You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशोक गेहलोत काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
"काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मी ठरवलं आहे. लवकरच अर्ज दाखल करण्याची तारीख जाहीर करेन. आताची देशातील स्थिती पाहता विरोधक सक्षम असले पाहिजेत," असं अशोक गेहलोत म्हणाले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून काँग्रेस अध्यक्षपद रिक्त असून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.
पण 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अध्यक्ष मिळालेला नाहीये.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस अध्यक्षपद रिक्त आहे आणि सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तीन वेळा अंतर्गत निवडणुका जाहीर झाल्या आणि तिन्ही वेळेस पुढं ढकलण्यात आल्या. पक्षाने अध्यक्ष निवडीसाठी 21 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती, मात्र आता पुन्हा एकदा ही निवडणुक पुढं ढकलण्यात आली.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिवाळीपूर्वी ऑक्टोबरमध्ये नवा अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणुका होऊ शकतात.
गेहलोत यांच्यासाठी हा पर्याय वाटतो तितका सोपा नाही..
राजस्थान काँग्रेस सध्या गटबाजीचं राजकारण सुरू असून सचिन पायलट यांनी वेळोवेळी अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय.
राजस्थानचं राजकारण जवळून पाहणाऱ्या वरीष्ठ पत्रकार त्रिभुवन यांच्या मते, "गेहलोत यांना राजस्थानचं मुख्यमंत्रिपद सोडून काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याचा निर्णय घेणं सोपं नसेल."
त्रिभुवन सांगतात की, "सध्याची काँग्रेसची परिस्थिती पाहता गेहलोत हे अध्यक्षपदासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. मात्र राजस्थानचं राजकारण पाहता गेहलोत यांना अध्यक्षपदाचा प्रस्ताव तितकासा फायद्याचा वाटणार नाही. किंबहुना हे पद स्वीकारताना ते तेवढे खुश नसतील."
तसं पाहायला गेलं तर मुख्यमंत्रिपदावरून थेट पक्षाच्या अध्यक्षपदी पोहोचणं ही राजकीय प्रगती म्हणता येईल. मात्र तसं नसून गेहलोत यांचा उतरणीला लागलेला प्रवास म्हणून देखील याकडे पाहता येऊ शकतं.
त्रिभुवन सांगतात, "राज्याच्या मुख्यमंत्रिपदापेक्षा काँग्रेसचं अध्यक्षपद केव्हाही मोठंच म्हणता येईल. मात्र तरीही अशोक गेहलोत यांच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण झली आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. अध्यक्षपद किती मोठं का असेना त्याने काही फरक पडणार नाही. उलट गेहलोत अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर त्यांची पराभूत अशी प्रतिमा उभी केली जाईल."
अशोक गेहलोत अध्यक्षपदावर बसल्यावर काँग्रेसच्या दोन अडचणी सुटतील. एकतर तीन वर्षांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर नेहरू - गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीची वर्णी लागेल. आणि त्यातून घराणेशाहीच्या आरोपांवर उत्तर मिळेल. आज दुसरं म्हणजे राजस्थान मधले अंतर्गत वाद मिटतील. गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अंतर्गत राजकारण सुरू असल्याचं सर्व देशाने पाहिलंय. गेहलोत अध्यक्ष बनल्यावर सत्ताविभाजन होईल आणि गटबाजी थांबेल. मात्र जेवढं वाटतं तेवढं ते सोपं नसल्याचं बऱ्याच विश्लेषकांना वाटतं.
यावर त्रिभुवन सांगतात, "गेहलोत यांना अध्यक्ष बनवून दिल्लीला पाठवायचं आणि सचिन पायलट यांच्याकडे राज्याचा कारभार सोपवायचा हा सोपा पर्याय असला तरी तो सोपा नाहीये. म्हणजे राजकारण एवढं सरळ आणि सोपं नसतं. आपल्या विरोधकाला मुख्यमंत्री पदावर बसवून गेहलोत दिल्लीला जाणं शक्यचं नाही."
तर दुसरीकडे वरिष्ठ पत्रकार अर्चना शर्मा सांगतात, "काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी संपवण्यासाठी हायकमांडने हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. गेहलोत दिल्लीला गेल्यावर पायलट यांना एक वर्षासाठी मुख्यमंत्री बनवून गटबाजी संपवली जाईल. त्यांनां दोन्ही गट एकत्रितपणे पुढील विधानसभा निवडणुकांना सामोरं जातील."
अर्चना सांगतात, "राजस्थानचा नियमचं आहे की तिथे दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. अशा परिस्थितीत निवडणुका तोंडावर आल्या आहेत. वर्षभरानंतर निवडणुका लागतील तेव्हा भाजपचं तगडं आव्हान काँग्रेस समोर असेल. अशावेळी अंतर्गत राजकारण थांबलच तर आव्हानसाठी पक्ष मजबूत स्थितीत राहील."
पायलट यांच्या तंबूत उत्साहाचं
डिसेंबर 2018 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 99 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने सचिन पायलट आणि अशोक गेहलोत या दोघांनीही मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकला होता.
यात बरेच दिवस रस्सीखेच चालली आणि यात अशोक गेहलोत जिंकले. तर भविष्यात काही तरी चांगलंच होईल या आश्वासनावर सचिन पायलट यांनीही समाधान मानलं. आता गेहलोत दिल्लीला जाणार म्हटल्यावर सचिन पायलट यांच्या तंबूत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अर्चना शर्मा सांगतात, "गेहलोत दिल्लीला जाणार या बातमीनंतर पायलट यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं भरतं आलं आहे. काल पायलट यांच्या काही समर्थकांनी 'राजस्थान मांगे पायलट' अशा आशयाचे ट्वीट केले आहेत. तर दुसरीकडे कॅबिनेट मंत्री असलेल्या विश्वेंद्र सिंह यांचा मुलगा अनिरुद्ध सिंह याने पायलट यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलंय. अनिरुद्ध सिंह पायलटचे कट्टर समर्थक असून प्रसंगी ते आपल्या वडिलांच्याही विरोधात गेले आहेत."
"राहुल गांधींनी पायलट यांच्या संयमी वृत्तीची स्तुती केली होती तेव्हाच राजस्थानमध्ये काहीतरी घडेल अशी अटकळ बांधली जात होती. आता गेहलोत दिल्लीला जाणार म्हटल्यावर पायलट समर्थकांमध्ये जोशपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. आणि आता पायलट यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करतील असंही म्हटलं जातंय."
गेहलोत पायलटसाठी मुख्यमंत्रिपद सोडतील का?
अशोक गेहलोत यांना काँग्रेसच्या जुन्या आणि शेवटच्या फळीतले नेते म्हणता येईल. त्यांच्यात आणि नव्या पिढीचं नेतृत्व करणाऱ्या सचिन पायलट यांच्यातून विस्तवही जात नाही हे सर्वांनी पाहिलंय.
त्यामुळे सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होताना पाहणं गेहलोत यांच्यासाठी कठीण असेल असं विश्लेषकांना वाटतं.
त्रिभुवन सांगतात त्याप्रमाणे, "सचिन पायलट आणि अशोक गेहलोत गटात कटुता आली आहे. पायलट यांच्या समर्थकांना असं वाटतं की गेहलोत यांनी दिल्लीला जावं. पण गेहलोत यांना दिल्लीला जाण्यात काही रस वाटत नाही. पण जर त्यांना जावंच लागलं तर मात्र ते राज्याचा कारभार आपल्याच कोणत्यातरी समर्थकाच्या हाती सोपवून जातील."
त्रिभुवन पुढे सांगतात की, "सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्या गटात समन्वय साधून राजस्थानमध्ये चांगली कामगिरी करता येऊ शकते. राजस्थान काँग्रेसमध्ये आता बदलाची गरज आहे. त्यामुळे पक्षातल्या जुन्या जाणत्यांनी आपलं मोठं मन दाखवून नव्या पिढीच्या हाती कारभार सोपवावा आणि पक्षाला संजीवनी द्यावी."
पक्ष आणि गांधी परिवाराचे विश्वासू..
सलग तीनवेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी बसणाऱ्या अशोक गेहलोत यांनी गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांसोबत काम केलंय. ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ असून त्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधीचे विश्वासू म्हणून काम केलंय.
इंदिरा गांधी, राजीव गांधी तसेच पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात गेहलोत यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसेच त्यांनी तीन वेळा राजस्थान काँग्रेसचं अध्यक्षपदही भूषवलं आहे.
यावर त्रिभुवन सांगतात, "गेहलोत यांनी नेहमीचं स्वतःच्या हितापेक्षा पक्षाचं हित जोपासलं आहे. इंदिरा गांधींचा काळ असो वा राजीव गांधी, सोनिया गांधींचा काळ असो गेहलोत यांनी कायम पक्षनिष्ठा दाखवली आहे. पक्षाच्या हितसंबंधाना तडा जाईल अशी कोणतीही कृती त्यांनी केलेली नाही."
त्रिभुवन पुढे सांगतात, "राजस्थानच्या काँग्रेसी नेत्यांनी अनेकदा पक्ष मर्यादा ओलांडली. आपल्या जातींना पाठिंबा दिला, तर कधी विरोधकांशी हातमिळवणी केली. मात्र अशोक गेहलोत नेहमीच एकनिष्ठ राहिले आहेत."
काँग्रेसचे संकटमोचक
क्रायसिस मॅनेजमेंट असो वा इलेक्शन मॅनेजमेंट असो गेहलोत नेहमीच यात सरस ठरतात. ते चांगले रणनीतीकार आहेत आणि काँग्रेस हायकमांडने नेहमीच त्यांच्यावर विश्वास ठेवलाय.
आपले आमदार फुटतील असं जेव्हा काँग्रेसला वाटतं तेव्हा तेव्हा गेहलोत मदतीला धावून येतात.
2017 मध्ये अहमद पटेल यांची गुजरामधील राज्यसभा निवडणूक असो वा महाराष्ट्रातील आमदार फुटू नये म्हणून जबाबदारी घेणं असो गेहलोत यांच्यावर नेहमीच विश्वास ठेवला जातो.
राजकारण करता करता गेहलोत यांनी पक्षाच्या हितालाही प्राधान्य दिल्याचं विश्लेषक सांगतात.
वरीष्ठ पत्रकार अर्चना शर्मा सांगतात की, "राजस्थानमध्ये गेहलोतांच्या विरोधात मोठं बंड झालं. बरेच मंत्री सोडून गेले मात्र तरीही गेहलोत यांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळली. आणि आपलं सरकार टिकवून ठेवलं. त्यांच्या या कौशल्यामुळे ते पट्टीचे राजकारणी आहेत हे दिसून आलं आहे."
अशोक गेहलोत यांच्यात खास काय असं विचारलं तर ते नेहमीच गांधी कुटुंबाच्या जवळ असतात असं सांगता येईल. काँग्रेसच्या G-23 गटाने गांधी घराण्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. या गटात गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनीष तिवारी आणि शशी थरूर या नेत्यांचा समावेश होता.
त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधी घराण्याला विश्वासू तसेच पक्षाला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तीची गरज असल्याचं विश्लेषक सांगतात.
यावर अर्चना शर्मा सांगतात, "गेहलोत यांनी इंदिरा, राजीव, सोनिया यांच्यासोबत तर काम केलंच आहे. मात्र राहुल आणि प्रियांका गांधी यांचाही स्वभाव त्यांना माहीत आहे. सध्या काँग्रेसमध्ये ते एकमेव नेते असतील ज्यांनी पक्षासाठी आपलं तन मन धन अर्पूण काम केलंय. त्यामुळे गेहलोत जर काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर मात्र ती जबाबदारीही ते उत्तमरीत्या पार पाडतील."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)