Quad Group : व्हाईट हाऊसमध्ये होणार 'क्वाड' संमेलन, नरेंद्र मोदींचाही सहभाग

24 ऑक्टोबर 2021 रोजी अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये 'क्वाड' नेत्यांचं संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं याबाबत घोषणा केली आहे.

या संमेलनात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिंदे सुगा हे सहभागी होणार आहेत.

व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की, "क्वाड नेत्यांच्या चर्चेचा भर देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी, तसंच हवामान बदल, तंत्रज्ञान, सायबर स्पेस यांसारख्या गोष्टींवर असेल."

तसंच, भारत-प्रशांत क्षेत्रावरही या संमेलनात चर्चा होणार असल्यानं चीनसाठी हा चिंतेचा विषय असेल. कारण चीन क्वाड देशांवर उघडपणे टीका करत आलंय.

'क्वाड'मुळे चिंतेत असलेल्या चीनला भारत आणि ऑस्ट्रेलियानं दिलं 'हे' उत्तर

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) चीनची टीका फेटाळत म्हटलं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर करणं अयोग्य आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र आणि संरक्षणमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत एस. जयशंकर यांनी हे विधान केलं.

या पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पेन, संरक्षणमंत्री पीटर डटेन आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे होते.

याआधी चीनने ऑस्ट्रेलिया, अमेरिका, भारत आणि जपानच्या 'क्वाड' संघटनेला आशियाई देशांची 'नाटो संघटना' म्हणत टीका केली होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी 13 मे 2021 रोजी एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "आपण सगळेच जाणतो की, 'क्वाड' कशा पद्धतीचा गट आहे. एक वेगळा गट बनवण्याच्या, चीनला आव्हान देण्याच्या, शेजारी देशांसोबत चीनचं भांडण लावण्याच्या प्रयत्नांचा चीन विरोध करत आहे."

आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात हुआ चुनयिंग यांनी म्हटलं की, "जिथवर क्वाडचा प्रश्न आहे, मला वाटतं की, भारत या प्रकारच्या तंत्राचा हेतू अधिक चांगलं जाणतो. चीनविरोधात छोटे छोटे गट तयार करण्याचा याचा हेतू नाहीय?"

याचप्रकारे चीन वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी क्वाड संघटनेवर टीका करत आलंय.

एस. जयशंकर काय म्हणाले?

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, या पत्रकार परिषदेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी चीनने 'क्वाड' संघटनेबाबत केलेलं वक्तव्य फेटाळलं.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला उत्तर देताना म्हटलं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केलं जाऊ नये, हे महत्त्वाचं आहे आणि क्वाड संघटना देशासह जगाच्या कल्याणासाठी काम करणारं व्यासपीठ आहे.

ते पुढे म्हणाले, "मला वाटतं नाटो हा शीतयुद्धाशी जोडलेला शब्द आहे आणि त्यातून इतिहासात डोकावता येतं. क्वाड हा भविष्याकडे झेपावते आणि जागतिकिकरणाशी प्रतिबिंबित करतं. विविध देशांनी एकत्र येत काम करण्याची आवश्यकता क्वाड प्रकट करतं."

त्याचसोबत, एस. जयशंकर यांनी म्हटलं की, क्वाड लस, लशींचा पुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर आधारित होती.

क्वाडची नाटोशी तुलना केल्याबाबत एस. जयशंकर म्हणाले, "क्वाडसारखी संघटना आणि नाटो किंवा तत्सम संघटनांमध्ये मला कुठलाच संबंध दिसत नाही. त्यामुळे मला वाटतं की, वास्तवाला चुकीच्या पद्धतीने सादर केलं जाऊ नये."

या बैठकीनंतर एस. जयशंकर सांगितलं की, बैठकीतल अफगाणिस्तानातील चालू घाडमोडींवर विशेष चर्चा झाली आणि दोन्ही देश यावर सहमत झाले की, आंतरराष्ट्र समूहाने आपल्या भूमिकेत एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे.

"अफगाणिस्तानची जमीन दहशतवादी कृत्यांच्या कारवायांसाठी वापरली जाऊ नये, या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या 30 ऑगस्टच्या प्रस्तावानुसार आंतरराष्ट्रीय समूहाची भूमिका असायला हवी. यूएनएसी प्रस्ताव 1267 अन्वये दहशतवादी ठरवल्या गेलेल्या व्यक्ती आणि संघटना यांसाठीही अफगाणिस्तानची जमीन आधार बनू नये."

ऑस्ट्रेलियानं काय म्हटलं?

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरि पेन यांनी एस. जयशंकर यांचाच मुद्दा पुढे नेत म्हटलं की, "भारत आणि ऑस्ट्रेलियानं एकमेकांमधील संबंधांना ताकद दिलीय. दोन्ही देशांना क्वाडसारखी संघटना, आशिया शिखर संमेलन किंवा दक्षिण पूर्व आशियाई देशांची आसियन यांसारख्या संघटनांच्या माध्यमांतून सोबत काम करण्याची संधी मिळते."

"लस, जलवायू परिवर्तन आणि महत्त्वाचे तंत्रज्ञान इत्यादी गोष्टींबाबत आमचा सकारात्मक आणि व्यावहारिक उद्देश आहे. त्याचसोबत, आम्ही कोव्हिडशी संबंधित अपप्रचाराशीही लढतोय," असंही त्यांनी म्हटलं.

ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी या दौऱ्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली.

अफगाणिस्तानातील नवीन सरकारबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

यावेळी एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील नव्या सरकारबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं.

एस. जयशंकर म्हणाले, "अफगाणिस्तानातील अंतरिम सरकारच्या स्थापनेदरम्यान त्यात समावेश होणारे नेते, महिला आणि अल्पसंख्यांकांसोबतचं वर्तन, अफगाण नागरिकांचा प्रवास, मानवतावादी हेतून मदत पोहोचवणं यांसंबंधी चिंता होत्या. अशात एक बदलणारी स्थिती होती."

बांगलादेश आणि चीन आमने-सामने

क्वाड संघटनेवरून चीन आणि बांगलादेशही आमने-सामने आले होते.

ढाकामध्ये चीनचे राजदूत ली जिमिंग यांनी बांगलादेशला अमेरिकेच्या नेतृत्त्वातील क्वाड संघटनेत सहभागी न होण्याचा सल्ला देत म्हटलं होतं की, बिजिंगविरोधी क्लबमध्ये ढाकाची भागिदारी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना मोठं नुकसान पोहोचवेल.

बांगलादेशचे डिप्लोमेटिक करन्स्पॉन्डट एसोसिएशनतर्फे आयोजित एका व्हर्च्युअल बैठकीत ली जिमिंग यांनी हे विधान केले होते.

चिनी राजदूतांचं वक्तव्य 'अत्यंत दुर्दैवी' आणि 'आक्रमक' असल्याचं बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी म्हटलं होतं. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत आणि आम्ही आमची परराष्ट्र नीती स्वत: ठरवतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)