इरफान खान यांचं निधन : बॉलिवुड अभिनेते ते राजकीय नेते, सगळेच शोकाकुल

प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं.

इरफान खानच्या पब्लिक रिलेशन टीमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही बातमी कळवली आहे.

"2018 साली इरफान खान यांना एका दुर्मिळ कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून ते या आजाराशी झुंजत होते. त्यांच्या सानिध्यात जे पण आले त्यांना देखील इरफान यांच्या लढ्यातून प्रेरणा मिळाली होती. अतिशय दुःखद अंतःकरणाने ही बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत," असं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

पाहा त्यांचा जीवनप्रवास

त्यांना व्हर्सोव्ह्यातील कब्रस्तानात दुपारी तीन वाजता दफन करण्यात आलं. यावेळी त्यांच्या घरचे काही निवडक लोक आणि मित्रमंडळी उपस्थित होते, असंही पुढे सांगण्यात आलं.

इरफान खान यांनी हासील, मकबूल, पानसिंह तोमर, द लंच बॉक्स, सलाम बाँबे, हैदर, हिंदी मीडियम अशा अनेक दर्जेदार हिंदी काम केलं होतं. फेब्रुवारीत आलेला अंग्रेजी मीडियम हा त्यांचा अखेरचा प्रदर्शित सिनेमा ठरला.

एवढंच नव्हे तर लाईफ ऑफ पाय, ज्युरासिक वर्ल्ड आणि स्लमडॉग करोडपती या हॉलिवुडपटांमध्येही त्यांनी काम केलं होतं.

इरफान खान यांच्या अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 2011 साली त्यांना भारत सरकारकडून कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.

2013 साली आलेल्या पानसिंग तोमर चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

याशिवाय त्यांना आयफा, झी सिने अवॉर्ड्स, स्क्रिन अवॉर्ड्स यांच्यासह इतर अनेक पुरस्कार देण्यात आले होते.

5 मार्च 2018ला इरफान यांनी त्यांना गंभीर आजार झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सगळेच जण इरफान यांना नेमका कोणता आजार झाला याचा अंदाज लावत होते.

पण नंतर इरफान खान यांनी स्वतः त्याला 'न्युरोएंडोक्राईन ट्यूमर' झाल्याचं ट्वीट करून स्पष्ट केलं. या रोहगाविषयी तुम्ही अधिक इथे वाचू शकता - इरफान खान यांना झालेला दुर्मीळ आजार नेमका काय होता?

सतत नवं करण्याचा प्रयत्न

इरफान खान यांनी 2017 मध्ये बीबीसी साऊंड्सला एक मुलाखत दिली होती. अभिनय क्षेत्रात सातत्याने नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न असल्यामुळे आपण नव्या भूमिका निवडत असल्याचं इरफान म्हणाले होते.

"कोणत्याही चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना एक माणूस म्हणून ही स्क्रिप्ट मला प्रभावित करू शकते किंवा नाही याचा विचार करून मी भूमिका स्वीकारत होतो. कोणत्याही चित्रपटांच्या फ्रँचायझीशी जोडले जाऊन त्याच प्रकारची भूमिका करण्यापेक्षा प्रेक्षकांना काय नवीन देता येईल, याचा प्रयत्न मी करतो.

प्रेक्षकांना माझे चित्रपट पाहताना कंटाळा येऊ नये, त्यांना एक वेगळा अनुभव मिळावा, याची मी काळजी घेतो. यात मी किती यशस्वी ठरलो मला माहिती नाही. पण कोणताही चित्रपट करताना याच गोष्टीचा विचार सर्वप्रथम माझ्या मनात येतो," असं इरफान यांनी बीबीसीच्या मुलाखतीत म्हटलं होतं.

बॉलिवुड शोकाकुल

इरफान यांच्या निधनाचं वृत्त मिळताच बॉलिवुड जगत शोकाकुल झालं आहे.

इरफान खान यांच्या निधनाचं वृत्त मिळालं. ही सगळ्यात वाईट आणि अस्वस्थ करणारी बातमी आहे. त्यांच्यात एक अतुलनीय टॅलेंट होतं. ते एक चांगले सहकारी होते. त्यांच्या जाण्याने जागतिक सिनेमा क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया अमिताभ बच्चन यांनी दिली आहे.

अभिनेते अक्षय कुमार यांनीही ट्वीट करून इरफान यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं. "अतिशय वाईट बातमी, इरफान यांच्या निधनाबाबत कळलं. ते एक सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होते. देव त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखी प्रसंगात बळ देवो, असं अक्षय कुमार म्हणाले.

चित्रपट दिग्दर्शक शुजीत सरकार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की इरफान तुझा मला नेहमीच अभिमान वाटेल.

तर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

गली बॉय अभिनेता विजय वर्मा लिहितो...

ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही त्यांना कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचा एक किस्सा सांगितला -

बॉलिवुडसह राजकारण्यांनीही इरफान यांना श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं की "इरफान यांच्या निधनामुळे सिनेमा तसंच नाट्यजगताचं मोठं नुकसान झालं आहे."

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ट्वीट केलं की, "...हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले."

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या बातमीवर शोक व्यक्त केलं आहे. "ते फक्त एक उत्तम अभिनेते नव्हे तर एक चांगले क्रिकेटरसुद्धा होते, ज्यांना पैशांअभावी आपला खेळ खेळता आला नाही," अशी माहितीसुद्धा त्यांनी दिली.

इरफान यांनी प्रत्येक पात्र आपल्या अभिनयाने आमच्या मनावर ठसवलं. पानसिंग तोमरपासून अंग्रेजी मीडियमपर्यंत यांचा अभिनय उत्तम होता, असं इराणी म्हणाल्या.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)