चीनचा भारतावर आरोप - 'भारत आमच्या भूभागावर अतिक्रमण करत आहे'

भारत-चीन यांच्यातील सीमेवरील तणाव संपुष्टात येण्याची चिन्हं दिसत नाहीये.

मंगळवारी (22 जून) भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटलं होतं की, "चीनसोबत सीमेरेषेवरील तणावाबाबत दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत.

"एक म्हणजे सीमेवर सैन्याची समोरासमोरील उपस्थिती आणि दुसरं म्हणजे सीमेवर सैन्याची तैनाती कमी करण्याच्या आश्वासनावर चीन कायम राहिल की नाही? हा प्रश्न आहे."

भारताचे परराष्ट्र मंत्री कतार येथील इकॉनॉमिक फोरममध्ये बोलत होते. तिथं त्यांनी भारत-चीन सीमेवरील तणावाविषयी प्रश्न विचारण्यात आला.

एस. जयशंकर यांच्या या वक्तव्यावर बुधवारी (23 जून) चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं अतिशय कठोरपणे उत्तर दिलं.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजिआन यांना ब्लूमबर्गनं विचारलं, "भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनच्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी उपस्थित केलेले दोन मुद्दे हे दोन्ही देशांच्या संबंधांत सर्वांत मोठं आव्हान आहे. यावर चीनचं काय म्हणणं आहे?"

यावर उत्तर देताना चाओ लिजिआन यांनी म्हटलं, "भारत-चीन सीमेवरील पश्चिम भागात जे सैन्य तैनात करण्यात आलं आहे ते सामान्य सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहेत. याचा उद्देश संबंधित देशाच्या अतिक्रमणाला उत्तर देणं आणि चीनी भूभागावरील धोक्यांपासून निपटारा मिळवणं आहे.

"गेल्या अनेक काळापासून भारत सीमेवरील सैन्याची उपस्थिती वाढवत आहे आणि आमच्या भूभागावर अतिक्रमण करत आहे. भारत-चीन सीमेवरील तणावाचं खरं कारण हेच आहे. चीन सुरुवातीपासूनच हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करत आला आहे आणि सीमावादाला द्विपक्षीय संबंधाशी जोडण्याच्या विरोधात आम्ही आहोत."

दोन्ही देशांच्या या वक्तव्यावरून सीमेवरील तणाव अजून संपुष्टात न आल्याचं दिसून येतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)