत होता.
कोबीवर्गीय भाज्यांतील रसायनं महत्त्वपूर्ण
कोबीवर्गीय भाजीपाल्यांत असलेली रसायनं महत्त्वपूर्ण असतात, असं Immunity या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. अशाप्रकारचा भाजीपाला खाल्ल्यानं indole-3-carbinol नावाचं रसायन शरीरात तयार होतं, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
"हा भाजीपाला जास्त शिजलेला अथवा पाण्यात जास्त काळ भिजवलेला असता कामा नये," असं शास्त्रज्ञ गिट्टा स्टॉकिंजर सांगतात.
हे रसायन पचनसंस्थेतून सुरळीतपणे प्रवास करत असल्यानं त्यामुळे पोटातील आम्लात सुधार होते. यामुळे आतड्यांतील पेशींचं वर्तन बदलू शकतं.
indole-3-carbinol मधील तत्त्वांनी उंदराला कॅन्सरपासून वाचवलं असा हा अभ्यास सांगतो. नियंत्रित आहाराशिवाय आतड्यातील पेशी अखंडितपणे विभाजित होतात.
"उंदरामध्ये ट्यूमरची लक्षण दिसू लागली तेव्हा आम्ही योग्य आहार देण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे ट्यूमरची वाढ थांबली," असं स्टॉकिंजर सांगतात.
आतड्याच्या कॅन्सरची लक्षणं:
1.मलमार्गातील रक्त
2.आतड्यांच्या सवयीत बदल, जसं शौचास वारंवार जाणे
3.पोटदुखी, पोटात गोळा येणे आणि अस्वस्थता वाढणे
या अभ्यासातील निष्कर्ष आशावाद उत्पन्न करणारे होते, असं स्टॉकिंजर यांनी म्हटलं आहे. त्यांनी स्वत: आहारातील मांसाचं प्रमाण कमी केलं आहे आणि पालेभाज्या खाण्यावर भर दिला आहे.
बरेच आहारविषयक सल्ले नियमितपणे बदलत असतात. याची कारणं आणि परिणामं काय आहेत, हे स्पष्ट करणं गोंधळात टाकणारं आहे, स्टॉकिंजर सांगतात.
"ते का चांगलं आहे हे सांगण्याऐवजी नुसतंच ते चांगलं आहे, असं सांगितल्यास मी ते खाणार नाही. या अभ्यासानुसार आमच्याकडे अशी यंत्रणा आहे जी ही कार्यप्रणाली स्पष्ट करते," स्टॉकिंजर पुढे सांगतात.
Cancer Research UK मधले प्राध्यापक टीम के यांच्यानुसार, "या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की, कोबीवर्गीय पालेभाज्यांमधलं फायबरच नाही तर रेणूही आतड्यातील कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात."
या भाज्यांमधल्या रेणूचा लोकांवर सारखाच प्रभाव होतो का, हे तपासणं या संशोधनाचं पुढचं ध्येय असणार आहे.
पण, पालेभाज्या खाण्यासाठीची अनेक चांगली कारणं आधीच उपलब्ध आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)