काश्मीर : लोकसभेतही जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर, कलम 370 इतिहासजमा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशानुसार जम्मू काश्मीरसंदर्भातलं कलम 370 हटवण्यात आलं आहे. काश्मीरची विभागणी दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यासंबंधातलं विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं. आज हे विधेयक लोकसभेतही मंजूर करण्यात आलं.

संध्याकाळी 7.05 वा. लोकसभेत विधेयक मंजूर

जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक लोकसभेत बहुतमानं मंजूर करण्यात आलं. विधेयकाच्या बाजूने 366 मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात 66 मतं पडली.

संध्याकाळी 5.30 वा. इम्रान खान यांनी केलीनाझी पक्षाशी भाजपची तुलना

तिकडे पाकिस्तानच्या असेंब्लीत बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलंय की, "जर अशा महत्वाच्या प्रसंगी जगाने दखल घेतली नाही तर उशीर होईल. मी अणुयुद्धाची धमकी देत नाहीये, मी समंजसपणा दाखवण्याबद्दल बोलत आहे. अशा परिस्थितीमुळे अवघ्या मानवतेला धोका आहे. भाजपचे वागणे हिटलरच्या नाझी पक्षापेक्षा वेगळ नाही.

दुपारी 4.30 - फारूख अब्दुल्ला म्हणाले 'हे लोकशाहीविरोधी'

श्रीनगरमध्ये माध्यमंशी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलंय की, गृहमंत्री संसदेत माझ्याबाबत खोटं बोलताहेत की मी माझ्या घरात स्वखुशीने बसलोय. ते म्हणाले, "माझ्या राज्याला आग लावली जाताना मी घरात बसून राहीन? माझ्या माणसांना जेलमध्ये मारलं जात असताना मी घरात बसून राहीन? मला माहीत असलेला भारत हा नाहीच मुळी. माझा भारत लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष आहे."

"हे पूर्णतः लोकशाहीविरोधी आहे. केस सुप्रीम कोर्टात होती. ते वाट का पाहू शकत नव्हते. माझा त्यांच्या बंदुकांवरही विश्वास नाही. हे सगळं खोटं आहे." असं अब्दुल्ला म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "70 वर्षांनंतर त्यांनी काश्मिरींच्या छातीत खंजीर खुपसलाय. दरवाजे उघडले की माझे लोक मुक्त होतील. आम्ही लढा देऊ, कोर्टात जाऊ. आमचा बंदुका, बाँब आणि दगडफेकीवर विश्वास नाही. आमचा विश्वास शांततेने प्रश्न सोडवण्यावर आहे. त्यांना जर आमचा खून करायचा असेल तर आधी माझ्या छातीवर गोळ्या घाला. पाठीत खंजीर खुपसू नका. या भारताची मी नेहमी साथ दिली."

दरम्यान लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं की अब्दुल्ला यांना अटक किंवा ताब्यात घेतलेले नाही.

दुपारी 3.22 - श्यामाप्रसाद मुखर्जींवरून खडाजंगी

अनंतनागचे खासदार हसनैन मसूदी यांनी लोकसभेत चर्चेदरम्यान म्हटलं की श्यामाप्रसाद मुखर्जींनी कलम 370 च्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. यावरून जोरदार गदारोळ झाला. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी यावर प्रश्न उपस्थित केले. तर गृहमंत्री अमित शाह यांनी मसूदी यांचे वक्तव्य निराधार आहे. मसूदी यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारावर केले हे स्पष्ट करावे अशी मागणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली.

दुपारी 12.49 - हे संविधानाचं उल्लंघन - राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून कलम 370 संदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

"जम्मू काश्मीरचं एकतर्फी विभाजन करून राष्ट्रीय एकता साध्य करता येणार नाही. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जेलमध्ये डांबणं हे संविधानाचं उलंघन आहे. या देशाची निर्मिती इथल्या लोकांमुळे झाली आहे, ना की जमिनीच्या कुठल्या तुकड्यामुळे. हा अधिकारांचा दुरुपयोग आहे आणि हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंताजनक आहे," असं राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे.

दुपारी 12.30 - यातून काय साध्य होणार - डीएमके

या विधेयकांच्या माध्यमातून काय साध्य होईल असा प्रश्न डीएमकेचे खासदार टी.आर. बालू यांनी उपस्थित केला आहे. कलम 370 रद्द केल्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

दुपार 12 - काँग्रेस कलम 370 हटविण्याच्या बाजूने आहे का? 

मनीष तिवारी यांच्या भाषणादरम्यान काँग्रेस कलम 370 हटविण्याच्या बाजूने आहे की नाही याचं उत्तर द्यावं, असं अमित शाह यांनी म्हटलं. अमित शहांच्या या टिप्पणीवर बोलताना तिवारी यांनी म्हटलं, की जम्मू-काश्मीर विधानसभेच्या परवानगीशिवाय तुम्ही कलम 370 रद्द करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट ब्लॅक अँड व्हाईट नसते. प्रत्येक गोष्टीला अनेक पैलू असतात, असंही मनीष तिवारींनी म्हटलंय.

सकाळी 11.48 - ही संवैधानिक दुर्घटना - मनिष तिवारी

काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी या मुद्द्यावर बोलताना मोदी सरकारनं आणलेली ही विधेयकं 'संवैधानिक दुर्घटना' असल्याचं म्हटलंय. जम्मू काश्मीर विधानसभा भंग करून त्यांचे अधिकार स्वतःच्या ताब्यात घेऊन मोदी सरकार संविधानासोबत खेळत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला आहे.

सकाळी 11 - काश्मीरसाठी जीव देण्यास तयार - अमित शहा

राज्यसभेत पारित करण्यात आलेली विधेयकं गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत सादर केली.

लोकसभेत अमित शहा आणि काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी यांच्यात खडाजंगी झाली. अधिररंजन चौधरी यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. चौधरी यांना उत्तर देताना काश्मीरसाठी जीव देण्यास तयार असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)