गुगल: डिजिटल भारतासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार: सुंदर पिचाई

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली आघाडीची कंपनी गुगल पुढील 5 - 7 वर्षांत भारतात डिजीटायझेशनसाठी तब्बल 75 हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. गुगल कंपनीचे सिईओ सुंदर पिचाई यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

गुगलतर्फे 'गुगल फॉर इंडिया' या मोहिमेनिमित्त एका ऑनलाईन इव्हेंटचं सोमवारी (ता. 13 जुलै) आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सुंदर पिचाई यांच्यासह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद आणि गुगलचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली.

गुगल कंपनीच्या इंडिया डिजिटायझेशन फंड अंतर्गत ही 75 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या गुंतवणुकीत प्रत्यक्ष भागीदारी, समभागांद्वारे गुंतवणूक आणि आधुनिक संसाधनांची निर्मिती याचा समावेश असेल. अशी माहिती पिचाई यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे.

ही गुंतवणूक करताना गुगल प्रत्येक भारतीयाला त्यांच्या मातृभाषेत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणार आहे. तसंच, भारतीयांच्या सामान्य गरजा लक्षात घेता त्यांना गरज पडेल अशी डिजिटल उत्पादनांची निर्मिती करण्यावरही गुगल भर देणार आहे.

तर, उद्योग, व्यवसायांना आधार देण्याचं काम आणि आरोग्य, शेती, शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) भर देखील गुगलतर्फे दिला जाणार आहे.

या गुंतवणुकीमुळे भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेला गती मिळेल असं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)