You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हनुमान जयंतीला झालेल्या दगडफेकीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
दिल्लीत जहांगीरपुरी भागात शनिवारी (16 एप्रिल) संध्याकाळी दोन समाजांमध्ये दगडफेक झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 22 जणांना अटक केली आहे. यापैकी दोन अल्पवयीन आहेत.
अटक केलेल्यांपैकी 14 जणांना रविवारी (17 एप्रिल) कोर्टात हजर करण्यात आलं. अंसार आणि अस्लम या दोन आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, इतर 12 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
जहांगीरपुरी येथे घडलेल्या हिंसक घटनेप्रकरणी चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या देखरेखीअंतर्गत तपास व्हावा अशी मागणी या याचिकेत केली आहे.
दिल्ली पोलिसांचा आतापर्यंतचा तपास एकतर्फी असून खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.
जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेलया शोभायात्रेवर दगडफेक केली गेली आणि त्या दरम्यान दोन गटात संघर्ष झाला. दोन्ही बाजूकडून दगडफेक सुरू झाली. दिल्ली पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
जहांगीरपुरी येथे परिस्थिती आता नियंत्रणात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल तैनात असून पोलीस पायी गस्त सुद्धा घालत आहेत.
दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) दीपेंदर पाठक यांनी सांगितलं, परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. या घटनेत 9 जण जखमी झाले असून यापैकी 8 पोलीस कर्मचारी आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तसंच यात एका पोलीस उप-निरीक्षकाला गोळी लागली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्त उषा रंगनानी यांनी दिली आहे.
एएनआय आणि अन्य प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित शोभायात्रेदरम्यान कथित दगडफेक झाली आणि त्यानंतर जमाव हिंसक झाला.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीसच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश शहा यांनी दिले आहेत.
जहांगीपुरी इथे झालेल्या घटनेत पोलिसांसह अनेकजण जखमी झाल्याचं वृत्त आहे.
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीशी बोलताना दिल्ली पोलीस पीआओ म्हणून काम करणारे डीसीपी अन्येश राय यांच्या नुसार शोभायात्रेदरम्यान हा प्रकार घडला.
शोभायात्रेदरम्यान सहभागी लोकांवर दगडफेकीचा प्रकार घडला. काही ठिकाणी आग लावण्याचे प्रसंगही घडल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, "नागरिकांना मी शांततेचं आवाहन करतो. शांततेचं पालन करणं आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. त्याशिवाय देश प्रगती करू शकत नाही. केंद्र सरकारने दिल्लीत शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावा".
ते पुढे म्हणाले, "जहांगीरपुरी परिसरात शोभायात्रेदरम्यान सहभागी लोकांवर दगडफेक ही घटना अतिशय निंदनीय आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्याला एकत्र पुढे जायचं आहे".
घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?
जहांगीपुरी सी ब्लॉकमध्ये पोलीस तैनात आहेत. परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, जहांगीरपुरी मेट्रो स्टेशनजवळ दुकानं आणि बाजार नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत. सी ब्लॉक येथे मात्र मोठ्या संख्येने संरक्षण दल उपस्थित आहे.
सी ब्लॉकचे निवासी शेख अमजद यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं, ही हिंसक घटना सुरू झाली तेव्हा ते मशिदीत होते.
"हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत सहभागी झालेले लोक जय श्री रामचा नारा देत होते. तसंच प्रवृत्त करणारे नारेही दिले जात होते. ते बळजबरीने मशिदीत घुसले आणि परिसरात भगवा झेंडा बांधू लागले. तलवार दाखवून ते आम्हाला घाबरवत होते. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. यापूर्वी जहांगीरपुरीमध्ये असं कधीही घडलं नाही."
जवळपास 50 लोक बळजबरीने मशिदीत घुसले असा दावा अमजद यांनी केला आहे. मशिदीजवळ सी आणि डी ब्लॉकमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. प्रत्येक 200 मिटर अंतरावर बॅरिकेड्स लावले आहेत. मशिदीच्या आसपासची दुकानं मात्र बंद होती.
मनोज कुमार सांगतात, हिंसा सुरू झाली तेव्हा ते सी ब्लॉक येथील आपल्या दुकानात होते. पीटीआयशी बोलताना ते म्हणाले, "लोक जोरजोरात ओरडत होते आणि आपल्या घराकडे धावत होते. आधी दोन समुदायांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाल्याचं मी पाहिलं. शोभायात्रेत सामील झालेल्या लोकांकडे शस्त्र होती. पण दगडफेक मुस्लीम लोकांकडून सुरू झाली."
दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच काही गाड्यांनाही आग लावली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी 14 जणांना अटक केली आहे.
मशिदीजवळ सी ब्लॉक येथे दुकान चालवणारे मुकेश सांगतात, याठिकाणची शांतता भंग करण्याचे काम बाहेरच्या लोकांचेच असू शकते. ते पीटीआयशी बोलताना म्हणाले, "मी या परिसरात गेल्या 35 वर्षांपासून राहत आहे. अशाप्रकारे हिंसा कधीही झाली नाही. इथे हिंदू आणि मुस्लीम शांततेत राहतात. शोभायात्रेत सहभागी झालेले लोक जहांगीरपुरी येथील स्थानिक लोक नसून बाहेरचे असतील."
जखमी पोलीस अधिकारी काय म्हणाले?
या घटनेत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक मेधा लाल यांनी सांगितलं, हिंसेदरम्यान सी ब्लॉकच्या इथून अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. एएनआयशी बोलताना ते म्हणाले, "रविवारी या परिसरात शोभायात्रा आयोजित केली होती. ही शोभायात्रा जेव्हा मशिदीजवळ पोहचली तेव्हा दोन गटात वाद सुरू झाला. यानंतर दगडफेक झाली आणि दोन्ही गटातले लोक तिथून निघाले."
"शोभायात्रेतले लोक जी ब्लॉकच्या दिशेने गेले आणि इतर लोक मशिदीजवळ होते. सी ब्लॉकच्या इथून दगडफेक सुरू झाली आणि नंतर गोळ्या झाडल्या गेल्या. नंतर तलवार घेऊन लोक सी ब्लॉककडे आले आणि त्याच दरम्यान मला ळी लागली. मी लगेच पीसीआर हॉस्पिटलमध्ये गेलो,"
मेधालाल यांनी गोळीबाराची माहिती तर दिली पण ते यामागे असलेलं कारण स्पष्ट करू शकले नाहीत. गोळीबार का झाला याची आपल्याला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मेधा लाल म्हणाले, "माझी तब्येत आता बरी आहे. मी शोभायात्रेदरम्यान तिथे होतो. त्यानंतर आपत्कालीन ड्यूटीसाठी मी तिथे तैनात होतो. यापूर्वी दोन शोभायात्रा शांततेत निघाल्या होत्या."
हजारोच्या संख्येने त्याठिकाणी लोक होते. पोलिसांची एक तुकडी तैनात होती. हिसा सुरू झाल्यानंतर काही पोलीस जखमी झाले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रसिद्ध केलं संयुक्त निवेदन
दरम्यान देशभरातील धार्मिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासंदर्भात शनिवारी सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षाच्या 13 नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे.
संयुक्त निवेदन देणाऱ्या नेत्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे डी.राजा, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव देवव्रत विश्वास, आययूएमएलचे महासचिव पी.के. कुन्हालीकुट्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव दीपांकर भट्टाचार्य यांचा समावेश आहे.
लोकांनी शांततेचं पालन करावं असं आवाहन या नेत्यांनी केलं आहे. तेढ पसरवून शांततेचं भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी असं आवाहन या नेत्यांनी केलं आहे.
खाणंपिणं, कपडे, श्रद्धा, सणसमारंभ, भाषा यावरून सत्ताधारी पक्ष ध्रुवीकरण केलं जात आहे. यामुळे आम्ही अतिशय दु:खी आहोत.
देशभरात प्रक्षोक्षक आणि द्वेषकारक भाषणांची वाढती संख्या चिंताजनक आहे. अशा लोकांना संरक्षण आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक राज्यांमध्ये धार्मिक हिंसेच्या घटनांचा आम्ही निषेध करतो.
ज्या ठिकाणी या घटना घडल्या आहेत त्यांचा एक पॅटर्न आहे. सणांपूर्वी प्रक्षोभक भाषणं केली जातात. द्वेष पसरवला जातो. सोशल मीडिया आणि ऑडियो व्हीडिओ प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पूर्वग्रहदूषित मजकूर शेअर केला जातो.
अशा घटनांवर पंतप्रधानांचं मौन अस्वस्थ करणारं आहे. अशा पद्धतीने समाजात द्वेष भडकावणाऱ्या लोकांविरोधात पंतप्रधान काहीही करू शकलेले नाहीत.
द्वेषमूलक विचारांना रोखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजातील सर्व स्तरातल्या लोकांना आम्ही शांततेचं आवाहन करतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)