You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आलमट्टी धरणाचा विसर्ग कमी असल्यामुळे परिस्थिती गंभीर - देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची स्थिती आजही बिकट आहे. हवामान खात्याने आज आणि उद्या अतिवृष्टी चा इशारा दिला आहे. त्यामुळे धरणातील साठा वाढल्याने नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे.
पाण्याचा विसर्ग वाढवणं गरजेचं - मुख्यमंत्री
सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरस्थिती भीषण कशामुळे झाली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकातल्या आलमट्टी धरणाचा विसर्ग मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे बॅकवॉटरमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. 5 लाख क्युसेक्यने विसर्ग झाला तर लवकर पाणी कमी होईल, हे आमच्या लक्षात आलं आणि हा विसर्ग वाढवण्यात यावा अशी विनंती आम्ही कर्नाटककडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी 5 लाख क्युसेक्सनी विसर्ग करण्याची तयारी दर्शवली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड यांची मदत घेतली. ओरिसा, गुजरात, गोवा राज्यातून टीम आल्या आहेत.
सांगलीमध्ये उतरण्याची परवानगी न मिळाल्यामुळे सांगलीत पोहोचता आलं नाही त्यामुळे आम्ही हवाई पाहणी केली. कराडची पाणी पातळी कमी झाली आहे. कोल्हापूरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत. कोल्हापुरात 97,000 हून अधिक लोक स्वतःहून स्थलांतरित झाले आहेत. 157 कॅंपमध्ये 40,000 जणांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सध्या जनादेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे. 18 ऑगस्टनंतर परिस्थिती पाहून यात्रा सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सांगलीत बोट उलटून 9 जणांचा मृत्यू,3 बेपत्ता
ब्रह्मनाळ (तालुका पलूस जि. सांगली) येथे ग्रामपंचायतची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती आले असून 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आणखी 3 जणांना बुडाल्याची शक्यता असून 3 जण बेपत्ता आहेत.शोधकार्य सुरू आहे. NDRF TEAM घटना स्थळी पोहोचली आहे.
बोटमध्ये एकूण 30 लोक होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या बोटीमध्ये झाडीची फांदी अडकल्यामुळे बोट उलटल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. ही बोट प्रशासनाची नव्हती. त्यामुळे या बोटीची नेमकी किती क्षमता होती हे सांगता येणं कठीण आहे. असं ते म्हणाले.
ब्रह्मनाळ येथील दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे बळी गेलेल्या व्यक्तींचा आकडा 27 वर पोहचला आहे. तर 2 लाखांहून अधिक लोक पुरामुळे विस्थापित झाले आहेत.
कोल्हापूर पूर परिस्थिती- स्वयंसेवी संस्थाकडून मदतीचा ओघ
कोल्हापूर आणि परिसरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी कोल्हापूरकर पुढे सरसावले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक लोक आणि स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. पूरग्रस्तांना जेवण, कपडे, ब्लॅंकेट्स आणि औषधं देण्यासाठी लोक स्वयंसेवी संस्था आणि तरुण पुढे येत असल्याचं लोकमतनं सांगितलं आहे.
महापुरामुळे हजारो घरं पाण्याखाली गेल्याने अंगावरच्या कपड्यानिशी आणि हाताला येईल तेवढे जीवनावश्यक सामान घेवून हे नागरिक सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री घराबाहेर पडले. सीता कॉलनी येथील ६० नागरिकांचे दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये स्थलांतर केले. येथे जैन सोशल ग्रुप सिल्व्हर लीप या संघटनेने जेवण, ब्लँकेटस, चादरी दिल्या. स्वरा फाउंडेशन, स्मार्ट वन, राजारामपुरी मंडळ, इस्कॉनचे दिपक सपाटे आदींनी मदत केली. चित्रदुर्ग मठात २७ कुटुंब आणि ९० माणसे वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी श्रृंगार ग्रूपने जेवणाची सोय केली, असं लोकमतनं सांगितलं.
मुस्लिम बोर्डिंगमध्ये सोमवारी केवळ आठ कुटुंब स्थलांतरित झाली होती बुधवारी ही संख्या ५० कुटुंब आणि १०२ नागरिकांवर गेली. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, सरनाईक वसाहत मुस्लीम जमात, करवीर गर्जना यांनी जेवण दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आपत्कालीन पथकाद्वारे मदत केली.
आतापर्यंत 53,000 जणांना पुरामुळे स्थलांतर करावे लागले आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरपरिस्थितीची पाहाणी करण्यासाठी दाखल झाले आहेत.
कोल्हापूर विमानतळावर आगमन होताच ते सांगलीला रवाना झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातली पूर स्थिती पाहात NDRF आणखी 5 तुकड्यांना इथं पाचारण करण्यात आलं आहे. पंजाबमधून त्यांना तातडीनं इथं आणलं जात आहे. या तुकड्या आधी पुण्यात येतील त्यानंतर त्यांना सांगली आणि कोल्हापुरात पाठवलं जाईल.
धरणातून विसर्ग वाढला
मुळशी धरणामधून सकाळी ९:०० वाजता विसर्गात वाढ करण्यात आली आहे. 15000 क्युसेक्स वरून 20000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
कोल्हापूरच्या कोयना धरणाचा विसर्ग आता 83,178 करण्यात आला आहे. कोयनेचे दरवाजे 14 वरून 10 फुटावर आणण्यात आले आहेत.
अतिवृष्टीचा इशारा
बुधवारी रात्री राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून कोयना धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील अनेक मार्ग आजही बंद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 112 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणी पातळी 55 फुटांच्यावर गेलीय. कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीत दर तासाला वाढ होतेय.
तसंच पुढचे तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय.
कोल्हापूर जिल्ह्यात लष्करासह NDRF ला पाचारण करण्यात आलं आहे. बुधवारपासून बचावकार्य सुरू करण्यात आलंय.
गावच्या गावं पाण्याखाली गेल्याने व्यवहार ठप्प आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी मार्ग बंद असल्याने गावागावातून होणारं दूध संकलन बंद आहे. त्यामुळे पुणे, मुंबई परिसरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. दूध घेऊन जाणारे टँकर दूध संघातच उभे आहेत.
मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अजूनही बंद
मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अजूनही बंदच आहे. दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्ववत करण्यास वेळ लागत आहे. 11 ऑगस्टपर्यंत मुंबई-पुण्यादरम्यानच्या 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात 51 हजार लोकांना पुरामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. तर सांगली जिल्ह्यात 53 हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
पुरामुळे सर्वाधिक बळी सातारा जिल्ह्यात गेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात 7, पुणे जिल्ह्यात 4, कोल्हापूर जिल्ह्यात 2, सांगली जिल्ह्यात 2 तर सोलापूर जिल्ह्यात 1 मृत्यू पावसामुळे झाला आहे.
गडचिरोलीमध्येही पूर
गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जवळपास 200 घरं पाण्याखाली गेली आहेत.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूर परिस्थितीमुळे भामरागड आणि अहेरी तालुक्यातल्या 100 गावांचा संपर्क तुटला आहे.
मेळघाटत पुन्हा पावसाचा कहर
अमरावतीच्या धारणी तालुक्यातल्या दियामध्ये सिपना नदी आणि रोहिनीखेड़ाच्या गडगा नदीला पूर आल्यानं बैरागड परिसरातल्या 30 गावांचा पुन्हा धारणीशी संपर्क तुटला आहे. या भागात धारणी तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)