महाराष्ट्र कोरोना लॉकडाऊन : गावी जायला ई - पास कसा मिळवायचा?

महाराष्ट्रामध्ये एस.टी.ने प्रवास करताना ई-पासची गरज नसली, तरी खासगी वाहनाने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ई-पास अजूनही गरजेचा आहे.

देशामध्ये सध्या अनलॉक-3 चा टप्पा सुरू आहे. आणि मिशन बिगिन अगेनसाठीचे आताचे नियम पुढची घोषणा होईपर्यंत कायम रहाणार असल्याचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.

राज्यात किंवा राज्याबाहेर प्रवास करू इच्छिणाऱ्यांना प्रवासासाठी ई-पास मागणी केल्यानंतरच पोलिसांकडून हा ई-पास दिला जातोय.

प्रवासासाठी ई-पास लागणार

देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आहे त्या जागीच अडकून राहावं लागलं होतं. पण, लॉकडाऊनचे प्रवासाबाबतचे काही नियम शिथिल झाल्याने लोकांना ई-पास मिळवून आपापल्या गावी किंवा महाराष्ट्राबाहेर जाता येणं शक्य आहे.

महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार http://covid19.mhpolice.in वर E-Pass साठी अर्ज करता येतो.

कसा मिळवाल ई-पास?

महाराष्ट्र पोलिसांच्या http://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला Apply for Pass Here पर्याय दिसेल. त्यावर विचारेलेली माहिती भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे जोडा. सर्व माहिती दिल्यानंतर Submit बटन क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. पास मंजूर झाल्यानंतर तो http://covid19.mhpolice.in वर मिळेल.

फॉर्म भरताना फक्त इंग्रजी भाषाच वापरता येते. तसंच सर्व कागदपत्रांची एकच फाईल तयार करावी. तुमचा ई-पास मिळाल्यानंतर त्याची हार्ड किंवा सॉफ्ट कॉपी तुमच्याजवळ प्रवास करताना ठेवा.

ई-पाससाठी एकापेक्षा जास्तवेळा अर्ज करू नका. तुम्हाला मिळालेला टोकन आयडी सेव्ह करून ठेवा. हा पास परवानगी मिळालेल्या मार्गावरच वापरता येईल. इतर ठिकाणी वापरल्यास ई-पासचा अवैध वापर केल्याचं पोलिसांकडून गृहीत धरलं जाईल.

मुंबई महानगर क्षेत्रासाठी ई-पास नाही

मुंबई ते पालघर आणि मुंबई ते अलिबाग या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (MMR Region) प्रवास करण्यासाठी कोणत्याही पासची लोकांना आवश्यकता भासणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलंय.

या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचारी नोकरीनिमित्त मुंबईत येतात. तसंच, या भागातून खासगी क्षेत्रात काम करणारेही मुंबईकडे येतात. अशांना राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

बेस्टची बस सेवाही सुरू

बेस्ट प्रशासनाने 8 जूनपासून आपली बस सेवा पूर्ववत केली आहे. अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी कार्यालयांत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल.

विशेष म्हणजे बेस्टच्या काही बसेस या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातल्या विरार, नालासोपारा, कल्याण, बदलापूर आणि पनवेल परिसरातही सेवा देणार आहेत. मुंबईच्या उपनगरांतून येणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळेल. रेल्वे सेवा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं बेस्टने स्पष्ट केलंय.

लॉकडाऊनमुळे बेस्टची बस सेवा मार्च महिन्यापासून बंद करण्यात आली होती. या काळात बेस्टच्या 70 बसेसचं रुग्णवाहिकांमध्ये परिवर्तन करण्यात आलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)