You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर
पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
27 मार्चपासून या राज्यांमधील मतदानाच्या टप्प्यांना सुरुवात होणार आहे. यातील काही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात तर काही राज्यांमध्ये एकाहून अधिक टप्प्यात निवडणुका होतील. मात्र, पाचही राज्यांचे निकाल 2 मे 2021 या एकाच दिवशी जाहीर होतील.
आजपासूनच (26 फेब्रुवारी 2021) विधानसभा निवडणुका होणाऱ्या पाचही राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
मतदारांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जाईल आणि कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं जाईल, असं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
- पहिल्या टप्प्यातील मतदान (30 जागा) - 27 मार्च 2021
- दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल 2021
- तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल 2021
- चौथ्या टप्प्यातील मतदान - 10 एप्रिल 2021
- पाचव्या टप्प्यातील मतदान - 17 एप्रिल 2021
- सहाव्या टप्प्यातील मतदन - 22 एप्रिल 2021
- सातव्या टप्प्यातील मतदान - 26 एप्रिल 2021
- आठव्या टप्प्यातील मतदान - 29 एप्रिल 2021
- निकाल - 2 मे 2021
तामिळनाडू विधानसभा निवडणूक (234 जागा)
- मतदान - 6 एप्रिल 2021
- निकाल - 2 मे 2021
केरळ विधानसभा (140 जागा)
- मतदान - 6 एप्रिल 2021
- निकाल - 2 मे 2021
आसाम विधानसभा निवडणूक
- पहिला टप्प्यातील मतदान - 27 मार्च 2021
- दुसऱ्या टप्प्यातील मतदान - 1 एप्रिल 2021
- तिसऱ्या टप्प्यातील मतदान - 6 एप्रिल 2021
- निकाल - 2 मे 2021
पुदुचेरी विधानसभा निवडणूक (30 जागा)
- मतदान - 6 एप्रिल 2021
- निकाल - 2 मे 2021
निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- निवडणुका होणाऱ्या पाच राज्यांमध्ये 18 कोटींहून अधिक मतदार मतदान करतील
- पाचही राज्यांमध्ये एकूण 824 जागांवर मतदान होईल
- केरळ आणि पुदुचेरीत मतदान केंद्र वाढवण्यात आलेत
- डोअर टू डोअर कॅम्पेन 5 पेक्षा जास्त लोक करू शकत नाहीत
- उमेदवार ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज दाखल करू शकतात
- मतदानाचा वेळ एका तासाने वाढवण्यात आला आहे
- संवेदनशील मतदान केंद्रांची यादी करण्यात आली असून, तिथं CRPF तैनात करण्यात येतील
- परीक्षा, सण असतील, त्या दिवशी मतदान नसेल
- तारखा जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहित लागू होतील
निवडणूक होत असलेले पाचही राज्य बिगर-हिंदी भाषिक राज्य म्हणून ओळखले जातात. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत अण्णाद्रमुक, केरळमध्ये डावे पक्ष तर आसाममध्ये भाजप सत्तेत आहे.
पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र काही दिवसांपूर्वीच येथील सरकार कोसळलं आहे.
वरील सर्व राज्यांमध्ये सर्वात लक्षवेधी लढत ही पश्चिम बंगालमध्ये असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेससमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. याठिकाणी भाजपमध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झालं. त्यातही सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील बरीच नेतेमंडळी आता भाजपवासी झाली आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
त्याचप्रमाण, तामिळनाडूची यंदाची निवडणूक सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि विरोधी पक्ष द्रमुक या दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
अण्णाद्रमुकच्या जयललिता आणि द्रमुकचे करूणानिधी या दोन्ही पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांचं गेल्या तीन वर्षांत निधन झालं. त्यांच्याा अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांच्या राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची असेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)