गडचिरोली नक्षली हल्ला: मरण पावलेल्या जवानांचे मृतदेह पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले? - फॅक्ट चेक

गडचिरोली हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जवानांना पुठ्ठ्यांच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आलं होतं, असा मेसेज सोशल मीडियावर पसरवला जात आहे. फेसबुक, ट्विटर आणि शेअरचॅट या मोबाईल अॅप्सवर असे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. पण खरंच असं घडलं का?

गडचिरोलीत बुधवारी झालेल्या हल्ल्यात 15 जवानांचा मृत्यू झाला. C-60 दलाच्या या जवानांबरोबरच एक ड्रायव्हरही ठार झाला आहे.

त्यानंतर या जवानांचे मृतदेह त्यांच्यात्याच्या गावी पाठवण्याची सोय करण्यात आली. मात्र काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये पुठ्ठ्यांचे बॉक्स एका रांगेत दिसत आहेत. "हे कचऱ्याचे डब्बे नाहीयेत. हे गडचिरोलीत माओवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या CRPF जवानांचे पार्थिव देह आहेत. बघा, स्वत: राष्ट्रवादाच्या बढाया मारणारे भाजप सरकार आपल्या सैनिकांना कशी वागणूक देत आहे," अशा मथळ्याखाली हे फोटो सोशलवर शेअर केले जात आहेत.

जवानांची अशी स्थिती होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत, असा आरोप सोशल मीडियावर होत आहे. पण सोशल मीडियावर केलेले दावे खरे नाहीत आणि हे फोटो महाराष्ट्रातले नसल्याचं बीबीसीच्या पडताळणीत दिसून आलं आहे.

गडचिरोलीत काय घडलं?

गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात मृत्यू पावलेल्या CRPF जवानांना पूर्ण शासकीय इतमामात श्रद्धांजली देण्यात आली आहे.

जवानांच्या श्रद्धांजलीचे क्षण अनेक मीडियाने लाईव्ह दाखवले आहेत.

श्रद्धांजलीचा व्हीडिओ आणि हे फोटो पाहिले तर सोशल मीडियावर केलेला तो दावा खोटा असल्याचं दिसून येतं.

व्हायरल फोटोंचं सत्य

Google reverse image search द्वारे या फोटोंची तपासणी केला असता हे फोटो 2017 मधले असल्याचं आढळलं. पाहा ही लिंक

6 ऑक्टोबर 2017 रोजी अरुणाचल प्रदेशमधल्या तवांग येथे भारतीय वायु सेनेचं MI-17 हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. त्यावेळी PTIनं दिलेल्या बातमीनुसार वायुदलाच्या 5 जवानांसह 7 जणांचा मृत्यू झाला होता.

त्या अपघातानंतर जवानांचे पार्थिव असलेले पुठ्ठ्यांचे बॉक्सचे फोटो समोर आले होते. भारतीय सैन्याचे माजी लेफ्टनंट जनरल हरचरणजीत सिंह पनाग यांनी त्यावेळी हे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केले होते.

"भारत मातेची सेवा करताना 7 भारतीय जवानांनी त्यांचे प्राण गमावले. त्यानंतर त्यांचे पार्थिव अशाप्रकारे घरी पाठवण्यात आले," असं त्यांनी लिहिलं होतं.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 8 ऑक्टोबर 2017ला हे फोटो शेअर केले होते. "तवांग क्रॅशमध्ये मृत्यू पावलेल्या 7 जवानांचे पार्थिव पुठ्ठ्यांमध्ये भरले गेले आहेत. आपल्या सैनिकांना अशी वागणूक द्यावी का?" असं त्यांनी लिहिलं होतं.

या टीकेनंतर भारतीय सैन्याचे प्रवक्त्यांनी सैन्याच्या अधिकृत ट्विटर हँडल त्याविषयी स्पष्टीकरण दिलं होतं. "मरण पावलेल्या जवानांना अपघाताच्या ठिकाणापासून हवाई दलाच्या तळापर्यंत आणण्यासाठी स्थानिक साधनांचा वापर करावा लागला. पण त्यानंतर सगळ्या जवानांच्या पार्थिवांना पूर्ण सन्मानानं त्यांच्या घरापर्यंत पाठवण्यात आलं होतं."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)