You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महालक्ष्मी एक्सप्रेस : अंबरनाथ-बदलापूर पाण्याखाली, संथ वाहणाऱ्या उल्हास नदीने रौद्ररूप का घेतलं?
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्सप्रेस शनिवारी पहाटे वांगणीजवळ अडकली.
त्यामुळे जवळपास 700 प्रवाशांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागली. उल्हास नदीचं पाणी ट्रॅकवर आल्यानं या भागांत ट्रेनची वाहतूक रात्री बंद झाली.
26 जुलै 2019च्या रात्री तसंच 27 जुलै 2019च्या पहाटे उल्हास नदीच्या परिसरात संततधार पाऊस झाला.
एकट्या कर्जतमध्येच 303 mm पावसाची नोंद झाल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. त्यामुळे नदीला पूर आला आहे.
पण उल्हास नदीला पूर येण्याची ही पहिली वेळ नाही. पावसाळ्यात वेगानं फेसाळून वाहणाऱ्या उल्हास नदीचं दृश्य काठावर राहणाऱ्यांसाठी आणि ट्रेनने कल्याण-कर्जत-खोपोली मार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी नवं नाही.
पण या नदीला एवढा पूर का येतो? या नदीची वैशिष्ट्य काय आहेत?
1. उल्हास नदी ही लांबीच्या दृष्टीनं कोकणातील सर्वात मोठी नदी आहे. लोणावळ्याजवळ राजमाची परिसरात तिचा उगम होतो आणि पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातून ती 122 किलोमीटरचं अंतर पार करून कल्याणजवळ खाडीतून पुढे वसईच्या खाडीला मिळते.
2. कोकणातल्या अन्य नद्यांप्रमाणेच उल्हास नदी पावसाळ्यात अनेकदा दुथडी भरून वाहते. पेज, चिल्हार, पोशिर अशा नद्या उल्हास नदीस येऊन मिळतात. बोरघाट, भीमाशंकर तसेच माथेरानचा डोंगर या परिसरात पडणारे पावसाचे पाणी अरबी समुद्रात वाहून नेणारी ही मुख्य drainage system आहे.
3. उल्हास नदी आणि तिच्या खाडीच्या काठावर कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, ठाणे अशी शहरं आणि नेरळ, पाषाणे, वांगणीसारखी गावं वसली आहेत.
4. 26 जुलै 2005 च्या दिवशी मुंबईत मिठी नदीच्या प्रलयात झालेला विद्ध्वंस सर्वांना आठवत असेल. पण त्या दिवशी उल्हास नदीलाही पूर आला होता. त्यावेळी बदलापूरजवळ ब्रिटिशकालीन बॅरेजचे (छोटं घरण) लोखंडी दरवाजेही वाहून गेले होते. बदलापूर ते कल्याण परिसरात त्यावेळी प्रचंड नुकसान झालं होतं.
5. वांगणी बदलापूर दरम्यान मध्य रेल्वेचा ट्रॅक उल्हास नदीच्या अगदी जवळून म्हणजे काही फूटांवरून जातो. 26/7 च्या पुरादरम्यानही या ट्रॅकवर पाणी आले होते आणि त्यामुळं ट्रेन वाहतूक जवळपास आठवडाभर बंद होती.
6. त्याआधी 1989 साली उल्हास नदीला महापूर आला होता आणि कर्जतमध्येही मोठं नुकसान झालं होतं. पण flood barrier- नदीकाठी संरक्षक भिंत उभारण्यात आली. तसंच नदीपात्रातला गाळ काढण्याचं काम झालं असून घरं उंचावर बांधण्यात आल्यानं तिथे मोठं नुकसान होत नाही.
7. कल्याण-भिवंडी परिसरात मात्र वाढता शहराचा विस्तार पूररेषेच्या आतच असलेली बांधकामं यामुळे पूराचा धोका वाढलेला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)