You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने अॅमेझॉनवरुन पाठवली राज्यघटनेची प्रत #5मोठ्याबातम्या
वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.
1. नरेंद्र मोदींसाठी काँग्रेसनं अॅमेझॉनवरून ऑर्डर केली संविधानाची प्रत
काँग्रेसने 71 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भारतीय संविधानाची प्रत ऑर्डर केली आहे. 'देशाचं विभाजन करण्यातून वेळ मिळाला, तर संविधानही वाचा,' असा उपरोधात्मक सल्लाही काँग्रेसनं मोदींना दिला. TV9 मराठीनं ही बातमी दिलीये.
काँग्रेसने अॅमेझॉनवर संविधानाची ऑर्डर करताना चक्क 'पे ऑन डिलिव्हरी'चा पर्याय निवडला. त्यामुळे संविधानाची प्रत मिळाल्यावर याचं पेमेंटही मोदींनाच करावं लागणार आहे .
काँग्रसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी 'अॅमेझॉन'वरुन पंतप्रधानांसाठी संविधानाची प्रत ऑर्डर केली असून त्याची किंमत 170 रुपये आहे. ही प्रत केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर पाठवण्यात आली आहे.
2. मर्सिडीजमधून उतरणाऱ्यांनाही शिवभोजन थाळी मिळेल- आदित्य ठाकरे
"शिवभोजन थाळी कोणतेही निकष न लावता सर्वांसाठी आहे. बस आणि मर्सिडीजमधून उतरलेल्यांनाही याचा आस्वाद घेता येईल," असं विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीये.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुंबई उपनगर महसूल कर्मचारी उपहारगृह येथे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ झाला. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी 10 रुपयांत आहार मिळणार आहे.
उद्घाटनानंतर बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं, की राज्यात आमची सत्ता येताच गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी आणणार, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्या घोषणेनुसार राज्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
आदित्य ठाकरेंनी म्हटलं, "पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे. शिवभोजन थाळी प्रत्येकासाठी आहे. ज्याला भूक लागली त्याला ही थाळी मिळेल. त्यासाठी कुठेही आर्थिक स्थिती, जात आणि धर्माची अट नाही. ज्याला भूक असेल त्याला थाळी मिळेल. मर्सिडीज किंवा बसमधूनही उतरलेला असेल आणि ज्याला भूक असेल त्याला ही थाळी मिळेल."
3. सरपंचांची निवड थेट जनतेतूनच व्हावी : 9 हजार ग्रामपंचायतींचा ठराव
थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात फडणवीस सरकारनं केलेला कायदा उद्धव ठाकरे सरकारनं रद्द केला. मात्र सरपंचांची निवडणूक थेट जनतेतूनच व्हावी असा ठराव 9 हजार ग्रामपंचायतींनी मंजूर केला आहे. एबीपी माझानं ही बातमी प्रसिद्ध केलीये.
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
राज्यात मागील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेतून सरपंचाची निवड झाली होती. पण यावेळी सरपंचाची निवड सदस्यांमधून व्हावी, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. "एका विचारधारेचा सरपंच निवडून येतो आणि सदस्यांची विचारधारा वेगळी असते. त्यामुळे विकासकामांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात," असं हसन मुश्रीफ यांनी निर्णय रद्द करतेवेळी सांगितलं होतं.
4. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझादांवर हैदराबाद पोलिसांची कारवाई
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि NRC विरोधात रविवारी (26 जानेवारी) आंदोलन पुकारण्यात आलं होतं.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांची परवानगी घेतली नव्हती, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली. इंडिया टुडेनी ही बातमी दिलीये.
चंद्रशेखर आझाद यांना लंगरहाऊस पोलिस स्टेशन हद्दीत सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोलिसांची कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नव्हती, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे.
चंद्रशेखर सध्या जामिनावर बाहेर आहेत.
5. भारताला सक्षम विरोधी पक्षाची गरज - अभिजीत बॅनर्जी
"कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष हा लोकशाहीचं हृदय असतो. सत्ताधाऱ्यांनाही सत्तेवर वचक राहावा म्हणून चांगल्या विरोधी पक्षाची गरज असते. सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं भारताला चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे," असं मत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि नोबल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये बोलताना अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी हे मत व्यक्त केलं.
यावेळी बोलताना अभिजीत बॅनर्जींनी देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्थेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. "अर्थव्यवस्थेच्या समस्येतून आपण लवकर बाहेर पडू असं वाटत नाही. त्यासाठी बराच काळ लागेल. अर्थव्यवस्था सुधारेल एवढा पैसा सध्या आपल्याकडे नाही. बँकिंग सेक्टरमध्ये पैसा लावू शकू अशी आपली परिस्थिती नाही," असं अभिजीत बॅनर्जींनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)