You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चरणजीत सिंग चन्नी-नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष, DGP नियुक्तीवरुन आमनेसामने
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा देणारे नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील बैठकीस सुरुवात झाली आहे.
चंदीगड येथील पंजाब भवन येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीच्या वादासंदर्भात ही बैठक होत आहे.
सिद्धू यांनी मंगळवारी (29 सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता.
मुख्यमंत्री चन्नी यांच्या निमंत्रणावरून आपण त्यांना भेटायला जात असल्याचं सिद्धू यांनी आज सकाळी म्हटलं होतं.
पण मीटिंगला जाण्याच्या काही वेळापूर्वीच सिद्धू यांनी चन्नी सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
सिद्धू म्हणाले, "पोलीस महासंचालक सहोता हे बादल सरकारच्या कार्यकाळात अब्रूनुकसानी प्रकरणाच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या SIT चे प्रमुख होते.
त्यांनी चुकीच्या पद्धतीने दोन शीख तरुणांना पकडलं होतं. तसंच बादल यांना क्लिन चीटही दिली होती.
2018 मध्ये मी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी या तरुणांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला होता.
सिद्धू यांनी बुधवारीही एक व्हीडिओ संदेश प्रसारित केला. ते म्हणाले, "मी अडणार आणि लढणार सुद्धा. माझं सगळं काही गेलं तरी चालेल."
कपिल सिब्बल यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, घरावर फेकले टोमॅटो
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची दखल काँग्रेस नेत्यांनी घेतली असून शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.
बुधवारी (30 सप्टेंबर) सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या घरासमोर जमा झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घराबाहेर तोडफोड केल्याचंही सांगितलं जात आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार मनिष तिवारी आणि शशि थरूर यांनी नाराजी दर्शवली.
नेमकं काय घडलं?
काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
"काँग्रेसला कोणताही स्थायी अध्यक्ष नसल्याने पक्षाचे निर्णय कोण घेत आहे, याची आपल्याला कल्पना नाही," असं सिब्बल म्हणाले होते.
गेल्या वर्षी 23 ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुखांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. 23 ज्येष्ठ नेत्यांनी संघटनेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत त्यावेळी व्यक्त केलं होतं.
कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर गुलाम नबी आझाद यांनीही पत्र लिहून काँग्रेसच्या सेंट्रल वर्किंग कमिटीच्या बैठकीची मागणी केलेली आहे.
पण याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी सिब्बल यांच्या घरासमोर गोंधळ घातला.
शशि थरूर आणि मनिष तेवारी काय म्हणाले?
मनिष तेवारी यांनी या घटनेबाबत ट्विट करून प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "सिब्बल यांच्या घरासमोरील कारचं नुकसान करण्यात आलं आहे. लोक कारवर चढले होते, त्यामुळे ही कारच्या छताचा भाग दबला गेला आहे. लोकांनी घरावर टमाटे फेकले. ही गुंडगिरी नाही तर काय?"
काही वेळानंतर शशि थरूर यांनीही या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. हा प्रकार लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले.
"हा प्रकार लज्जास्पद आहे. एक सच्चे काँग्रेसी म्हणून कपिल सिब्बल यांची ओळख आहे. त्यांनी काँग्रेसच्या वतीने कित्येक प्रकरणांमध्ये पक्षाची बाजू मांडली आहे. एक लोकशाही पक्ष असल्याने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आपण त्यांच्याशी असहमत असू शकतो, पण त्यासाठीही ही पद्धत योग्य नाही. आपलं प्राधान्य स्वतःला मजबूत बनवणं, भाजपविरुद्ध लढा देणं ही असली पाहिजे," असं थरूर यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)