साकीनाका बलात्कार प्रकरणात 350 पानांचे चार्जशीट दाखल - पोलीस

मुंबईतील साकीनाका या ठिकाणी 30 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीवर 350 पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मुंबईतील साकीनाका याठिकाणी खैरानी रोड परिसरात बलात्कार झालेल्या 30 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पीडित महिला 9 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरातील खैरानी रोड भागात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं होतं.

याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या व्यक्तीला अटकही करण्यात आली होती.

दरम्यान, याप्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

पोलिसांनी प्रकरणाच्या तपासाला वेग देऊन तातडीने एका संशयिताला अटक केली. पण या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे.

महिला आयोगानं घेतली दखल

राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण होणं आणि त्यांचं संरक्षण करणं हे अत्यंत गरजेचं असल्याचं महिला आयोगानं म्हटलं आहे. माध्यमांमधील वृत्ताचा उल्लेख करत महिला आयोगानं या प्रकरणी काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 376, 307 आणि 325 या कलमान्वये आरोपींवर कारवाई करता येणं शक्य असल्याचं महिला आयोगाच्या वतीनं निदर्शणास आणून देण्यात आलं आहे. त्यानुसार या प्रकरणात योग्यप्रकारे गुन्हा दाखल होणं गरजेचं असल्याचं महिला आयोगानं म्हटलं आहे. पीडितेला एवढ्या निर्घृण अत्याचाराचा सामना करावा लागला. हे अत्याचार पाहता या प्रकरणाचं गांभीर्य समोर येतं असं महिला आयोगानं म्हटलं आहे.

बलात्काऱ्यांना सरकारचा राजाश्रय - चित्रा वाघांचा आरोप

प्रत्येक सरकारच्या कालावधीत महिला आणि मुलींवर बलात्कार होतात. पण सरकार काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं असतं. मात्र, या सरकारमध्ये बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचं काम केलं जात आहे. त्यातून विकृतांचं मनोबल वाढवण्याचं काम सरकारनं या माध्यमातून केलं, असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

"या महिलेवर राक्षसी पद्धतीनं बलात्कार करण्यात आला. ज्या पद्धतीने हे अत्याचार चालले आहेत, हे थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले आहेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका हे मला सरकारला सांगायचं आहे," असं त्या म्हणाल्या.

"गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. साडे तेरा वर्षांच्या मुलीवर 14 लोकांनी बलात्कार केला. सहा वर्षाच्या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार झाला. ठाण्यात अतिरिक्त आयुक्तांची बोटं छाटली गेली. आज सकाळीच अमरावतीमध्ये एका सतरा वर्षाच्या, सात महिन्याची गर्भवती असलेल्या मुलीवर बलात्कार झाला. तिनं फाशी घेत स्वतःला संपवलं," असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

साकीनाक्याची तरुणी मृत्यूशी झुंज देत होती. मात्र आम्ही भाषणं आणि घोषणा करण्यापलिकडं काहीही करू शकलो नाहीत, याचं दुःख असल्याचं त्यांनी म्हटलं.

सरकार शक्ती कायदा आणणार होते, त्याचं काय झालं असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आरोपींना फाशीच व्हायला हवी- देवेंद्र फडणवीस

साकीनाका बलात्कार प्रकरण हे मानवतेला काळिमा फासणारं आहे, असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करून तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी केली.

ज्याप्रकारे गेल्या महिनाभरात बलात्काराच्या घटना होत आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुण्यात तीन घटना घ़डल्या असून एक गँगरेपची घटना आहे. माणसं इतकी पाशवी कशी होऊ शकतात, असा प्रश्न पडावा अशा या घटना आहेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

शिक्षा काय करायची हे न्यायालय ठरवतं, पण या नराधमांना फाशीच व्हायला हवी, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

नेमकं काय घडलं होतं?

बलात्कारानंतर संशयिताने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातल्याची माहिती आज तकने दिलेल्या वृत्तात नमूद केली आहे.

सदर पीडित महिला शुक्रवारी रात्री (9 सप्टेंबर) साकीनाकाच्या खैरानी रोड भागात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

पीडित महिलेची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले.

महाराष्ट्रात बलात्कारांचं सत्र

मुंबई बलात्कार प्रकरणामुळे दिल्लीच्या निर्भया प्रकरणाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या प्रकरणाच्या तपासानंतरच यातील तथ्य समोर येईल.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांत तब्बल 4 घटना समोर आल्या आहेत. यातील 3 घटना तर एकट्या पुण्यातीलच आहेत.

सर्वप्रथम पुणे रेल्वे स्टेशन येथे मित्राला भेटण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलं.

वानवडी परिसरात राहणाऱ्या या 14 वर्षीय मुलीला घरी सोडतो, असं म्हणत रिक्षाचालकाने तिला भलतीकडेच नेलं. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

त्याशिवाय,पुणे रेल्वे स्थानक परिसरातच एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आईच्या कुशीतून घेऊन जाऊन बलात्कार केल्याची घटना पुण्यात समोर आली होती.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणे स्टेशन बस स्थानकालगत पिडीत मुलीचे कुटुंब राहते. मुलगी आईच्या कुशीत झोपलेली असताना आरोपी रिक्षाचालकाने मुलीचे अपहरण केले. रिक्षाचालक मुलीला मार्केडयार्ड येथील एका पडक्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर घेऊन गेला. तिथे नेऊन आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

मुलीच्या घरच्यांना जाग आल्यानंतर मुलगी नसल्याचे समोर आले. शोध घेतल्यानंतरही मुलगी मिळून न आल्याने कुटुंबियांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढत त्याला मार्केडयार्ड परिसरातून अटक केली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चास गावामध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार 27 मे ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये घडला. मुलीच्या आईने 8 सप्टेंबरला पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी 27 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान आरोपींनी अल्वपयीन मुलीवर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्ती लैंगिक अत्याचार केले. मुलीची आई धुण्याभांड्याचे काम करते. आरोपी हे एकाच गावातील असून मुलीच्या घराजवळ राहणारे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

राज्यातील या सर्व घटनांच्या पाठोपाठ मुंबई येथील घटना समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून राजकीय वातावरणही ढवळून निघाल्याचं दिसून येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)