You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आमिर खान-किरण राव कार्यक्रमात एकत्र आले आणि म्हणाले....
घटस्फोटाची घोषणा केल्याच्या एका दिवसानंतर आमिर खान आणि किरण राव यांनी 'आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत,' असं सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमिर खान आणि किरण राव 'पाणी फाऊंडेशन'च्या साप्ताहिक ऑनलाईन कार्यक्रमात कारगिलहून सहभागी झाले.
आमिर खान म्हणाला, "तुम्ही आमची घोषणा ऐकली असेल. तुम्ही दुःखी झाला असाल. तुम्हाला चांगलं वाटलं नसेल. पण आम्ही दोघंही खूप आनंदी आहोत. एकच कुटुंब आहोत. आमचं नातं बदललं आहे परंतु आम्ही एकत्र आहोत. आम्ही आनंदी राहू अशी प्रार्थना करा."
"आम्ही एकत्र काम करत राहू अशी आम्ही खात्री देतो," असं किरण राव यांनी म्हटलं.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून 'पाणी फाऊंडेशन' अशा साप्ताहिक चर्चेच्या कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि यात आमिर खान-किरण राव दोघंही हजर असतात.
दोघांनी शनिवारी (3 जुलै) संयुक्त निवेदन जारी करून विभक्त होणार असल्याची माहिती दिली. 15 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं होतं आणि त्यांना एक मुलगा आहे.
आमिर आणि किरण लिहितात, "या 15 सुंदर वर्षांत आम्ही अनेक आनंदाचे, समाधानाचे, हास्याचे सुरेख क्षण एकत्रित अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आमच्या आयुष्यात नव्या टप्प्याला सामोरं जायचं आहे.
या प्रवासात आम्ही नवरा-बायको नसू. आम्ही मुलांसाठी सहपालक असू. एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विचारपूर्वक विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही घेतला. यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. या भूमिकेला आम्ही न्याय देऊ.
चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसंच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. आमच्या घरचे, मित्रमैत्रिणी यांचे आम्ही आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला सदैव प्रेम आणि पाठिंबा दिला.
आमचं नातं दृढ होताना त्यांची आम्हाला खंबीर साथ लाभली. त्यांच्या आधाराशिवाय एवढा मोठा निर्णय आम्ही घेऊ शकलो नसतो. हितचिंतकांच्या शुभेच्छांसाठी, नातलगांच्या आशीर्वादासाठी आम्ही ऋणी राहू. घटस्फोट हा नात्याचा शेवट नसेल तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असेल."
आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान चित्रपटावेळी आमिर आणि किरण यांची पहिल्यांदा भेट झाली. किरण त्या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिका होत्या.
28 डिसेंबर 2005 रोजी त्यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा असून त्याचे नाव आझाद आहे.
आमिरचं हे दुसरं लग्न होतं. याआधी आमिरने रीना दत्ता यांच्याशी 1986 मध्ये लग्न केलं. त्या दोघांनी 2002 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जुनैद खान आणि इरा खान ही या जोडप्याची दोन मुलं आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)