You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर : कलम 370 रद्द करण्यावर पाकिस्तानने दिली ही प्रतिक्रिया
भारत सरकारने जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारं कलम 370 रद्द केलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रचंड गोंधळाच्या दरम्यान ही घोषणा केली.
सरकारच्या या निर्णयावर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानलाही या निर्णयाचा धक्का बसला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी हजयात्रेसाठी मक्केला गेले आहेत. त्यांनी पाकिस्तानच्या दुनिया न्यूजला फोनवरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "भारताची ही धोकादायक खेळी आहे ज्याचे गंभीर परिणाम होतील. याने शांतताप्रक्रियेला खीळ बसेल. पाकिस्तानचे पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मदत घेऊन या भागातला प्रश्न सोडवू पाहात होते, पण भारताने आज या प्रश्न आणखी गुंतागुंतीचा केला आहे."
या कठीणसमयी पाकिस्तान आपल्या काश्मिरी बांधवांसोबत आहे, आणि त्यांची साथ कधीही सोडणार नाही, असंही ते पुढे म्हणाले. "आम्ही काश्मिरी लोकांना राजकीय आणि मुत्सदी पाठिंबा देत राहू. मी जगभरातल्या मुस्लीम समाजाला आवाहन करतो की त्यांनी एकमुखाने भारताच्या कृतीचा विरोध करावा."
पाकिस्तानमधलं वृत्तपत्र अखबार एक्सप्रेसने लिहिलंय की भारत प्रशासित काश्मीरचा विशेष दर्जा आता रद्द.
"कलम 370 रद्द केल्यामुळे काश्मीरची अवस्था आता पॅलिस्टाईनसारखी होणार आहे. काश्मिरींनाही आता स्वतःची जमीन राहाणार नाही कारण आता काश्मीरमध्ये कोट्यावधी गैर-काश्मिरी स्थलांतरित होतील आणि त्यांची जमीन, साधनसंपत्ती आणि नोकऱ्यांवर कब्जा करतील."
भारत सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीरची लोकसंख्या, भौगोलिक आणि धार्मिक परिस्थिती या सगळ्यावर परिणाम होईल.
पाकिस्तानमधलं दुसरं वृत्तपत्र डॉनने लिहिलं आहे, "भारत सरकारने संसदेत मोठ्या प्रमाणावर विरोध होत असतानाही काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. आता काश्मिरी लोकांना भीती आहे की या भाग मुस्लिमबहुल न राहाता हिंदूबहुल होईल.
पाकिस्तान टुडेने लिहिलं आहे, "अमित शाह यांच्या घोषणेनंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणाव पसरला आहे."
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी #KashmirBleeds हा हॅशटॅग वापरून ट्वीट केलं की, "भारत प्रशासित काश्मिरातल्या लोकांवर सतत अत्याचार होत आहे. या सरकारचे मनसुबे साफ दिसत आहेत. काश्मिरात जे होतंय ते पाहून राष्ट्रपतींनी संसदेचं संयुक्त सत्र ताबडतोब बोलवलं पाहिजे.
पाकिस्तानातली प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने काश्मिरी लोकांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे.
तिने लिहिलं, "आपण त्या गोष्टी पुर्णपणे विसरलो आहोत ज्यांच्याविषयी आपण कधीही बोलत नाही. या फक्त वाळूत मारलेल्या रेघोट्या नाही आहेत, हा कित्येक निर्दोष माणसांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. स्वर्ग (काश्मीर) जळतोय आणि आम्ही मुकपणे रडतोय."
अंदलीब अब्बास यांनी म्हटलंय की, "भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीचा स्रोत हिंदू आणि फॅसिस्ट आरएसएस आहे. ते काश्मिरी लोकांना छळण्यासाठी नवनवीन रस्ते शोधत असतात. कलम 35A आणि 370 रद्द केलं तर जगाची शांतता भंग होईल... हे जग गप्प का आहे?
पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्राला टॅग करून ट्वीट लिहिलं आहे, "भारत सरकारने आपल्या घटनेतून कलम 370 रद्द करायचा प्रयत्न करून जणू काही संयुक्त राष्ट्रांविरुद्ध युद्ध पुकारलं आहे. नरेंद्र मोदी सरकार जालियनवाला बाग हत्याकांड घडवणाऱ्या जनरल डायरसारखं वागत आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)