You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदीः पंतप्रधानांनी भाषणात सांगितले राजकारण्यांचे 'हे' चार प्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्वाल्हेर इथं भाजपसाठी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी चार प्रकारचे राजकारणी असतात असं सांगितलं. नामपंथी, वामपंथी, दाम-दमनपंथी आणि विकासपंथी असे राजकारण्यांचे चार प्रकार सांगितले.
नामपंथी म्हणजे जे लोक फक्त एकाच घराण्याचा जयघोष करतात. इतर कोणत्याही कार्यकर्त्यांना पुढे जाऊ देत नाही. इतर कोणत्याही कार्यकर्त्याचं नाव पुढे येऊ दिलं जात नाही. हे कोणतं घराणं आहे हे सांगायची मला आवश्यकता नाही असं मोदी म्हणाले.
दुसरे आहेत वामपंथी. ज्या लोकांनी पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळाचा नाश केला ते लोक वामपंथी आहेत. त्यांचा निर्देश डाव्या विचारांच्या पक्षांकडे होता. दुसऱ्या देशातील मेलेली विचारधारा हे लोक पुढे रेटत आहेत आणि हिंसेचा वापर करत आहेत असं ते म्हणाले.
तिसरा प्रकार आहे दाम आणि दमनपंथी लोकांचा. लोकांना पैसे वाटून किंवा बंदुकीच्या धाकावर हे लोक सत्ता मिळवतात असं मोदी म्हणाले.
चौथा प्रकार आहे विकासपंथींचा. भाजपचा मार्ग हा विकासाचा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
अजून कर्जमाफी का नाही?
मध्यप्रदेशात राहुल गांधी यांनी आश्वासन दिलं होतं की सरकार आलं तर 10 दिवसात कर्जमुक्ती दिली जाईल. पण अजूनही कर्जमुक्ती झाली नाही. काँग्रेसने आतापर्यंत सैनिक आणि पोलिसांसाठी काही केलं नाही पण त्यांच्यासाठी आम्ही दिल्ली येथे नॅशनल वॉर मेमोरिअल आणि पोलीस मेमोरियल बांधलं आहे असं सांगितलं.
काँग्रेसच्या काळात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या योजना रखडल्या होत्या. त्या योजनांना आम्ही जीवदान दिलं. पुन्हा आम्ही निवडून आलो तर जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करून पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)