KGF 2 : यश घरातून पळून जाऊन सुपरस्टार कसा बनला?

'वॉयलेंस...वॉयलेंस.. वॉयलेंस! आय डोंट लाइक इट. आय अवॉइड..बट..वॉयलेंस लाइक्स मी' हा डायलॉग ऐकून कोणत्या तरी अॅक्शन-पॅड चित्रपटाचा हा डायलॉग असू शकतो हे वाटतं. तर हा डायलॉग 'KGF-2' मधला असून हा चित्रपट अनेक स्टार्स आणि त्यांच्या अॅक्शनमुळे चर्चेत आलाय. पण त्यासोबतच या चित्रपटाचा अभिनेता यशही चर्चेत आहे.

मुळात हा चित्रपट कन्नड भाषेतला आहे. 2018 मध्ये कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये KGF चा फर्स्ट पार्ट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बराच हिट झाला होता.

KGF 2 मध्ये सुपरस्टार यश सोबत संजय दत्त, रवीना टंडन आणि प्रकाश राज प्रमुख भूमिकेत आहेत.

फिल्मी दुनियेतला यशचा प्रवास हा काही फ्लॅट स्क्रिप्टेड फिल्म नाहीये. यात बरेच ट्विस्ट आहेत, खूप सारा ड्रामा आहे, घरातून पळून आल्याची गोष्ट आहे, बॅक स्टेजवरून हिरोपर्यंत मजल मारलेल्या नायकाची ही कथा आहे.

'फिल्म कम्पेनियन'ला दिलेल्या एका मुलाखतीत यश म्हणाला होता, "जेव्हा मी या इंडस्ट्रीत नवीन होतो, तेव्हा मला वाटायचं की तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीतून आला आहात याने काही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचं काम आवडतं की नाही, प्रेक्षक तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतो की नाही यावर गोष्टी अवलंबून असतात."

नवीन कुमार गौडा या नावाने सुरू झालेल्या यशच्या प्रवासावर 'बॉलीवूड हंगामा'ने रॅपिड फायर राऊंड घेतला होता.

या राऊंडमध्ये नवीन कुमार गौडा नावाने ओळखल्या जाण्याच्या प्रश्नावर यश म्हणतो की, जेव्हा कोणी त्याला या नावाने हाक मारेल तेव्हा त्याची पहिली प्रतिक्रिया असेल की 'हा कोण आहे?' कारण बहुतेक लोक त्याला या नावाने ओळखतचं नाहीत.

चित्रपट विश्वात अशी झाली सुरुवात

'द न्यूज मिनट'ला दिलेल्या मुलाखतीत यशने सांगितलं होतं की, त्याचे वडील बीएमटीसीमध्ये बस ड्रायव्हर होते आणि त्यांच्या मुलाने सरकारी अधिकारी व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.

पण त्याला काही वेगळंच आवडायचं. तो नाटकांमध्ये, डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा. त्या काळात त्याच्यासाठी वाजणाऱ्या शिट्ट्या त्याच्यातल्या वाढणाऱ्या कलाकाराला ऊर्जा द्यायचे.

यश सांगतो, त्याला लहानपणापासूनच हिरो बनायचं होतं. तो नाटकात, डान्समध्ये भाग घ्यायचा. त्याच्यासाठी जेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवायचे, शिट्ट्या वाजवायचे हे बघून तो खुश व्हायचा. त्याला वाटायचं की तो हिरोचं आहे.

मुलाखतीत तो सांगतो की, हिरो बनण्यासाठी तो घरातून पळून बंगळुरूला आला होता. पण एवढ्या मोठ्या शहरात पाऊल ठेवताच तो घाबरला. त्याच्या खिशात फक्त 300 रुपये होते. जेव्हा घराकडे परत जाण्याचा विचार त्याच्या मनात आला, तेव्हा घरचे त्याला परत पाठवणार नाहीत हे ही तो जाणून होता.

तो सांगतो की, त्याला संघर्षाची भीती वाटत नाही. बंगळुरूमध्ये त्याने थिएटरमध्ये बॅकस्टेजवर काम करायला सुरुवात केली. चित्रपटसृष्टीचा संघर्षही नेमका याचवेळी सुरू होता.

यशने 2008 मध्ये आलेल्या मोगिना मनासु या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्याला 'सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता'हा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. यानंतर तो 'राजधानी', 'गजकेसरी', 'मास्टरपीस' यांसारख्या चित्रपटांतून लोकप्रिय झाला.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर त्याने अभिनेत्री राधिका पंडितसोबत लग्न केलंय. राधिका आणि यश यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की त्यांनी बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर लग्न केलं कारण त्यांना वाटलं की ते एकमेकांसाठीचं बनले आहेत. या जोडप्याला दोन मुले आहेत.

यशची इच्छा

यशला बॉलिवूडमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करायचे आहे. कारण तो त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता मानतो.

तर यश शाहरुख खानला आपलं प्रेरणास्थान मानतो. यश अमिताभ बच्चन यांना 'ट्रू जेंटलमन' म्हणतो.

यशने त्याच्या जुन्या मुलाखतींमध्ये म्हंटलय की, गावाकडून येऊन हिरो बनलेल्या त्याच्या या प्रवासामुळे कदाचित प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याची हीच गोष्ट प्रेक्षकांना प्रेरणा देते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)