You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजस्थानः गहलोत यांनी असं काय केलं, जे कमलनाथ यांना मध्यप्रदेशात जमलं नाही?
- Author, नारायण बारेठ
- Role, जयपूरमधून, बीबीसी हिंदीसाठी
राजस्थान आणि मध्य प्रदेश ही राज्यं वेगवेगळी असली तरी या दोन्ही राज्यांमधलं राजकारण मात्र एकसारखं आहे. दोन्ही राज्यांमधील राजकीय क्षेत्रात बरीचशी साम्यस्थळं आहेत.
राजस्थानात काँग्रेसचं सरकार आहे, तर मध्यप्रदेशात होतं. मध्य प्रदेशात कमलनाथ यांना सत्ता राखता आली नाही. मात्र, राजस्थानात अशोक गहलोत यांनी आपल्या डावपेचांच्या बळावर सरकार अजूनतरी टिकवून ठेवलं आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार काठावरच्या बहुमतात होतं, तर राजस्थानात बहुमतातील फरक काँग्रेसच्या बाजूनं आहे. असं असूनही या दोन्ही राज्यात कमलनाथ आणि अशोक गहलोत यांच्या रुपानं काँग्रेसच्या जुन्या फळीतले आणि राजकारणात काही दशकं वावरलेले नेते आहेत. तरीही मध्य प्रदेश हातून गेलं, राजस्थान मात्र टिकून आहे. असं का? या प्रश्नाचं उत्तर बीबीसीनं शोधण्याचा प्रयत्न केलाय.
"कमलनाथ हे कसलेले राजकारणी आहेत. मात्र, अशोक गहलोत हे राजकीय समज आणि व्यवस्थापन या दोन गोष्टीत कमलनाथ यांच्या कैक पावलं पुढे आहेत. त्यामुळे ज्यावेळी आव्हानं उभी राहतात, तेव्हा अशोक गहलोत पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरतात," असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
दीड वर्षांपूर्वी ज्यावेळी राजस्थानात काँग्रेसची सत्ता आली, तेव्हाच खरंतर राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत फूट दिसू लागली होती. यातला एक गट मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा, तर दुसरा तेव्हा उपमुख्यमंत्रिपदी असलेल्या सचिन पायलट यांचा होता.
तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या अशोक गहलोत यांना आधीच अंदाज आला होता की, कधी ना कधी पक्षातील एका विशिष्ट गटाकडून आपल्याला आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे. कारण राजस्थानच्या 200 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसकडे केवळ 99 जागाच होत्या.
मात्र, विधानसभा निवडणुकीआधीच राष्ट्रीय लोक दलाची काँग्रेससोबत युती झाली होती. सुभाष गर्ग यांच्या रुपानं राष्ट्रीय लोकदलाचा एक आमदार निवडून आला. हेच गर्ग पुढे गहलोत सरकारमध्ये मंत्रीही झाले. काहीकाळानं एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा आमदार विजयी झाला. हे दोन आमदार मिळून काँग्रेसची संख्या 101 झाली आणि सरकार सुस्थितीत आलं.
गहलोत यांनी आपला किल्ला कसा शाबूत ठेवला?
सरकार स्थिर झालं असलं, तरी अशोक गहलोत गप्प बसले नव्हते. त्यांना माहिती होतं की, इतकं पुरेसं नाही. सरकारला आणखी स्थिर करण्यासाठी त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या सहा आमदारांना पक्षात घेतलं.
बसपच्या आमदारांना पक्षात घेण्याचा गहलोतांचा निर्णय सचिन पायलट यांना आवडला नव्हता. पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी गहलोत यांना विरोधही केला होता. मात्र, त्या विरोधाचं पुढे काही झालं नाही.
बसपचे 6 आमदार पक्षात आल्यानं गहलोत सरकारची स्थिती आणखी बळकट झाली आणि एकूण संख्या 107 वर पोहोचली.
गहलोत एवढ्यावरही गप्प बसले नाहीत. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या डझनभर आमदारांना गहलोत यांनी काँग्रेसच्या बाजूनं केलं. इथं हेही महत्त्वांचं आहे की, या अपक्षांमधील बहुतांश आमदारांची पार्श्वभूमी काँग्रेसचीच होती.
गहलोत यांच्या या जमवाजमवीमुळे सरकार आणखी सुस्थितीत जाऊन बसलं. पर्यायानं, गहलोत यांनी खुर्ची अधिक स्थिर झाली.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील परिस्थितीत फरक
राजस्थानमधील राजकारणाचा अभ्यास असणारे वरिष्ठ पत्रकार अवधेश अकोदिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील राजकीय स्थितीत फरक आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसकडे संख्याबळ कमी होतं, तर राजस्थानात आमदारसंख्येची स्थिती चांगली होती."
अकोदियांच्या मते, "अशोक गहलोत हे सुरुवातीपासूनच सतर्क होते. कारण गहलोत हे भाजपच्या निशाण्यावरील नेते आहेत. हेही कारण असू शकेल. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळ अशोक गहलोत हे काँग्रेसचे प्रभारी होते. तिथं गहलोत यांनी काँग्रेसला भाजपच्या तोडीस तोड उभं केलं.
त्यानंतर कर्नाटक निवडणूक आणि अहमद पटेल यांची राजसभा उमेदवारीची निवडणूक या दोन्ही वेळी गहोलत यांची सक्रियता पाहता, भाजप त्यांच्यावर नजर ठेवून होती. त्यामुळे जेव्हा समोरून आव्हान दिसलं, तेव्हा गहलोत पटकन तयारीत दिसून आले."
"मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्यासमोर ज्योतिरादित्य शिंदे बंडाचा झेंडा घेऊनच उभे होते. शिंदे यांची ग्वाल्हेर भागात चांगली पकड आहे. तशी सचिन पायलट यांची राजस्थानात पकड नाही. त्यात शिंदे यांच्यामागे त्यांच्या राजघराण्याचा वारसाही आहे," असं अकोदिया सांगतात.
राजस्थानातील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांच्या मते, "आता सुरू असलेल्या गोष्टी या काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षातल्या आहेत. भाजपचा या गोष्टींशी काहीच संबंध नाही."
"मध्य प्रदेशची गोष्ट वेगळी होती. तिथं काँग्रेस आणि भाजपच्या संख्येत अगदी बारीकसा फरक होता," असंही कटारिया सांगतात.
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी अशोक गहलोत यांनी अचानक सर्व आमदारांना एकत्र केलं होतं. त्यावेळीही अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.
त्यावेळीही राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं की, भाजपकडून घोडोबाजाराचा प्रयत्न होत आहे. मात्र, पायलट समर्थकांना हे मान्य दिसत नव्हतं. गहलोत हे काल्पनिक भीती निर्माण करू पाहत असल्याची टीका त्यावेळी पायलट गटाकडून झाली होती.
भोपळमधील वरिष्ठ पत्रकार गिरीश उपाध्याय यांच्याशीही बीबीसीनं संवाद साधला. उपाध्याय यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये पत्रकारिता केली आहे.
उपाध्याय सांगतात, "कमलनाथ सतर्क नव्हते, असं म्हणू शकत नाही. तेही सतर्क होतेच. कारण मध्य प्रदेशातील सरकार कोसळेल, असं भाजप पहिल्या दिवसापासून म्हणत होती. कमलनाथ हे हुशार राजकारणी आहेत. शिवाय, त्यांच्यासोबत अशा राजकीय समीकरणांमध्ये वाकबगार असलेले दिग्विजय सिंहही होते. मात्र, सत्ता वाचवण्यासाठी यातल्या कशाचाही उपयोग झाला नाही.
काँग्रेसकडे आधीच संख्याबळ कमी होतं आणि त्यात फूट पडली. खरंतर ज्योतिरादित्य शिंदे पक्ष सोडून थेट भाजपात जातील, याचा अंदाजच कमलनाथ आणि दिग्विजयसिंह यांना आला नव्हता."
"मध्य प्रदेशातील काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत गहलोत यांची राजकीय समज अधिक चांगली आहे. गहलोत यांनी पक्षाअंतर्गत असलेल्या विरोधकांना मोकळं सोडलं आणि त्यांनीच आखलेल्या जाळ्यात हे विरोधक अडकत गेले," असं उपाध्याय सांगतात.
उपाध्याय सांगतात, "गहलोत यांचे विरोधक इतके पुढे निघून गेले की काँग्रेस हायकमांडसुद्धा याप्रकरणी काहीच करू शकत नाही. गहलोत यांची रणनिती वरचढ ठरल्याचं चित्र आहे."
ते पुढे सांगतात, "शिंदे आणि पायलट यांच्यात फरक आहे. शिंदे यांनी मैदानात उडी मारण्याआधीच स्वतःची आणि आपल्या समर्थकांची सोय केलेली होती. पण सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना तर सांभाळलं नाहीच, शिवाय ते स्वतःसुद्धा अडचणीत आले."
राजेशाही असताना ज्याप्रकारे समर्थक भूमिका घ्यायचे, त्याचप्रकारची भूमिका शिंदे यांच्या समर्थकांनी घेतली. त्यांनी आपल्या नेत्याविषयी अशीच आस्था दाखवली.
मध्य प्रदेशात भाजपने कमलनाथ यांचं सरकार पाडण्याचं सुरू केलं, तेव्हा शिवराजसिंह चौहान यांच्यासह इतर नेते एकत्रित होते.
पण राजस्थानचा घटनाक्रम सुरू असताना माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे मात्र पूर्णपणे मौन बाळगून होत्या.
दरम्यान, गहलोत आणि वसुंधराराजे यांचं संगनमत असल्याचा आरोपही पायलट यांनी केला.
वसुंधराराजे या प्रकरणात मुख्यमंत्री गहलोत यांची मदत करत असल्याचं वक्तव्य भाजपच्याच सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी केलं.
यावरून भाजपमध्ये गदारोळ झाल्याचं दिसून आलं. राजे समर्थकांनी याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली.
वसुंधराराजे बराच काळ शांत होत्या. पण नंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे जनतेला नुकसान सहन करावं लागत आहे. लोक त्रस्त आहेत आणि काँग्रेस भाजप नेतृत्वावर आरोप लावत आहे, असं ट्वीट राजे यांनी केलं.
सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाला राजे यांचा विरोध आहे, त्यामुळे पायलट यांनी राजे यांच्यावर निशाणा साधला, असं त्यांच्या समर्थकांना वाटत असल्याचं जाणकार सांगतात.
राज्याचे परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास हे सचिन पायलट यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
पण पायलट यांनी तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत बंडाचं शस्त्र उपसलं, त्यावेळी खाचरियावास यांनी पायलट यांच्याविरुद्ध भूमिका घेतली.
बीबीसीने बोलताना खाचरियावास म्हणाले, "पक्षाला हानी पोहोचावी, असा विचार आम्ही कधीच करणार नाही. पायलट अशा प्रकारचा विचार करत आहेत, असा माझा अंदाज होता. मुख्यमंत्री गहलोत यांना तर आधीपासूनच याची माहिती होती."
गहलोत यांनी यापूर्वीही कमी संख्याबळ असूनही योग्य प्रकारे सरकार चालवल्याची आठवण खाचरियावास करून देतात.
'आम्ही सज्ज होतो'
राज्यात सचिन पायलट यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या ठिकाणी गोविंदसिंह डोटासरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डोटासरा सांगतात, मुख्यमंत्री पूर्णपणे सतर्क होते. रात्री अडीच वाजेपर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कुणीच लढू शकत नाही. पायलट यांनी भाजपसोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आम्ही संपूर्ण तयारीने सज्ज होतो. आमच्याकडे संख्याबळ असल्याने आम्हाला भीती नव्हती.
पायलट पूर्वीपासूनच या उद्देशानेच काम करत होते. गेल्या सात महिन्यांपासून त्यांचं हेच षडयंत्र सुरू होतं. सचिन पायलट पहिल्यांदा 11 जूनला एका कार्यक्रमाच्या बहाण्याने आमदारांना घेऊन जाणार होते. पण आम्ही योग्यवेळी योग्य पावले उचलली.
गहलोत यांनी आपला पाठिंबा मजबूत करण्यासाठी भारतीय ट्रायबल पार्टीच्या दोन आमदारांनाही तयार केलं. राज्यात कम्युनिस्ट पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांच्यापैकी एकाचा पाठिंबा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री गहलोत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मध्य प्रदेश आणि राजस्थान एकमेकांची शेजारी राज्यं आहेत. पण नुकत्याच झालेल्या नाट्यानंतर दोन्ही राज्यातलं राजकीय वेगळेपण प्रकर्षाने दिसून आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)