You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : अदार पुनावाला यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. कोरोना लस : अदार पुनावाला यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा
सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे.
गृह मंत्रालयाकडून या संदर्भात एक आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये अदार पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्याची सूचना करण्यात आली आहे.
अदार पुनावाला यांच्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून लस निर्मितीचं काम केलं जातं. पुण्यातील मांजरी परिसरात 100 एकर परिसरात ही कंपनी आहे.
ही कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लस पोहोचवण्याचं काम करते. सध्या सीरमकडून संस्थेकडून कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं मुख्य काम सुरू आहे. कोव्हिशिल्ड असं या लशीचं नाव आहे.
उद्योजक सायरस पूनावाला यांचे चिरंजीव असलेले अदार यांनी आपलं शिक्षण परदेशात पूर्ण केलं. भारतात आल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत काम करण्यास सुरुवात केली.
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या यशात अदार पूनावाला यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं. कोरोना व्हायरस संकटात लस निर्मितीचा विषय पुढे आल्यापासून अदार पुनावाला यांचं नाव चर्चेत आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
2. आजोबांसाठी ऑक्सिजन हवा असल्याचं पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल, आरोप-प्रत्यारोप सुरू
आपल्या आजोबांना ऑक्सिजनची गरज असून मदत करण्यासंदर्भातील मेसेज पोस्ट केल्याप्रकरणात उत्तर प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शशांक यादव असं या तरुणाचं नाव आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये थेट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या मुलाला मदत करण्यासंदर्भात दखल दिली.
या प्रकरणात तरुणाच्या आजोबांचा मृत्यूही झाला. मात्र भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने खोटा मेसेज व्हायरल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शशांक यादव या तरुणाने, 'माझ्या आजोबांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे', असं ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये शशांकने त्याच्या आजोबांना करोनाची लागण झालीय की नाही हे पोस्ट केलेलं नव्हतं. नंतर शशांकच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अमेठीच्या पोलिसांना फॉलोअप घेण्यास सांगितल्याची माहिती दिली. स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन सांगितले, "शशांकला तीनदा कॉल केला मात्र त्याने उत्तर दिलं नाही. यासंदर्भात अमेठीचे जिल्हाधिकारी आणि अमेठी पोलिसांना शशांकचा शोध घेऊन मदत करण्यास सांगितलं आहे," असं ट्वीट केलं होतं. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. गिरीश महाजन यांना राजकारणात मीच आणलं - एकनाथ खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात व्हायरल ऑडियो क्लीपवरुन सुरू झालेला वाद चांगलाच रंगला आहे.
महाजन यांनी खडसेंचं मानसिक संतुलन बिघडल्याबाबत केलेल्या टीकेला खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं.
"माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. गिरीश भाऊ यांना खात्री करायची असेल तर ते करू शकता", असं खडसे म्हणाले.
तसंच गिरीश महाजन यांचा सगळा इतिहास मला माहिती असून त्यांना राजकारणात जन्माला मी आणलं, असंही खडसे यांनी म्हटलं.
गिरीश महाजन तिकडे पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. तालुक्यातील नागरिक माझ्याकडे संताप व्यक्त करत आहेत. 1994, 1995 मध्ये फरदापूर येथे गिरीश महाजन यांची काय घटना घडली होती ती मला आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांचा पूर्ण इतिहास मला माहिती आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही," असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
4. लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन जावेद अख्तर यांची टीका
कोरोना लशींच्या वेगवेगळ्या किमतीवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. सर्वसामान्य नागरिकांकडूनही याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनीही लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरून केंद्र सरकारवर टीका केली.
देशात एक कायदा, एक भाषा, एक निवडणूक, एक विश्वास, एक मत असावं, असा उपदेश देणाऱ्या लोकांना लशीची किंमत संपूर्ण देशात एकच असावी, असं अजिबात वाटत नाही. विचित्र गोष्ट आहे ना, असं जावेद अख्तर ट्वीट करून म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
5. परिस्थिती हाताबाहेर, हात जोडून सांगतो, लॉकडाऊन लावा - अलाहाबाद हायकोर्ट
उत्तर प्रदेशातील परिस्थिती गंभीर असून राज्यातील मोठ्या शहरात 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू करावा, असा सल्ला अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला पुन्हा एकदा दिला आहे.
उत्तर प्रदेशात पंचायत निवडणुकांदरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन का केलं नाही, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारला. यादरम्यान 135 शिक्षण सेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या मृत्यूंना कोण जबाबदार असा प्रश्न उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला.
यापूर्वीही उत्तर प्रदेशमधील पाच मोठ्या शहरांत संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. पण हा आदेश मानण्यास सरकारने नकार दिला होता. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)