You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिल्किस बानो : ब्राह्मण आरोपींच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचे आमदार म्हणतात...
- Author, तेजस वैद्य
- Role, बीबीसी गुजराती
15 ऑगस्टला बिल्किसबानो केसमधील 11 दोषींना माफी देण्यात आली आणि त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. गोध्रा येथील तुरुंगात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. बिल्किसबानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि कुटुंबीयांच्या हत्येच्या प्रकरणात ते दोषी होते.
15 पेक्षा अधिक वर्षं तुरुंगात काढल्यानंतर राधेश्याम शाह या त्यांच्यापैकी एका आरोपीने सुप्रीम कोर्टात माफीची याचना केली. सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीतल्या सर्व 11 सदस्यांनी या दोषींच्या सुटकेची शिफारस केली. 15 ऑगस्टला या सर्व दोषींची सुटका झाली.
या समितीत गोध्राचे जिल्हाधिकारी, गोध्रा येथील सत्र न्यायाधीश, स्थानिक आमदार सी. के. राऊलजी आणि इतर सदस्यांचा समावेश होता.
या निर्णयावर बोलताना स्थानिक आमदार सी. के. राऊलजी म्हणाले, "14 वर्षांची शिक्षा झाल्यावर राज्य सरकारचा नियम आहे. जर कैद्याची वागणूक चांगली असेल, त्याने शिक्षेच्या काळात काही चांगलं काम केलं असेल आणि तो कोणत्याही वादात अडकला नसेल तर त्याची सुटका केली जाऊ शकते. हायकोर्ट आणि राज्य सरकारचाच हा नियम आहे."
"या सर्व कैद्यांची वागणूक चांगली होती. त्यांना दिलेली शिक्षा त्यांनी भोगली आहे. तुरुंगात असताना त्यांची वागणूक चांगली होती. इतकंच नाही तर त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारीची नोंद नाही. या सर्व बाबी आणि सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या समितीने सर्व दोषींना माफी देण्याचा निर्णय घेतला. माझ्याबरोबर जिल्हाधिकारी, सत्र न्यायाधीश आणि तुरुंग निरीक्षक या समितीचे सदस्य होते. जून ते ऑगस्ट 2022 या काळात आम्ही चार वेळा भेटलो."
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर निर्णय घेण्यास सांगितलं. या प्रकरणावर निर्णय देताना समितीने 1992 सालच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेतला. या निर्णयावर सर्व सदस्यांचं एकमत होतं, असंही ते पुढे म्हणाले.
सामूहिक बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला तुरुंगातून सोडण्यात यावं का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, "11 दोषींपैकी काही लोक निर्दोष आहेत. जेव्हा हा गुन्हा घडला तेव्हा ते तिथे नव्हते. दोन समुदायांमध्ये तेढ आहे. त्यांच्यापैकी एक 'भट' नावाचा आरोपी होता. तो त्यावेळी गुन्हा झाला त्या ठिकाणी नव्हता."
मात्र कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं. त्यांची तुरुंगात वागणूक चांगली आहे म्हणून माफी देण्यात येऊ शकते का?
ते म्हणतात, "या विषयाच्या दोन्ही बाजू कोर्टाने तपासल्या आहेत. त्यामुळे हा खटला गुजरातऐवजी मुंबईला चालवण्यात आला. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
एका मुलाखतीत तुम्ही सांगितलं की ते सगळे दोषी ब्राह्मण होते आणि त्यांच्यावर चांगले संस्कार होते असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, "हा निर्णय घेताना आम्ही कोणाचीही जात लक्षात घेतलेली नाही. मी ब्राह्मणांवषयी जे बोललो ते फक्त एका व्यक्तीबद्दल बोललो. त्यावेळी त्या प्रसंगी तो तिथे उपस्थित नव्हता. असं असतानाही त्याच्यावर हा ठपका ठेवण्यात आला होता."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)