You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंची चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही - मुख्यमंत्री
"राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस कशासाठी आली याबाबत मला माहिती नाही. ईडीशी आमचा काहीही संबंध नाही. ईडी स्वतंत्रपणे काम करणारी संस्था आहे.
राज ठाकरे यांची काहीही चूक नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल जमिनीच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. मागच्या सुमारे एक महिन्यापासून राज ठाकरे यांना ईडीची नोटीस पाठवण्यात येईल, अशी चर्चा माध्यमांमध्ये होती. त्यावेळी "मला ईडीच्या चौकशीचा काही फरक पडत नाही," अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.
अखेर काल त्यांना ईडीने नोटीस बजावली. राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला ईडीच्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंवर ही कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचं मनसे कार्यकर्त्यांचं मत आहे.
मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली होती.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. ज्याप्रकारे राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरुद्ध आंदोलन उभं केलं. ते ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी यांना जाऊन भेटले. विरोधी पक्षाला एकत्र आणण्याचं काम राज ठाकरे यांनी केलं. त्यानंतर अशा प्रकारचे नोटीस देण्याची सुरूवात झाली आहे.
सीबीआय, ईडी या संस्था स्वायत्त राहिल्या नसून भाजपच्या कार्यकर्त्या झाल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा कुठल्याही गोष्टीला भीक घालत नाही. राज ठाकरेही अशा गोष्टींना भीक घालत नाहीत. हुकुमशाहीविरुद्धचा लढा यापुढे आणखी तीव्र करण्यात येईल," असं संदीप देशपांडे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीनंतर (दि. 19) पत्रकार परिषद घेतली. सांगली-कोल्हापूर इथल्या महापुरानंतरच्या परिस्थितीबाबत पुनर्वसन आणि मदतकार्याबाबत पुढच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, "तुम्हाला जेवढी माहिती आहे, तितकीच माहिती मला आहे. त्यांना नोटीस आली हे मी पण माध्यमांमधूनच ऐकलं आहे. ती नोटीस कशासाठी आली, हे मला माहिती नाही. ईडीशी आमचा काहीच संबंध नाही. ईडी ही स्वतंत्रपणे काम करते."
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "राज ठाकरे यांना नोटीस आली असेल तर त्यांनी त्या नोटिशीला उत्तर दिलं पाहिजे. राज ठाकरे यांची काही चूक नसेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. याला सुडबुद्धीचं राजकारण म्हणणं चुकीचं आहे. आता ईडीच्या चौकशीत एखाद्याचं नाव आलं किंवा व्यवहार दिसला तर ते नोटिसा पाठवत असतात. योग्य असेल तर सोडतात नाहीतर कारवाई करतात."
मनसे कार्यकर्ते याबाबत आंदोलन करण्याची शक्यता असल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं. यावेळी "ते खरे असतील तर नागरिकांना त्रास देण्याचं कारण काय? कायदा सुव्यवस्था जे हातात घेतील, ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली."
दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी उद्या (दि. 20) तातडीची बैठक बोलावली आहे. नेते, सरचिटणीस तसंच विभाग अध्यक्षांना या बैठकीस बोलावण्यात आलं आहे. राजगड या पक्षाच्या मुख्यालयात उद्या सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)