नरेंद्र मोदी : दहशत, हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रिय सहभाग #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. दहशत, हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रिय सहभाग: मोदी

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणं तसंच हिंसा घडवून आणणं यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय सहभाग वाढत चालला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

कोलकाता इथल्या विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यांनी म्हटलं, "जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय सहभाग वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणारेही आहेत.

"तुम्ही कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता हे महत्त्वाचे ठरते. विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक यावर तुमचे काम कसे होईल हे ठरते. तुम्हाला दोन्ही पर्याय खुले असतात."

"देशामध्ये लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचं की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते," असंही मोदींनी म्हटलं.

2. एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा! - सुप्रिया सुळे

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना नवी मुंबईत सत्ता परिवर्तन एक हजार एक टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

त्यांनी म्हटलं, "पवार साहेबांनी आता निवृत्त व्हावं, असं मार्गदर्शन फडणवीसांनी केलं होतं. मात्र, महाराष्ट्राला ते मान्य नव्हतं. त्यामुळेच 'एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा! महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस दुसरी तरफ', असे चित्र महाराष्ट्रात दिसले. फडणवीस म्हणतात म्हणून पवार साहेब निवृत्त होतो, असे म्हणतीलही पण महाराष्ट्राच्या मनात तसं नाहीये."

नवी मुंबईचा पुढचा महापौर महाविकास आघाडीचाच असेल, असेही सुप्रिया म्हणाल्या.

3. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंची निषेध याचिका

शिखर बँक घोटाळा झाल्याचा पुरावा पुढे आलेला नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य 69 जणांविरोधातील प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा मुंबई पोलिसांचा अहवाल म्हणजे धूळफेक असून तो फेटाळण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

त्यासाठी त्यांनी सत्र न्यायालयाकडे निषेध याचिका दाखल केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह घोटाळ्याशी संबंधित अन्य राजकीय नेत्यांची पोलिसांनी चौकशी केली नाही. याउलट राजकीय दबावाखाली आणि आरोपींना पाठीशी घालण्याच्या हेतूने पोलिसांनी या प्रकरणी घोटाळा झाला नसल्याचा दावा केला आहे, असा आरोप हजारे यांनी केला आहे.

4. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याला ड्रग्ससहित पकडलं

ड्रग्स प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पश्चिम बंगालच्या सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) पामेला गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

रस्त्यावर गाड्यांची तपासणी सुरू असताना त्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या कारमधून 10 लाख रुपयांचे 90 ग्रॅम कोकेन घेऊन जात होत्या.

पोलिसांनी हे कोकेन जप्त केलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

कायदा त्याचं काम करेल, असं भाजपनं म्हटलं आहे, तर टीएमसीनं म्हटलंय की, यापूर्वी भाजपची एक महिला कार्यकर्ता चाईल्ड ट्रॅफिकिंग केसमध्ये सापडली होती. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.

5. सेहवागचं ट्वीट आणि रिंकू राजगुरूची पोस्ट चर्चेत

शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, "इतिहासाने आपल्याला सांगितलं की, शक्तिशाली लोक हे शक्तिशाली जागेमधूनच येतात. पण इतिहास चुकीचा आहे. शक्तिशाली लोक हे जागा शक्तिशाली बनवतात."

सेहवागने आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, शिवजयंतीच्या निमित्ताने महान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जय भवानी....

अभिनेत्री रिंकू राजगुरूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत म्हटलं, "छत्रपती शिवराय हे नावच सर्वसमावेशक आहे. जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणे महत्वाचे आहे. स्वार्थासाठी नव्हे तर स्वराज्यासाठी लढणे महत्वाचे आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)