You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार : 'फॉक्सकॉन तर गेला, आता दुसऱ्या प्रकल्पाचं आश्वासनं देणं म्हणजे...'
"फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावला येणार होता. राज्य सरकारने तयारीही केली होती. त्यामुळे असं व्हायला नको होतं," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (15 सप्टेंबर) पुण्यात पत्रकार परिषद घेतली. फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात त्यांनी या पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच, "प्रकल्प गेला ना, आता कशाला चर्चा करायची मग?" असं ते म्हणाले. पण त्यांनी या विषयावरच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
"मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणाले की, मागच्या सरकारने निर्णय घेतला नाही. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते, एकनाथ शिंदेही मंत्री होते. आता तेच आरोप करत आहेत. हे चांगलं लक्षण नाही," असंही शरद पवार यांनी म्हटलं.
'दुसऱ्या प्रकल्पाचं आश्वासन म्हणजे...'
दरम्यान, वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्वीट करून महाराष्ट्रातही लवकरच मोठी घोषणा करणार असल्याचं म्हटलं होतं. "कोट्यवधी रुपयांची ही दीर्घकालीन गुंतवणूक असून यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक क्षेत्राची दशा आणि दिशा बदलणार आहे," असं अनिल अग्रवाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
या ट्वीटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांनी म्हटलं, "वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचं ट्वीट म्हणजे घरात एखाद्या मुलाला फुगा दिला नाही तर त्याला मोठा फुगा आणून देऊ असं सांगतात असा हा प्रकार आहे."
या प्रकल्पाबद्दलच्या राजकारणावर बोलताना शरद पवारांनी म्हटलं, "केंद्रात सत्ता असण्याचे काही फायदे असतात. प्रकल्प गुजरातला मिळाल्याचं दु;ख कारण नाही. तळेगावच्या बाजूला चाकण हा ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हा महत्त्वाचा आहे. इथे कंपनीला अधिक सोयीचं झालं असतं, पण हे काही नवीन नाही. हा त्यांचा अधिकार आहे. या देशात एक महत्त्वाचा प्रकल्प रत्नागिरीला करायचा निर्णय झाला होता. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. तो अग्रवाल यांचाच होता. तो मग चेन्नईला गेला. त्यामुळे वेदांताबरोबर हे पहिल्यांदा झालेलं नाही. त्यामुळे ते येतील याची खात्री नाही."
'महाराष्ट्र गुंतवणुकीत अग्रेसर होता'
"आतापर्यंत कोणालाही गुंतवणूक करायची असेल, त्यात महाराष्ट्राची आधी निवड केली असायची. आम्ही जेव्हा सत्तेत होता तेव्हा यशवंत घारे नावाचे अधिकारी होते. त्यांचं एकच काम होतं. उद्योगाला चालना हेच त्यांचं काम होतं. आता सगळ्या यंत्रणा थंड झालेल्या आहेत.
गुंतवणुकीला वातावरण निर्माण करावं लागतं. आता राज्याचा विचार करावा. सत्ताधारी आणि विरोधक यांनी आपापसातले वाद बंद केले पाहिजे असं वाटतं." असंही शरद पवार यांनी म्हटलं.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन भरलं होतं त्यावेळी मीडियात जे छापून आलं त्यावरून मीडियाची काय लेव्हल आहे ती कळली अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौरा करणार आहेत. त्यासंबंधी बोलताना "मी नरेंद्र मोदी, प्रणव मुखर्जी अशा लोकांना निमंत्रित केलं होतं. मी पण लोक पाहून आमंत्रण देतो," असा टोला शरद पवारांनी लगावला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)