You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तौक्ते चक्रीवादळ : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्यातून तौक्ते चौक्रीवादळ निर्माण झालं आहे. हे चक्रीवादळ आता कोकण किनारपट्टीपासून समुद्रात आत दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा तडाखाही बसला आहे.
रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयानं काढलेल्या पत्राकत म्हटलंय की, "भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार पूर्वमध्य समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. 14 ते 16 मे दरम्यान चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. नागरिकांनी समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. समुद्र व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे."
हवामान खात्यानं अंदाज वर्तवला होता की, 14 मेच्या सकाळपर्यंत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं. लक्षद्वीप आणि केरळच्या परिसरात हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा अंदाज खरा ठरत, चक्रीवादळ निर्माण झालं आणि ते गुजरातच्या दिशेनं सरकत चाललं आहे.
या हवामानामुळे 16 मेच्या सुमारास दक्षिण कोकण परिसरात वेगवान वारे आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारी करणाऱ्या बोटींनी 14 तारखेपर्यंत किनाऱ्यावर परतावं असा इशारा हवामानखात्यानं दिला होता.
हिंदी महासागराच्या उत्तरेला म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एरवी मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल-मे दरम्यान चक्रीवादळांची निर्मिती झालेली दिसते. यंदा मात्र मेच्या मध्यावर पहिलं वादळ अरबी समुद्रात निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर झालं, तर त्याला 'तौकते' हे नाव दिलं जाईल. म्यानमारनं सुचवलेलं हे नाव आहे. चक्रीवादळांची नावं कशी ठरवली जातात, याविषयीचं सविस्तर वृत्त तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवर वाचू शकता. कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पूर आणि मुसळधार पावसाचं संकट सरकारी यंत्रणा आणि आरोग्य सुविधांवरचा ताण वाढवू शकतं, असं केंद्रीय पृथ्वी-विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला निसर्ग या चक्रीवादळाचा थेट तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)