You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आमिर खान-किरण राव विभक्त होणार
आमीर खान आणि किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. एका पत्रकाद्वारे त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
आमिर आणि किरण लिहितात, "या 15 सुंदर वर्षात आम्ही अनेक आनंदाचे, समाधानाचे, हास्याचे सुरेख क्षण एकत्रित अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम या आघाड्यांवर आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले. आता आम्हाला आमच्या आयुष्यात नव्या टप्प्याला सामोरं जायचं आहे.
या प्रवासात आम्ही नवरा-बायको नसू. आम्ही मुलांसाठी सहपालक असू. एकमेकांच्या कुटुंबीयांसाठी सदैव सोबत असू. विचारपूर्वक विभक्त होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी आम्ही घेतला. यासंदर्भात औपचारिक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. आम्ही स्वतंत्र राहू मात्र एकमेकांच्या कुटुंबाचा भाग असू. आझाद या आमच्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आमच्यावर एकत्रितपणे आहे. या भूमिकेला आम्ही न्याय देऊ.
चित्रपट, पाणी फाऊंडेशन तसंच अन्य आवडीच्या प्रकल्पांसाठी आम्ही एकत्रितपणे काम करू. आमच्या घरचे, मित्रमैत्रिणी यांचे आम्ही आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला सदैव प्रेम आणि पाठिंबा दिला.
आमचं नातं दृढ होताना त्यांची आम्हाला खंबीर साथ लाभली. त्यांच्या आधाराशिवाय एवढा मोठा निर्णय आम्ही घेऊ शकलो नसतो. हितचिंतकांच्या शुभेच्छांसाठी, नातलगांच्या आशिर्वादासाठी आम्ही ऋणी राहू. घटस्फोट हा नात्याचा शेवट नसेल तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असेल".
धन्यवाद आणि प्रेम,
किरण आणि आमीर
आमीरचं हे दुसरं लग्न होतं. याआधी आमिरने रीना दत्ता यांच्याशी 1986 मध्ये लग्न केलं. त्या दोघांनी 2002 साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जुनैद खान आणि इरा खान ही या जोडप्याची दोन मुलं आहेत.
आमिर आणि किरण यांचं 2005 मध्ये लग्न झालं होतं. 15 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान चित्रपटावेळी आमिर आणि किरण यांची पहिल्यांदा भेट झाली. किरण त्या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिका होत्या.
डिसेंबर 2020 मध्ये आमीर, किरण आणि मुलगी इरा खान हे तिघे गीर अभयारण्यात आमिर-किरण यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते.
किरण यांनी धोबीघाट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. जाने तू जाने ना, पीपली लाईव्ह, धोबीघाट, दिल्ली बेल्ली, तलाश, दंगल, सिक्रेट सुपरस्टार, रुबरू रोशनी या चित्रपटांच्या त्या निर्मात्याही होत्या.
आमीर आणि किरण हे पानी फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमांमध्ये नियमितपणे सहभागी व्हायचे. महाराष्ट्रातल्या अनेक गावाखेड्यात जाऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)