चक्रीवादळांची नावं नेमकी कशी ठेवली जातात?

जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावं ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावं सूचवतात.

वादळांची नावं देशांकडून आणि सुचवलेल्या नावांमधूनच सुचवली जातात.

1953पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेटिरिओलॉजिकल ऑर्गनायजेशन (डब्ल्यूएमओ चक्रीवादळं आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावं ठेवत आला आहे.

डब्ल्यूएमओ ही जिनिवास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे.

परंतु उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावं ठेवली गेली नव्हती. कारण या वादळांची नावं ठेवणं एक वादग्रस्त काम होतं.

चक्रीवादळ सूचना केंद्रातील अधिकारी डॉ. एम महापात्रा यांच्यामते, धार्मिक, जातीय विविधता असणाऱ्या या प्रदेशात लोकांच्या भावना दुखावू नयेत यासाठी त्यांना नावं देण्यात आली नाही.

वर्ष 2004 मध्ये ही स्थिती बदलली. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनेल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावं ठेवायला सांगितलं.

यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी 64 नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी 8 नावं सूचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावं या सूचीतून ठेवली जातात.

तौकते म्हणजे सरडा

2021च्या मोसमातलं तौकते हे भारताच्या पश्चिम किनारपट्टी परिसरातलं पहिलं चक्रीवादळ आहे. 'तौकते' हे नाव म्यानमारने सुचवलेलं आहे. तौकतेचा अर्थ सरडा असा होतो. 18 मे च्या पहाटे हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे.

फणी म्हणजे साप

फणी वादळाचं नावसुद्धा या यादीमधूनच ठेवण्यात आलं आहे. बांगलादेशात सापाला फणी असं म्हटलं जातं. हा शब्द फणा या शब्दावरूनच आला आहे. फणाचा हा बंगाली उच्चार आहे. फणी संस्कृत शब्दाचा अर्थ सापाचे डोके असा होतो. त्यावरूनच फणीश्वर शब्द तयार झाला आहे. भगवान शंकराला फणीश्वर नावानं ओळखलं जातं.

या सूचीमध्ये प्रत्येक देशाच्या अद्याक्षरानुसार क्रम लावण्यात आला आहे. या हिंदी महासागराच्या प्रदेशात 2014मध्ये आलेल्या चक्रीवादळाचं नाव नानुक हे नाव म्यानमारने ठेवलं होतं.

इतर सदस्य देशांचे लोकही याचं नाव सुचवू शकतात. नावं लहान असावं, ते समजण्यासारखे असावं, ते सांस्कृतीकदृष्ट्या संवेदनशील आणि भडकाऊ असू नये ही अट ठेवून भारत सरकार नावं मागवते.

गेल्या वर्षी तितली वादळाचं नाव पाकिस्ताननं ठेवलं होतं. 2013 मध्ये भारताच्या आग्नेयेस आलेल्या फायलीन वादळाचं नाव थायलंडने ठेवलं होतं. तसेच निलोफर वादलाचं नाव पाकिस्तानने ठेवलं होतं. 2014मध्ये आलेल्या हुडहुड वादळाचं नाव या यादीत 34 व्या क्रमांकावर होतं असं डॉ. महापात्रा सांगतात.

भारतानं दिलेली नावं

भारतानं या यादीत दिलेली नाव मेघ, सागर, वायूसारखी सामान्य नावं दिली आहेत.

चक्रीवादळासंदर्भातील पॅनल दरवर्षी एकत्र येऊन चर्चा करतं आणि गरज पडली तर सूचीमध्ये बदल करतं.

या 64 नावांच्या यादीमुळे कधी वाद झालाच नाही असं नाही.

2013मध्ये श्रीलंकेने महासेन नावाला श्रीलंकेतील राष्ट्रवादी विचारांचे लोक आणि अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर त्या वादळाला वियारू नाव देण्यात आलं. महासेन राजानं श्रीलंकेत शांतता आणि समृद्धीचं युग आणलं असं त्यांचं मत होतं. त्यामुळे अशा आपत्तीला त्यांचं नाव देणं त्यांना चुकीचं वाटलं.

यंदा मात्र आलेल्या या चक्रिवादळाला भारताच्या यादीतलं वायू हे नाव देण्यात आलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)