सातारा: गरोदर वनरक्षकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, माजी सरपंचाला अटक, काय आहे संपूर्ण प्रकरण?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सातारा येथील पळसवडे गावात माजी सरपंचाकडून एका गरोदर वनरक्षक महिलेला मारहाण झाल्याची घटना बुधवारी समोर आली होती.

या घटनेतील आरोपीला पोलिसांनी पहाटे 3 वाजता अटक केल्याची माहिती साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.

वनरक्षक सिंधू सानप या व्याघ्र गणनेसाठी महिला मजुरांना घेऊन जात असताना त्यांना आरोपी रामचंद्र जानकर यांनी मारहाण केली होती.

'माझ्या परवानगीशिवाय तू मजुरांना घेऊन कशी गेली,' असं म्हणत त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जानकरच्या विरोधात सानप यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

सिंधू सानप यांनी बुधवारी रात्री उशिरा माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, "मी इकडे हजर झाल्यानंतर त्यांनी अनेकदा पैशांची मागणी केली. त्याचबरोबर ते धमकावत देखील होते. मी त्यांना पैसे खाऊ देत नव्हते."

"आमचं ट्रान्झिट लाइनच काम सुरू असताना दोन दिवसांपूर्वी मला त्यांनी धमकी दिली होती. काल काम संपवून माझ्या क्षेत्रात परत येत असताना त्यांनी मला लाथाबुक्यांनी मारहाण केली तसंच माझ्या पतीला चपलेने मारहाण केली," सानप यांनी सांगितले.

सानप यांच्यासोबत काम करणारे सहाय्यक वन संरक्षक सुधीर सोनावले म्हणाले, "अखिल भारतीय व्याघ्र जनगणना सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. सकाळच्या वेळेत ही जनगणना असते. प्रत्येक वनरक्षकाने त्याच्या भागात वाघ आणि इतर वन्यजीवांचे काही अवशेष तसेच प्रत्यक्ष सायटिंग होते का याची माहिती घ्यायची असते. त्याचे तपशील पुढे पाठवायचे असतात."

"या कामासाठी सिंधू सानप या 3 महिन्याच्या गरोदर महिला पळसवडे या गावात गेल्या होत्या. त्यावेळी त्या गावचे माजी सरपंच आणि संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाणकार हे त्यांच्या पत्नीसोबत तिथे आले. सुरुवातीला चप्पल आणि लाथाबुक्यांनी त्यानी सानप यांना मारहाण केली. तसेच सानप यांच्या पतीला देखील लाथाबुक्या आणि दगडाने मारहाण केली. दोघंही शासकीय कर्तव्यावर असताना त्यांच्यावर हल्ला झाला आहे," सोनावले यांनी सांगितले.

"वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जंगलात काम करण्यासाठी मजूर लावले जातात. ते मजूर मला न विचारता कसे घेऊन गेले असं म्हणत त्यांनी मारहाण केली.

"वस्तुतः शासकीय कामासाठी मजूर घेऊन जाण्यासाठी अध्यक्षांच्या परवानगीची गरज नाही. त्याचबरोबर शासनाचे तसे कुठलेही निर्देश नाहीत. हुकूमशाही पद्धतीचा वापर करून महिलेला अक्षरशः खाली पाडून मारहाण करण्यात आली आहे," असं सोनावले यांनी सांगितलं.

आरोपी घटना घडल्यानंतर फरार होता. पोलिसांनी पहाटे 3 वाजता त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

याबाबत माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराटे म्हणाले, "आरोपी रामचंद्र जाणकार याला रात्री 3 वाजता अटक करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि सध्या अटक करण्याची कारवाई सुरू आहे.

"17 तारखेला देखील आरोपीने सानप यांना शिवीगाळ केली होती. तसेच माझ्या परवानगी शिवाय त्या मजूर महिलांना तू कशी काय घेऊन गेलीस असं देखील ते म्हणाले होते. बुधवारी सानप या त्यांच्या पतीला सोबत घेऊन गेल्या तेव्हा आरोपीने त्या दोघांना मारहाण केली," असं बोराडे यांनी सांगितले.

दरम्यान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

"अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत. आरोपीला कडक शिक्षा होईल, असं ते ट्वीट करून म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)