You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बर्ड फ्लू म्हणजे काय? चिकन-अंडी खाणं आता थांबवायचं का?
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेळवली येथे काही कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत्यूमुखी पडल्याचे आढळले आहे. बर्ड फ्लू वाढू नये, यासाठी प्रशासनामार्फत खबरदारी घेत असल्याचे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले, "ठाणे जिल्ह्यातील वेहळोली वगळता, अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नसून संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरुन जावू नये."
किती धोकादायक आहे हा बर्ड फ्लू? नेमका कोणाला आणि कसा होतो आणि आता अंडी किंवा चिकन खाणं बंद करायचं का?
बर्ड फ्लूसाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्त्वं
- सर्व शेतकरी आणि पशुपालकांना बर्ड फ्लूबद्दल माहिती द्यावी.
- पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बाजारात सर्वेक्षण मोहीम सुरू करावी.
- संशयित क्षेत्रातून पशु-पक्ष्यांची ने-आण बंद
- बर्ड फ्लू सर्वेक्षण मोहीम जिल्हा पातळीवर सुरू करावी.
- जिल्हास्तरीय दक्षता पथकांची स्थापना करावी.
- पक्षी, कावळ्यांमध्ये किंवा परिसरातील कोंबड्यांमध्ये आणि कुक्कुटपालन ठिकाणांवर असाधारण पक्षांचे मृत्यू होत असल्याचं आढळून आल्यास पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा.
बर्ड फ्लू काय आहे?
'बर्ड फ्लू' हा आजार H5N1 या व्हायरसमुळे होतो. याला एव्हियन इनफ्लूएन्झा म्हणतात. मुख्यतः हा विषाणू बदकं, कोंबड्या आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये आढळतो आणि तो संसर्गजन्य आहे. अनेकदा स्थलांतरित पक्ष्यांमुळे संसर्ग पसरण्याचं क्षेत्रं वाढतं तो माणसांमध्येही पसरू शकतो.
1997मध्ये बर्ड फ्लूचं माणसांतल्या संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या 60 टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. पण हा बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचं आढळून आलंय.
चिकन आणि अंडी खाणं बंद करायचं का?
नाही. तसं करायची गरज नाही. चिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही असं WHO ने म्हटलंय.
मांस शिजवताना ते उकळून शिजवावं, कच्चं वा आतून लाल राहू नयेत, अंडी पूर्णपणे उकडावीत असं WHOने म्हटलंय.
बर्ड फ्लूची माणसांतली लक्षणं काय?
भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं प्रकरण आढळलेलं नाही. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - ARDS होण्याची शक्यता असते. ताप - सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.
बर्ड फ्लू होण्याचा धोका कोणाला आहे?
तुम्ही कोंबड्या - बदकं पाळली असतील, त्यांना हाताळत असाल, किंवा तुमचं पोल्ट्री फार्म आहे जिथे भरपूर कोंबड्या आहेत, किंवा मग कोंबड्यांच्या मांस विक्रीशी तुमचा जवळचा संबंध असेल तर तुम्हाला या संसर्गाची शक्यता आहे. म्हणूनच पक्षी हाताळताना रबर ग्लोव्ह्ज आणि मास्क, फेस शील्ड किंवा PPE चा वापर करावा.
कोरोना काळातल्या खबरदारीच्या गोष्टी इथेही लागू होतात. वरचेवर हात धुवा, सॅनिटायजर वापरा, बाहेरचे हात चेहऱ्याला - नाका-तोंडाला लावू नका. आणि तुमच्या जवळपास पाळीव पक्षी, इतर पक्षी किंवा स्थलांतरित पक्षी मरून पडत असल्याचं आढळलं, तर यंत्रणेशी संपर्क साधा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)