You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रशांत किशोर म्हणतात, जनतेकडे जाण्याची गरज"
गेल्या काही दिवसांपासून आपल्या भविष्यातल्या योजनांबद्दल चर्चेत राहिलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत म्हटलं की आता जनतेकडे जाण्याची वेळ आलेली आहे.
त्यांनी लिहिलं, "लोकशाहीत एक समर्थ भागीदार बनण्याचा आणि जनहितार्थ धोरणांना आकार देण्याचा माझा गेल्या दहा वर्षांचा प्रवास एका रोलरकोस्टर राईडसारखा ठरला."
"आता मी या प्रवासाचं पान उलटतो आहे. आता वेळ आलीये जनतेकडे जाण्याची, त्यांच्या मुद्द्यांवर आणि 'जनसुराज' म्हणजेच लोकांच्या सुशासनाच्या मार्गाला अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याची.'
काँग्रेसच्या ऑफरला नकार
प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होतील असे तर्कही गेल्या काही दिवसांपासून लढवले जात होते. अनेकदा प्रशांत किशोर यांनी काँग्रस हायकमांडसोबत बैठकही झाली पण अनेक दिवसांच्या तर्कवितर्कानंतर त्यांनी स्वतः या शक्यतांना पूर्णविराम दिला.
प्रशांत किशोर यांनी ट्वीट करून म्हटलं की काँग्रेसमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाला त्यांनी नकार दिलेला आहे.
त्यांनी लिहिलं, "मी ईएजी (एम्पावर्ड अॅक्शन ग्रुप) या एक भाग म्हणून पक्षात सहभागी होण्याच्या आणि निवडणुकांची जबाबदारी घेण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. माझं नम्र मत आहे की माझ्यापेक्षा पक्षाला नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची गरज आहे. यामुळे परिवर्तनकारी बदलांच्या माध्यमातून संरचनात्मक प्रश्नांवर तोडगे काढता येतील. या समस्या फार मुळापर्यंत पोहोचल्या आहेत."
काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोरांनी सोनिया गांधीसमोर एक प्रेझेन्टेशन सादर केलं होतं. त्यांनी पक्षाच्या 2024 च्या निवडणुकांसाठी रोडमॅप तयार केला आहे असं मानलं जात होतं. सोनिया गांधींनी प्रशांत किशोरांना पक्षात घ्यायचं की नाही याबद्दल एक समिती गठित केली होती.
निवडणूक रणनीतीकार आणि राजकारणात सक्रिय होण्यासाठी उत्सुक असलेले प्रशांत किशोर यांनी म्हटलंय की, "भक्कम काँग्रेस देशाच्या हिताची आहे."
काँग्रेसची कमान कोणाची हाती असायला हवी यावर मात्र त्यांचं मत 'लोकप्रिय निवडी'पेक्षा वेगळं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी किंवा त्यांच्या बहीण प्रियंका गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची पहिली पसंती नाही.
बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आपली पहिली पसंती सोनिया गांधी यांना असल्याचं स्पष्ट केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षासमोर प्रेझेंटेशेन दिल्यानंतर, प्रियंका गांधी यांचं नाव त्यांनी अध्यक्ष पदासाठी सुचवल्याची शक्यता वर्तवली जात होती. प्रियंका गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळली होती.
प्रशांत किशोर यांनी प्रियंका गांधी यांना अध्यक्ष करण्यासंदर्भात सुचवलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले, "काँग्रेसमध्ये बदल करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रेझेंटेशन दिलं. यात नेतृत्त्वासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. ज्या गोष्टी मी खासगीत सांगितल्या आहेत त्या मी उघड करणार नाही. नेतृत्त्वासंदर्भात माझे विचार मी त्यांना सांगितले आहेत. पूर्ण समितीसमोर हे झालेलं नाही. ते केवळ काँग्रेसच्या अध्यक्षांसाठी होतं. प्रियंका गांधी यांना अध्यक्ष बनवण्यासंदर्भात बोललो असं जे म्हटलं जात आहे ते साफ चुकीचं आहे. कोणाला अध्यक्ष बनवा असा प्रस्ताव मी दिलेला नाही."
ते पुढे सांगतात, "काँग्रेसच्या अध्यक्षाकडे संसदीय पक्षाचं नेतेपद नसावं, एवढंच माझं म्हणणं आहे. सध्या ही दोन्ही पदं सोनिया गांधी यांच्याकडे आहेत."
मजबूत काँग्रेस देशाच्या हिताची
प्रशांत किशोर आणि काँग्रेसची बैठक यशस्वी ठरली नसल्याचं दिसत असलं तरी भक्कम काँग्रेस देशाच्या हिताची आहे असं बोलण्यावर त्यांनी जोर दिला.
"भाजपचे खंबीर समर्थक सुद्धा सांगतील की मजबूत काँग्रेस देशाच्या हिताची आहे." असंही ते म्हणाले.
गेल्या एक दशकापासून काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी निराशाजनक होती. राज्यांतील निवडणुकांमध्येही काँग्रेसला फारसं यश मिळालं नाही. पंजाबसारखं महत्त्वाचं राज्य सुद्धा काँग्रेसच्या हातातून गेलं.
काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांची चर्चा सुरू होती तेव्हा आगामी निवडणुकांमध्ये आपली कामगिरी सुधारण्यासाठी पक्षाला त्यांच्याकडून आशा आहे असं मानलं जात होतं.
प्रशांत किशोर यांना पक्षासमोर प्रेझेंटेशन करण्यासाठी काँग्रेसने विचारणा केली होती की त्यांनी समोरून काँग्रेसला तसा प्रस्ताव दिला होता याबाबत त्यांनी स्पष्ट उत्तर देण्याचं टाळलं.
"मी एवढा मोठा नाही की काँग्रेसचे नेतृत्त्व माझ्याकडे येईल. माझं म्हणणं मांडण्याची संधी त्यांनी मला दिली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे." असं ते म्हणाले.
"आमच्या चर्चेत ज्या गोष्टींवर सहमती आहे त्यावर त्यांनी काम केल्यास काँग्रेसला फायदा होईल. लोकशाहीलाही फायदा होईल आणि यामुळे देशालाही फायदा होईल," असंही ते म्हणाले.
आपल्या प्रेझेंटेशन विषयी त्यांनी सांगितलं, "माझी एकच अट होती. पाच राज्यांचा निकाल हाती आल्यावर जी चर्चा झाली त्यात एकच अट होती. आम्ही जी ब्लू प्रिंट देत आहोत त्यावर चर्चा झाली पाहिजे. मी पक्षप्रवेश करेन त्यापूर्वी निर्णय घ्या. काँग्रेस पक्षाने सांगितलं की, मी सांगितलेल्या अनेक गोष्टी शक्य आहेत आणि त्याची अंमलबजावणी केल्यास काँग्रेसला फायदा होऊ शकतो."
असा आहे प्रशांत किशोर यांचा प्रवास
2011 साली प्रशांत किशोर हे नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आले. इथूनच प्रशांत किशोर यांच्या 'निवडणूक रणनिती'ला सुरुवात झाली.
गुजरातमध्ये 2012 सालच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली. तिथे मोदींचा विजय झाला आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.
यानंतर प्रशांत किशोर यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने सिटिझन फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स या प्रचार कंपनीची स्थापना केली. 2014 सालची भाजपची प्रचारमोहीम या कंपनीच्या अंतर्गतच प्रशांत किशोर यांनी चालवली.
यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रचारासाठी वापरलेल्या क्लृप्त्यांची बरीच चर्चा झाली होती. मंथन कार्यक्रम, रन फॉर युनिटी, श्रेष्ठ भारत यांसारखे कार्यक्रम. चाय पे चर्चाची तर सर्वत्र चर्चा झाली. थ्रीडी होलोग्राम सभांचा बोलबालाही भरपूर होता.
2014 साली नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात कुठल्या गोष्टी वापरल्या याची I-PAC ने वेबसाईटवर यादी दिलीय. त्यात 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'चाही समावेश केलाय. 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' म्हणजे गुजरातमध्ये बांधण्यात आलेला माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा होय.
2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र, त्यानंतर प्रशांत किशोर यांनी भाजपपासून फारकत घेतली. ते तिथून बाहेर पडले आणि नितीश कुमारांसाठी काम करू लागले.
या काळात अशा बऱ्याच बातम्या समोर आल्या, ज्यात प्रशांत किशोर आणि अमित शाह यांच्यातल्या नाराजीच्या चर्चा झाल्या. मात्र, या दोन्ही व्यक्तींनी कधीच या बातम्यांना दुजोरा दिला नाही. किंबहुना, प्रशांत किशोर यांनी त्या बातम्यांचं खंडनच केलं. मात्र, भाजपला सोडून प्रशांत किशोर नितीश कुमारांकडे गेले हे खरं.
नितीश कुमार यांच्याशी जवळीक, पक्षात प्रवेश आणि हकालपट्टी
2015 साली 'झांसे में ना आएंगे, नितीश को जिताएंगे' म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यासाठी 'रणनिती' आखली. यावेळी 'नितीश निश्चय'अंतर्गत विकासाच्या सात सूत्रांची केलेली मांडणीही चर्चेचं केंद्र बनली होती.
नितीश कुमार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये काँग्रेससाठी काम केलं आणि तिथेही त्यंना यश मिळालं.
2011 पासून सुरू झालेल्या प्रशांत किशोर यांच्या विजयरथाला पहिल्यांदा ब्रेक लागला तो 2017 साली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन निवडणुकीत काँग्रेसची बाजू प्रशांत किशोर सांभाळत होते. मात्र, तिथे त्यांना यश मिळवता आलं नाही.
या परभवावेळी प्रशांत किशोर यांच्या 'रणनिती'वर शंकाही उपस्थित केल्या गेल्या.
हे एकीकडे होत असताना, प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. त्यांनी सप्टेंबर 2018 मध्ये थेट जनता दल यूनायटेडमध्ये म्हणजेच नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश केला.
नितीश कुमार यांनी त्यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदीही विराजमान केलं. एवढंच नव्हे, तर नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना 'पक्षाचं भविष्य' म्हटलं होतं. त्यामुळे जदयूचं पुढचं नेतृत्त्वं म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं गेलं. मात्र, 15 महिन्यानंतर प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांनी पक्षातून काढलं.
त्यावेळी आधी 'बिहार में बहार है, नितीश कुमार है' म्हणणाऱ्या प्रशांत किशोर यांनी 'बिहार अजूनही देशातील सर्वात गरीब राज्य' म्हणत टीका केली.
त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये 'बिहार की बात' नावाचं व्यासपीठ सुरू केलं. बिहारला येत्या दहा वर्षांत अग्रगण्य राज्यांच्या यादीत नेणं आणि त्यासाठी गावपातळीवरल्या तरुणांना राजकीय वर्तुळात आणणं, हा उद्देश या व्यासपीठाचा आहे. हे व्यासपीठ अजूनही सुरू आहे.
पुन्हा विजयी घोडदौड
2017 मध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पराभव झाल्यानं टीकेला सामोरे गेलेल्या प्रशांत किशोर यांनी पुन्हा विजयी घोडदौड केली.
प्रशांत किशोर यांच्या I-PAC ने आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्यासाठी काम केलं. या सगळ्या राज्यात I-PAC ला यश आल्याचं दिसून आलं.
महाराष्ट्रातही आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसाठी प्रशांत किशोर यांनी काम केलं. शेतकऱ्यांशी संवाद, महिलांशी संवाद आणि युवासंवाद हे कार्यक्रम प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्याच कल्पना होत्या.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या अपयशानंतर होणाऱ्या टीकांना पश्चिम बंगालच्या यशाच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांनी उत्तर दिल्याचं सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार म्हणतात.
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रशांत किशोर यांच्या कंपनीनं जे केलं, ते पाहता त्यांनी पुन्हा दाखवून दिलं की निवडणूक रणनितीत आपण यशच मिळवतो, असं संजय कुमार म्हणतात.
प्रशांत किशोर यांची कंपनी काम कसं करते?
प्रशांत किशोर यांच्या या निवडणूक रणनितीसाठी काम करणाऱ्या I-PAC बद्दल जाणून घेतलं.
I-PAC सोबत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसाठी आम्ही एकूण 1700 जणांच्या टीमनं काम केलं. निवडणूकनिहाय ही संख्या कमी जास्त होत जाते. मात्र, एका व्यक्तीकडे दोन विधानसभा जागा असतात.
लोकांच्या समस्या आणि त्यावर उपायाचं कोणतं आश्वासन देता येईल, हे सांगण्याचं काम I-PAC करतेच. मात्र, कुठला नेता नाराज आहे, माध्यमांमध्ये काय सूर आहे, कुणाला पक्षात घेता येऊ शकेल इत्यादी कामंही या काळात केली जातात.
प्रशांत किशोर यांची I-PAC च्या कामात रोजची भागिदारी नसली, तरी महत्त्वाच्य मिटिंगसह निर्णय घेताना त्यांची उपस्थिती असते. एखाद्या निवडणुकीच्या रणनितीची दिशा तेच ठरवतात. त्यानुसार बाकीचे सर्व काम करतात, असं त्या सांगतात.
पण इथं प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, प्रशांत किशोर आणि त्यांची टीम एखाद्या पक्षाची रणनिती ठरवताना ज्या मुद्द्यांना लोकांसमोर घेऊन जाते, ते मुद्दे खरंच लोकांचे मुद्दे असतात की लोकांना संभ्रमित करणारे असतात?
याबाबत सीएसडीएस या संस्थेचे प्रमुख संजय कुमार यांना आम्ही विचारलं, तर ते म्हणतात, "लोकांमध्ये जाऊन त्याचा कानोसा घेऊन ते वेगवेगळ्या कल्पना मांडतात. त्यात वावगं काहीच नाही. एखाद्या नेत्याच्या चांगल्य गोष्टी शोधून त्या लोकांसमोर मांडण्यात चूक काय आहे? प्रशांत किशोर यांचा तो व्यवसाय आहे."
"तसंच, अनेकदा पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यासमोर पक्षातील कमकुवत गोष्टी सांगत नाहीत. अशावेळी प्रशांत किशोर यांच्यासारख्यांची गरज राजकीय नेत्यांना भासते, जे तळातलं वास्तव त्यांच्यासमोर मांडतील आणि तेच काम प्रशांत किशोर करतायेत," असंही संजय कुमार सांगतात.
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे डॉ. राहुल वर्मा म्हणतात, "नव्या माध्यमांच्या उदयानंतर लोकांशी जोडण्यासाठी राजकीय पक्षांना I-PAC सारख्या कंपन्यांची गरज भासते. पॉलिटिकल कन्सल्टन्सी हा व्यवसाय आहे. यामुळे जर राजकीय पक्षांना लोकांशी जोडण्यास सोयीचं जात असेल, तर ते चांगलंच म्हणायला हवं."
शिवाय, प्रशांत किशोर यांच्यासारख्या लोकांची बदलत्या राजकीय स्थिती अपरिहार्यता बनल्याचंही डॉ. राहुल वर्मा सांगतात.
पुन्हा राजकारणात प्रवेश करणार?
एकीकडे निवडणुकीच्या रणनिती आखत असताना, दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या राजकीय भूमिकाही दिसू लागल्या आहेत. खरंतर 2018 साली त्यांनी जदयूमध्ये प्रवेश करून आपली राजकीय महत्त्वकांक्षा उघडपणे दाखवून दिली. मात्र, आता शरद पवार यांच्या भेटीनंतर किंवा एरवीही सोशल मीडियावरून सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करणं, यामुळे प्रशांत किशोर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर पुन्हा चर्चा सुरू झालीय.
त्यात CAA-NRC असो वा कोव्हिड काळातील परिस्थिती असो, प्रशांत किशोर हे सातत्यानं मोदी सरकारवर टीका करताना दिसतायेत.
संजय कुमार याबाबत बोलतात, "प्रशांत किशोर हे प्रत्येकाकडे क्लाएंट म्हणून पाहतात. मात्र, गेल्या काही दिवसातील त्यांच्या टीकेचा सूर पाहता, ते नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. ही गोष्ट इतकी पुढे गेलीय की, यापुढे ते नरेंद्र मोदी किंवा भाजपसाठी राष्ट्रीय वा राज्य स्तरावर काम करतील असं दिसत नाही."
डॉ. राहुल वर्मा म्हणतात, "राजकीय पक्षांच्या रणनिती आखणं हेही एकप्रकारे ते राजकारणात असल्यासारखंच आहे. शिवाय ते जदयूमध्ये काही काळ होते. त्यामुळे त्यांनी वेगळं राजकारणात येण्याचं काही उरलं नाहीय. पण आता नव्या आघाडीची चाचपणी किंवा पक्षाची स्थापना याबाबत काही आताच बोलता येणार नाही."
मात्र, एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारतीय म्हणतात, "प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना भेटणं हे पूर्णत: राजकीय हालचाली आहेत, यात कुठलंच दुमत नाही."
किंबहुना, "येत्या काळात ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाच्या प्रशांत किशोर भेटीगाठी करताना दिसतील. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणीच्या दृष्टीनेच या हालचाली असल्याचा अर्थ निघतो," असंही मनोरंजन भारती म्हणतात.
एक मात्र खरं, बिहारच्या बक्सरमधल्या सर्वसाधारण घरातून आलेल्या प्रशांत किशोर यांनी भारतातल्या निवडणुकांच्या रणनितीत एक मोठा बदल घडवलाय. स्वत:ला चर्चेच्या केंद्रस्थानी आणलंय.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)