You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींची ईडीनं केली चौकशी, देशभरात काँग्रेसची निदर्शनं
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कॉंग्रेस खासदार राहुल गाधी आज ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. ते ईडी कार्यालयाकडे निघाले आहेत.
ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी समन्स बजावलं होतं. सोनिया गांधी कोरोना संसर्गामुळे चौकशीला हजर रहाणार नाहीत. मात्र, राहुल गांधी चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर रहाणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेस नेत्यांनी दिली आहे.
भाजप खोट्या गुन्ह्याप्रकरणी राहुल गांधींवर कारवाई करत आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
तर काँग्रेस तपास यंत्रणांवर दबाव टाकत आहे, असं केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, "काँग्रेस आज दिल्लीत आंदोलन करत आहे. जी व्यक्ती सध्या जामिनावर बाहेर आहे त्यांच्या समर्थनासाठी काँग्रेसने कार्यकर्त्यांना दिल्लीत येण्याचं आवाहन केलं. हे लोक तपास यंत्रणांवर दबाव टाकत आहेत. हे लोकशाहीसाठी आंदोलन नाही. तर काँग्रेस कुटुंबाचे 2 हजार कोटी रुपये वाचवण्यासाठीची धडपड आहे."
नितीन राऊत, विजय वडेट्टीवार पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेसच्या वतीने ईडीच्या नागपूर येथील कार्यालयात आंदोलन करण्यात आलं. यावेळी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना ईडीचे समन्स देण्यात आल्याचा निषेध करण्यासाठी नागपूरच्या ईडी कार्यालयावर काँग्रेसने आंदोलन केले.
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. देशभरातील ईडीच्या कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केलं. त्यानुसार आज नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील ईडीच्या कार्यालयात काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते.
दुपारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाचा दरवाजे उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना ताब्यात घेतले.
कॉंग्रेसचा देशभरात 'सत्याग्रह'
राहुल गांधींवरील कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेस आज देशभरात 'सत्याग्रह' करणार आहे. यंग इंडिया संस्था स्थापन करून जागा हडपल्याचा सोनिया आणि राहुल गांधींवर आरोप आहे.
कॉंग्रेसने सकाळपासूनच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं आहे. कॉंग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत पाचारण करण्यात आलं असून, कॉंग्रेसने मोर्चा काढण्याचं ठरवलंय.
राहुल गांधींवरील कारवाई विरोधातील आंदोलनाला कॉंग्रेसने 'सत्याग्रह'चं नाव दिलंय. दिल्लीत राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ मोठी पोस्टरबाजी करण्यात आलीये.
ईडी कार्यालयात जाण्याआधी राहुल गांधी यांना भेटण्यासाठी त्यांची बहिण आणि कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा पोहोचल्या आहेत. या आंदोलनात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि भूपेंद्र सिंह बघेल उपस्थित रहाणार आहेत. तर कॉंग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा खासदारही सहभाग घेणार आहेत.
"आज पुन्हा एकदा एक गांधीवादी 'सत्याग्रह' होणार आहे," असं कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलंय. लोकशाही विरोधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात एका नवीन क्रांतीची सुरूवात होणार असल्याचं, कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ईडीच्या दिल्लीतील ऑफिसपर्यंत कॉंग्रेस मोर्चा काढणार आहे. कॉंग्रेसचे सर्व बडे नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातही कॉंग्रेस नेत्यांकडून ईडीच्या ऑफिसबाहेर प्रदर्शन केलं जाणार आहे. याच्या माध्यमातून कॉंग्रेस शक्तीप्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे.
राहुल गांधींवर आरोप काय?
यंग इंडिया संस्था स्थापन करून जागा हडपल्याचा सोनिया आणि राहुल गांधींवर आरोप आहे. पण, कॉंग्रेस हा आरोप खोटा असल्याचा दावा करतंय.
नॅशनल हेराल्ड केस तपास यंत्रणांनी 2015 मध्येच बंद केली होती. या प्रकरणी सुब्रह्मण्यम स्वामी यांनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली होती.
असोसिएट जर्नल लिमिटेड या कंपनीकडे नॅशनल हेराल्डची मालकी होती. काँग्रेसनं 26 फेब्रुवारी 2011 रोजी या कंपनीचं 90 कोटी रुपयांचं देणं आपल्या डोक्यावर घेत या पेपरची मालकी स्वतःकडे घेतली होती. या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला होता.
कॉंग्रेसचा दावा आहे की, नॅशलन हेरॉल्ड पेपरची मालकी असलेल्या दी असोसिएट जर्नलवर जेव्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला तेव्हा पेपर चालवण्याऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळत नव्हता. तेव्हा 2002 ते 2011 या काळात कॉंग्रेसचे 90 कोटी रूपये या संस्थेला देत याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता.
रणदीप सुरजेवाला पुढे सांगतात, "कॉंग्रेस राजकीय पक्ष असल्याने यंग इंडिया या नॉन प्रॉफीट कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीला नॅशनल हेरॉल्डचे शेअर्स देण्यात आले. जेणेकरून 90 कोटी रूपयांचं कर्ज संपू शकेल. 90 कोटींपैकी 67 कोटी रूपये कर्मचाऱ्यांचे पगार आणि व्हीआरएससाठी देण्यात आले."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)