You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वातंत्र्यदिन नरेंद्र मोदींचं भाषण : कोरोनाच्या तीन लशींचं काम वेगवेगळ्या टप्प्यांत
सुरक्षा दलांमधला प्रत्येक जण देशाच्या, देशांच्या नागरिकांचं संरक्षण करतात, आज त्यांना नमन करण्याचा दिवस आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन आपल्या भाषणाला सुरूवात केली.
त्याचबरोबर मोदींनी कोरोना वॉरियर्सचाही उल्लेख केला.
"लक्षावधी कोरोना वॉरियर्सनी दीर्घ काळ ज्या प्रकारे सेवा परमो धर्म मंत्र मानून सेवा केली आहे, अशा सगळ्या कोरोना वॉरियर्सना मी नमन करतो."
"कोरोनाच्या या काळात अनेक कुटुंबांवर परिणाम झाला, अनेकांचे प्राण गेले. अशा सगळ्या कुटुंबप्रति मी सहवेदना व्यक्त करतो," असं म्हणत पंतप्रधानांनी कोट्यावधी लोकांची, कुटुंबांची संकल्प शक्ती या कोरोनावर विजय मिळवून देईल, हा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधानांचं भाषण तुम्ही इथे ऐकू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे-
1. कोरोनाच्या तीन लशींचं काम वेगवेगळ्या टप्प्यांत
आजपासून National Digital Health Mission चा आरंभ केला जातोय. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही एक मोठी क्रांती असेल. प्रत्येक भारतीयाला हेल्थ ID दिला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या आरोग्य आयडेंडिटीचं काम करेल. यात तुमची संपूर्ण आरोग्यविषयक माहिती, तुम्हाला असलेल्या आजारांची माहिती असेल.
जेव्हा कोरोनाबद्दल बोलतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की, कोरोनाची लस कधी तयार होणार? आज आम्ही सांगू इच्छितो, देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये ऋषीमुनींप्रमाणे काम करत आहेत.
आज भारतात तीन लशींचं चाचणीचं काम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहे. संशोधकांनी हिरवा कंदिल देताच आम्ही ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याची योजना आखली आहे. संपूर्ण यंत्रणा यासाठी सज्ज आहे.
2. शत्रूला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर
सीमेवर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न केला गेला. पण LOC असो वा LAC, आमच्या जवानांनी शत्रूला त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर दिलं.
चिथावल्यास भारत काय करू शकतो, भारतीय जवान काय करू शकतात, हे अख्ख्या जगाने लडाखमध्ये पाहिलंय.
शेजारी राष्ट्रांसोबतच्या शेकडो वर्षं जुन्या नातेसंबंधांवर आम्ही भर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न केलाय.
या क्षेत्रांतील सर्वच नेत्यांची या भागातील विकासाप्रती मोठी जबाबदारी आहे. त्या दिशेने दक्षिण आशियातील सर्व नेत्यांना, प्रशासकांना आणि विचारवंतांना मी आवाहन करतो, की या भागात जर शांतता नांदेल तरच इथला खऱ्या अर्थाने विकास होईल.
आज आमचे शेजारी म्हणजे फक्त सीमेने जोडलेली राष्ट्रं नाहीत तर मनानेही जोडलेली राष्ट्रं आहेत. या देशांशी आपले आर्थिक नाते, विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी महत्त्वाची आहे.
3. 'आत्मनिर्भर भारत' हा नवीन मंत्र
कोरोनाच्या साथीच्या काळात आत्मनिर्भर भारताचा संकल्प आपण केला आहे. हा शब्द नाही, आज हा 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र बनलेला आहे
कुटुंबातल्या 20- 21 वर्षांच्या मुलांकडून आपल्या पायांवर उभं राहण्याची अपेक्षा केली जाते. देश म्हणून आपण पंचाहत्तरीत आहोत. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, तेच देशासाठीही गरजेचं आहे
देशातल्या तरुणांच्या, महिलांच्या सामर्थ्यावर माझा विश्वास आहे. भारताने एकदा एखादी गोष्ट ठरवली, की ती तो करून दाखवतं. म्हणूनच जगाला याबद्दल उत्सुकता आणि अपेक्षा आहेत.
म्हणून आपल्याला यासाठी सज्ज व्हायला हवं, स्वत:ला तयार करायला हवं. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारतासारख्या देशाचं योगदान वाढणं, ही आजची गरज आहे
यासाठी भारताला सशक्त व्हावं लागेल, आत्मनिर्भर व्हावं लागेल. आपल्याकडे प्रचंड नैसर्गिक संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. कधीपर्यंत जगाला कच्चा माल पाठवून, तयार माल विकत घेत राहणार?
आपण आधी धान्य आयात करायचो. पण आज भारत जगात ज्याला गरज असेल, त्याला अन्न पुरण्याची आपली क्षमता आहे. आपल्या शेतकऱ्यांनी हे करून दाखवलं. आपण एखाद्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो, की शेजारच्या देशांचाही त्याचा फायदा होतो.
4. महिला सशक्तीकरणाला प्राधान्य
भारतात स्त्रीशक्तीला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली त्यांनी देशाचं नाव लौकीक केलं आहे. देश बळकट केला आहे.
आज भारतात स्त्रिया भूमिगत कोळसा खाणींमध्ये काम करत आहेत तर दुसरीकडे लढाऊ विमानांनी आकाशालाही गवसणी घातली आहे.
देशातल्या 40 कोटी जनधन खात्यांपैकी जवळपास 22 कोटी खाती महिलांची आहेत.
कोरोना काळात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांमध्ये महिलांच्या खात्यात जवळपास 30 हजार कोटी रुपये थेट ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
5. जम्मू-काश्मिरमध्ये विकासाची गंगा
एक वर्ष झालं आपल्याला 370 पासून स्वातंत्र्य मिळून. आज जम्मू-काश्मीर, लेह-लडाखमध्ये विकासाची गंगा वाहू लागली आहे. तिथे आयुष्मान भारत अभियानाचा लाभ जनता घेत आहे. मानव विकासाची मानांकन सुधारण्यासाठी जनप्रतिनिधी अधिक सक्रीय होऊन काम करत आहेत.
लडाखच्या लोकांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ण करण्याचं काम आम्ही करतोय. तिथे नवीन केंद्रीय विद्यापीठ उभारलं जातंय, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहेत,
तिथे मोठं सौर पार्क तयार होतं आहे. लेह खरंतर कार्बन न्युट्रल म्हणून जगाच्या पाठीवर उदयास येऊ शकतं, तेही विकास करताना.
6. Vocal For Local
Vocal For Local ही स्वतंत्र भारताची मानसिकता असायला हवी, हा जीवन मंत्र व्हावा.
भारतातल्या सुधारणांच्या परिणामांकडे जग बारकाईने पाहात आहे. त्याचाच परिणाम म्हणजे गेल्या वर्षी आतापर्यंतचे FDI चे सगळे रेकॉर्ड मोडले.
गेल्यावर्षी FDI मध्ये 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. कोरोना काळातही मोठमोठ्या कंपन्या भारतात येत आहेत
Make in India सोबतच Make for World चं उद्दिष्टं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे.
National Infrastructure Pipeline विविध क्षेत्रात 7000 प्रोजेक्ट्स निवडण्यात आले आहेत.
देशातील पायाभूत सोयीसुविधांना गती मिळेल.
वाजपेयी पंतप्रधान असताना सुवर्ण चौकोन योजना मांडली होती. आता ती आपल्याला पुढे नव्या दिशेने न्यायची आहे. आता सगळ्या पायाभूत सुविधा एकमेकांशी जोडायच्या आहेत.
7. जलजीवन मिशन : वर्षभरात 2 कोटी कुटुंबांपर्यंत पाणी पोहोचवलं
आत्मनिर्भर भारतासाठी समतोल विकास गरजेचा आहे. यासाठी आम्ही मागास असलेल्या 110 जिल्हे निवडले आहेत
विकासात मागे राहिलेल्या या जिल्ह्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
या सगळ्यात शेती आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.
जलजीवन मिशनला आज एक वर्षं झालंय. दररोज आम्ही 1 लाखापेक्षा जास्त घरांत पाईपने पाणी पोचवत आहोत
गेल्या वर्षभरात 2 कोटी कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आलं. दुर्गम भागात पाणी पोहोचवण्यात आलं.
मध्यम वर्गाला सरकारी दखलंदाजीपासून मुक्ती हवी, नवी संधी हवी. आमचं सरकार मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतंय.
ध्वजारोहणापूर्वी नरेंद्र मोदींनी एक ट्वीट करुन देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान राजघाटावर गेले .
संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्यांमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलासह दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि 24 जवान सहभागी झाले होते.
मेजर श्वेता पांडे ध्वजारोहणादरम्यान पंतप्रधानांसोबत होत्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)